खायचे व दाखवण्याचे दात.
निसर्ग एक अप्रतिम निर्माता आहे. मानव असो
की कोणताही प्राणी ही निसर्गाची एक निर्मिती आहे. निसर्गातील
समस्त घटक एकमेकापासून काही शिकण्याचा प्रयत्न करीत वाटचाल करीत आहेत. हत्ती निसर्गातील
एक हुशार तसेच सहसा शांत असणारा प्राणी आहे.
हत्तीला निसर्गतः दोन प्रकारचे दात असतात. एक प्रकारचे
दात शोभेचे असतात तर दुसरे कामाचे दात असतात. शोभेचे दात
इतरांना दिसतात पण कामाचे दात इतरांना सहसा दिसत नाहीत. हत्तीच्या
शोभेच्या दातांना मानवी समाजात खूप मोठी किंमत मिळते. मानवाने या
दातांच्या किंमतीसाठी अनेक हत्तींची हत्या करण्याचा प्रमाद केला आहे.
हत्ती या प्राण्या पासून मानवाने खूप काही घेतले आहे. अर्थात मानवाला
जे काही त्याच्या फायद्याचे वाटले तेच घेतले हा भाग वेगळा. मानवाने हत्तीच्या
दाता प्रमाणेच खायचे व दाखवण्याचे दात असा एक गुण आत्मसात केला आहे. इतर शब्दात
सांगायचे झाले तर वास्तविक चेहरा व समाजा समोर दर्शवण्यात येणारा चेहरा यामध्ये असणारी
जमीन-अस्मान इतकी तफावत. वर्तमान समाजात
दोन भिन्न चेहरे असणारे अनेक व्यक्ती आहेत.
समाज ज्या प्रकारचा त्याच प्रकारचे त्याचे प्रतिनिधी असणे
स्वाभाविक आहे. सामान्य माणसांचा पक्ष अशी बिरुदावली असणारे राजकीय पक्ष
असो की त्याचे नेते याला अपवाद नाहीत.
आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते श्री.अरविंद केजरीवाल
यांचे असणारे दोन चेहरे नुकतेच समाजा समोर मांडण्यात आले.
श्री.केजरीवाल बोलतात एक मात्र वास्तवात कृती भिन्न असते. अर्थात हा
काही नविन प्रकार नाही. मी यापूर्वीच माझ्या ब्लॉग मध्ये यासंदर्भात विश्लेषण केले
आहे. श्री.केजरीवाल कोणत्या क्षणी कोणत्या प्रकारची भूमिका घेतील वा
घुमजाव करतील याचा काही भरवसा नाही.
सर्वात प्रथम आंदोलन काळात कोणत्याही परिस्थिती मध्ये राजकीय
पक्ष स्थापन करणार नाही असे वक्तव करणारे केजरीवाल काहीच महिन्यात राजकीय पक्षाची स्थापना
करतात. नंतर कोणत्याही व्यक्तीला पक्षाचे सदस्यत्व असो की उमेदवारी
देताना प्रथम सखोल चौकशी करणार, तपासणी करणार असा दावा करण्यात आला पण वास्तवात घडले काय? मी नमूद करण्याची
गरज आहे का?
दिल्ली निवडणूकात ना युती, ना पाठिंबा
घेणार असा दावा तो देखील स्वतःच्या मुलांची शपथ घेऊन करण्यात आलेला दावा काही दिवसात
सोयिस्कर रित्या विसरले? जे मुलांची शपथ विसरतात ते पदाची शपथ घेताना जे काही वक्तव्य
केले त्याला कसे लक्षात ठेवतील. पदापूर्वी जी काही शपथ घेतली तिला देखील वाटाण्याच्या अक्षता
प्रदान केल्या.
जनहिताच्या लोकपालसाठी सत्ता सोडण्याचा दावा करण्यात आला
पण यांना स्वतःला स्वतःच्या पक्षातील उमेदवारांचे एकत्रीत बहुमत निर्माण करण्यात अपयश
आले. जिथे इनमीन
30ते 40 मत एकत्र
करणे यांना साध्य झाले नाही तिथे केंद्र सरकारने जवळपास 250 ते 300 मत एकत्र
करावे ते देखील आम्ही सांगतो त्याच मसूद्या नुसार ही अपेक्षा होती.
वास्तव व अपेक्षा यामधील अंतर लक्षात आल्यानंतर सरकार चालवणे
आपल्याला झेपणार नाही याची त्यांना पूर्ण जाणीव झाली असावी. काही असो
पदाचा राजीनामा देत कर्तव्याला पाठ दाखवली यामध्ये शंका नाही.
सरकार स्थापन करताना देखील परिपक्वता दर्शवली का? पदग्रहण करताना
शासकीय घर घेणार नाही तसेच कोणत्याही प्रकारची सुरक्षा घेणार नाही असा दावा केला पण
वास्तवात दहा खोल्यांचे घर मागण्यात आले तसेच त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च तो देखील
शासकीय करण्यात आला. 26 जानेवारी रोजी केजरीवाल यांच्या सुरक्षेचे पितळ उघडे पडल्यानंतर
त्यांनी अनोळखी चेहरे असणारे सुरक्षा रक्षक मिळावे ही लेखी मागणी केली.
थोडक्यात श्री.केजरीवाल हे समाजासमोर एक तर वास्तवात दुसरे असा काहीसा प्रकार
आहे. ज्यावेळी मिडीयाला केजरीवाल यांचे दोन चेहरे दिसले त्यावेळी
मिडीया विकला गेला असा आरोप करण्यात आला.
पण केजरीवाल यांना मोठे केले कोणी? ज्यावेळी
हाच मिडीया त्यांचे गुणगान करीत होता त्यावेळी मिडीया स्वच्छ व सुंदर होता पण यांचे
वास्तव दर्शवताच विकला गेला? तो देखील सगळा मिडीया?
मिडीयातील काही घटकांचा पक्षपातीपणा कोणीही नकारत नाही पण
समस्त मिडीया पक्षपाती ठरवणे म्हणजे बौदिधक कुपोषणाचे एक लक्षण आहे. मिडीया नसता
तर केजरीवालांना किती व्यक्तींनी ओळखले असते? केजरीवाल
हे स्वकर्त्त्वाने मोठे झाले नाहीत तर त्यांना मिडीयाने मोठे केले याचे
त्यांना विस्मरण होणे स्वाभाविक आहे.
जितके सखोल जाणार तितके पितळ उघडे पडणार यामध्ये शंका नाही. तसेच केजरीवाल
समर्थक सवयीने इतरांना पे रोल वर किंवा भ्रष्ट ठरवणार
यामध्ये काही शंका नाही. बिचारे समर्थक व त्यांची अंधश्रध्दा तसेच केजरीवाल म्हणजे
वर्तमान समाजाचे एक प्रतिनिधी.
Comments
Post a Comment