मंदिर-मस्जिद की सगुण-निर्गुण
राम मंदिर व बाबरी मस्जिद
संदर्भात न्यायालयाने निकाल दिला. कोणत्याही न्यायालयात न्याय होतो सोबत
अप्रत्यक्ष स्वरुपात अन्याय देखील होतो. न्याय व अन्याय हे विरुद्ध अर्थी शब्द
असले तरी ते परस्पर सापेक्ष व पूरक असून या दोघांना स्वतंत्र असे अस्तित्व नाही.
न्यायालीन निकालांचा
सगळ्यांनी आदर करावा. कारण न्यायालय त्यांच्या समोर मांडण्यात येणाऱ्या समस्त
घटकांचा विचार करून निर्णय घेते. अर्थात तो निर्णय काही व्यक्तींना न्याय वाटतो तर
काहींना अन्याय वाटतो यामध्ये काही नवल किंवा वेगळे नाही. मत मतांतर ते मतभेद हे
माणसांच्या जिवंतपणाचे एक लक्षण आहे. पण माझेच मत अंतिम सत्य हे मानवी अहंकाराचे
एक लक्षण आहे.
न्यायालय निकाल नंतर मिडिया
पुन्हा निकाल व त्यामागील खटला ते घटनाक्रम याच्या मागे लागली. मिडिया मध्ये कृती
पूर्वी विचार करणे किंवा जबाबदारीचे भान असणे हा प्रकार खूप पूर्वीच काळबाह्य झाला
आहे. पत्रकारिता एक धंदा आहे त्यामधून अर्थाजन करणे हेच ध्येय आहे कि काय असा
प्रश्न निर्माण होतो.
काही असो त्यांनी काय
बोलावे हा त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे पण यामुळे सामजिक संस्कार व
मानसिकता यांच्यावर विपरीत परिणाम होणार असेल तर यावर आम्ही आक्षेप घेतला पाहिजे.
संस्कार व मानसिकता यांच्यावर कसा विपरीत परिणाम होणार असा अनेकांना प्रश्न
निर्माण होणे स्वाभाविक आहे.
निकाल नंतर हिंदूची
प्रतिक्रिया, मुस्लीमची प्रतिक्रिया, हिंदू वा मुस्लीम नेत्यांची प्रतिक्रिया सोबत
काही महाभाग तर अयोध्या मध्ये ठाण मांडून बसले होते. निकालापूर्वी व नंतरचे जनजीवन
दर्शवण्याचा खटाटोप करीत होते.
एक व्यक्ती व त्याची
प्रतिक्रिया न देता सोबत धर्म जोडण्याचा प्रकार केला कारण काय? कोणत्याही
व्यक्तीची प्रतिक्रिया हि व्यक्तिगत प्रतिक्रिया म्हणजे एक मत या व्यतिरिक्त काहीच
नाही पण मिडीयाने या संवेदनशील विषयात जणू काही अकलेचे ते देखील नसलेल्या अकलेचे
जणू प्रदर्शन मांडले होते. अर्थात मिडिया वा पत्रकार म्हणजे आपल्याच समाजाचा एक
अविभाज्य घटक आहे.
वर्तमान समाजात प्रतिक्रिया
तत्परता खूप आहे. विषय कोणताही असो त्याचा अभ्यास असो वा नसो माणूस त्वरित
प्रतिक्रिया देऊन मोकळा होतो. थोडक्यात अकलेचे तारे तोडण्याचा प्रकार करण्यात येतो
कारण संस्कार. कोणत्याही व्यक्तीची जडण घडण हि त्याच्या संस्कारा वर अवलंबून असते.
जसे संस्कार तसे विचार ते आचरण.
राम मंदिर व बाबरी मस्जिद
या वादाचे मूळ स्वरूप म्हणजे सगुण कि निर्गुण स्वरूप. जगभरात जे कोणी धर्म वा देव
आहे असे मानतात त्यांचे वर्गीकरण दोन प्रकारात होते. एक निर्गुण स्वरूप तर दुसरे
सगुण स्वरूप. पण कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता माणूस धर्मांचे विभाजन करताना
हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, यहुदी, बौद्ध, शीख, जैन असे वर्गीकरण करतो.
धर्माचा अभ्यास न करता केवळ
वडिलोपार्जित संपत्ती प्रमाणे मिळालेला धर्म म्हणजे वास्तवात अधर्म आहे. जोपर्यंत
धर्माचे ज्ञान मिळत नाही तो पर्यंत त्याची जाणीव होत नाही. धर्म एक अनुभव असून तो
घेतल्याविना जाणवत नाही.
गंमत म्हंजे आम्हाला धड
स्वतःचा धर्म जाणवत नाही पण तो प्राणप्रिय व सर्वश्रेष्ठ का? मानवी अहंकार, अज्ञान
याव्यतिरिक्त काही नाही. जगभरातील समस्त धर्मात जी काही मुलभूत तत्व आहेत त्यांचे
पालन न करता धर्मपालन होणार कसे?
जगभरात धमार्च्या सोबत
अप्रत्यक्ष स्वरुपात अधर्म वाटचाल करीत होता तसेच आहे. समस्त धर्मात मक्तेदारी,
धर्माच्या नावाखाली सामान्य जनतेची पिळवणूक ते शोषण करण्याचे प्रकार घडले आहेत तसे
घडत आहेत. धर्माच्या नावाखाली दंगल होणे, मानवी हत्याकांड होणे असे प्रकार मानवी
समूहाला नवीन नाहीत.
मानव अहंकारामुळे धर्म
ज्ञानापासून वंचित राहतो परिणामी धर्माच्या नावाखाली अधर्म करीत राहतो. जगातील
कोणताही धर्म याला अपवाद नाही. एक धर्म दुसऱ्या धर्माचा शत्रू मानला जातो कारण
अहंकार व अधर्म. शत्रुत्वा मागे माझे ते श्रेष्ठ व उत्तम तुझे ते कनिष्ठ कारण यात
माझे महत्वाचे आहे. मी माझा हाच अहंकार आहे.
धर्म कोणताही घ्या तो
भगवंताचे वर्णन करताना सगुण किंवा निर्गुण या स्वरुपात करतो. काही संस्कृती मध्ये
सगुण व निर्गुण या दोन्ही स्वरूपांना मान्यता आहे. ती संस्कृती म्हणजे हिंदू
संस्कृती. काही व्यक्ती याला धर्माचे स्वरूप देत राजकारण करून स्वतःची पोळी भाजून
घेतात हा भाग वेगळा आहे.
मंदिर व मस्जिद या दोन्हीत
आराधना करीत असतात एकीकडे सगुण तर दुसरीकडे निर्गुण स्वरूप आहे. राम मंदिर म्हणजे
मर्यादा पुरुषोत्तम ज्यांनी जीवनात वचन असो कि मर्यादा यांचे पालन केले. मस्जिद
म्हणजे इस्लामिक प्रार्थना स्थळ मुळात इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती आहे. जो
मर्यादा पालन करतो तो शांत असतो. किंबहुना मानवी अहंकार त्याला मर्यादा उल्लंघन
करीत अशांत बनवतो. आम्ही शब्द पकडले पण त्यामागील अनुभव दुर्लक्षित केला कारण
अहंकार.
अहंकार मुळे सगुणरूप मानतात
ते असो कि निर्गुणरूप मानतात ते असो मी मानतो तेच स्वरूप अंतिम सत्य ते योग्य
मानतात त्यासाठी प्रसंगी तर्क मांडतात पण तर्काचा अर्क वा धर्म म्हणजे निखळ अहंकार
आहे. मुळात आपण एक माणूस असून आपल्या दृष्टीला असो कि आकलनशक्ती यांना काही
मर्यादा आहेत यांचे भान राखत वाटचाल केली तर राम व शांती अन्यथा हे राम.
मंदिर वा मस्जिद निर्माण
होण्यामुळे आमच्या जीवनात कोणता बदल घडणार आहे? याचे उत्तर स्वतः शोधून पाहावे.
कोण काय म्हणतो, काय करतो हे नेहमी दुय्यम असून आम्ही काय करतो वा समजतो हे
प्राथमिक आहे.
मला या वादात सगुण व
निर्गुण या स्वरूपातील मतभेद दिसत आहेत. काहींना मंदिर व मस्जिद ते हिंदू व
मुस्लीम यांच्यातील कलह दिसत आहे. वास्तवात जे काही आहे ते आमच्या व्यक्तिगत
दृष्टीकोन नुसार बदलते आहे तर दोष दृष्टीत कि श्रुष्टीत?
जग सुधारणा करण्यापेक्षा जर
स्वतः मध्ये सुधारणा केली तर समस्त संघर्ष नाहीसा होणार आहे. इतरांच्यात सुधारणा
ते परिवर्तन करण्यापेक्षा स्वतः मध्ये सुधारणा केली तर खरा धर्म ते व्यक्ती
स्वातंत्र्य अन्यथा अहंकाराची गुलामगिरी.
Comments
Post a Comment