उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
सामाजिक सांकेतिक स्थळाला भेट देताच सर्वात
प्रथम मराठीतील हि म्हण आठवते कारण कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही व्यक्तीच्या
कृती संदर्भात तत्परतेने प्रतिक्रियांचा अक्षरशा पाऊस सुरु होतो तो देखील रिमझिम
नसून मुसळधार असतो. त्यामध्ये राजकीय संदर्भ असेल किंवा राजकारणा सोबत निगडीत असेल
तर विचारता सोय नाही.
महाराष्ट्रातील निवडणुका असो कि त्यांचे निकाल
ते वर्तमान घडामोडी यासगळ्या संदर्भात एकाचा व्यक्तीच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया
पहिल्या नंतर हसावे कि रडावे असा प्रश्न निर्माण होतो. मिडिया व पत्रकार यांच्या
संदर्भात कमीत कमी व्यवसायाचा एक भाग म्हणत दुर्लक्ष करता येते पण सामान्य माणूस
देखील यात हिरारीने भाग घेत क्षणाक्षणाला प्रतिक्रिया बदलतो.
राजकारण हे बुद्धीबळाच्या खेळा पेक्षा जटील आहे.
बुद्धीबळाच्या खेळात दोन व्यक्ती सोंगटी व त्यांची चाल निश्चित करीत असतात पण
राजकारणाच्या पटावर सोंगटी देखील स्वतःची चाल करीत असते व त्याचा अंदाज घेत खेळ
खेळला जातो. अंदाज कधी बरोबर ठरतो तर कधी चुकतो.
राजकारणात अनेकदा खेळी करायची असते एक तर
दर्शवली जाते एक. राजकारणात विचारधारा, पक्ष व पक्षनिष्ठा हे फक्त बोलण्यासाठी
असते पण प्रत्यक्षात राजकारणात ना कोणी कोणाचा मित्र, ना कोणी कोणाचा शत्रू.
राजकारणात नाते देखील परिस्थिती व संधी यानुसार बदलत असते. जनते समोर बोलणे व
प्रत्यक्षात कृती करणे यामध्ये खूप अंतर आहे.
राजकारणात कधी कधी एखाद्या सोंगटीचा बळी दिला
जातो. राजकारणात कोणत्याही निर्णयामागे दूरदृष्टीला प्राधान्य दिले जाते. कधी कधी
पुढील अनेक वर्षांचा विचार केला जातो. पत्रकार असो कि सामान्य माणूस व्यक्तिगत
दृष्टीने अभ्यास करतो तसेच कोणताही नेता त्याच्या दृष्टीने विचार करतो.
सध्या सामान्य माणूस असो कि पत्रकार यांना फाजील
वा आगंतुकाचा सल्ला देण्याचा अनावर मोह होत्तो तसेच तत्परतेने निकाल लावण्याची सवय
जडली आहे. त्यामध्ये सामाजिक सांकेतिक स्थळांचा मोठा हातभार आहे.
आज सकाळी शपथविधी पार पडल्याचे जाहीर होताच
सेनेची फसवणूक, शरद पवारांनी दगा दिला अश्या प्राथमिक प्रतिक्रिया देणारे दुपारी
अजित पवार यांच्यावर घसरले. उद्या आणखीन नवीन प्रतिक्रिया देण्यात येतील.
कोणताही माणूस शक्यता आधारित विचार करताना जो
तर्क मांडतो तो त्याच्या बौध्दिक क्षमते नुसार असतो तसेच ज्या नेत्याशी हा तर्क
निगडीत असतो त्याचा संदर्भात त्या व्यक्तीच्या मनात जी प्रतिमा असते त्याच्या
भोवती तर्क फिरत असतो.
अजित पवार यांना बंडखोरी केली? घोटाळ्यात नाव
असल्याने त्यामधून बाहेर पडण्यासाठी केले? अजित पवारांच्या पाठीमागे स्वतः शरद
पवार आहेत? फडणवीस यांचे सरकार स्थापन न करता पाडून त्यांची नाचक्की करणे? पुन्हा
निवडणुका घेण्यापूर्वी भाजप बदनाम करणे? भाजपचा खरा चेहरा सगळ्या समोर आणणे?
शिवसेना वाचणे? असे अनेक तर्क करता येतात पण वास्तव कोणाला माहित? पण जो तो अधीर
होत प्रतिक्रिया देत आहे.
शपथविधी नंतर बहुमत सिद्ध करावे लागते या
दरम्यान काळात खूप काही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकारणात अचानक किंवा
नाट्यमय वळण हा एक हास्यास्पद प्रकार आहे. राजकारणात अचानक वा नाट्यमय काही नसते
तर त्यामागे दीर्घ प्रक्रिया सुरु असते पण त्यापासून अनेक जण अंधारात असतात.
राजकारणात सगळे अनिश्चित असे असताना थोडा विचार
करून प्रतिक्रिया व्यक्त करणे गरजेचे असते. सरकार स्थापन करण्यासंदर्भात नेते अधीर
नाहीत पण जनता असो कि मिडिया यापैकी अनेक जण म्हणजे उतावळा नवरा अन गुडघ्याला
बाशिंग.
Comments
Post a Comment