धर्मांतर कथा व व्यथा?


भारतात सध्या धर्म व धर्मांतर यासंदर्भात सामाजिक सांकेतिक स्थळावर खुपकाही लिहिले जात आहे. लिखाण करणारे अथवा शेअर करणारे यांचा मागोवा घेतला तर त्यांची एकाच संघटनेची असणारी पार्श्वभूमी त्वरित लक्षात येते पण तो आपला मुख्य मुद्दा नाही.
जागतिक इतिहासात धर्मांतर संदर्भात अनेक घटना आहेत. लोक धर्मांतर का करतात? या प्रश्नाचा मागोवा घेताना धर्म व त्यामधील तत्व यांचे आकलन करून धर्मांतर केलेल्या व्यक्तींची संख्या जवळपास बोटावर मोजण्या इतकी आहे. जे धर्म ज्ञानातून धर्मांतर करतात त्यांना काही अडचणी जाणवत नाहीत. समजा जाणवली तरी ज्ञानातून मार्ग मिळतो.
धर्मांतर करण्यात प्रमुख कारण सापडते ते म्हणजे दर्जा, वर्तमान धर्मात किंवा समाजात जे खालच्या स्तरावर असतात ते वरच्या दर्जाच्या अपेक्षेने धर्मांतर करतात. या प्रकारचे धर्मांतर अधिक प्रमाणात आढळते. जगातील सगळ्या धर्मात व समाजात स्तर रचना असल्याचे निदर्शनास येते.
धर्मातील स्तर रचना मागे वास्तवात अहंकार आहे पण तो अप्रत्यक्ष स्वरुपात असतो. जगातील कोणत्याही धर्माचा अभ्यास करताना स्तर रचना निदर्शनास येते मात्र धर्मांतर करतात ते याचा कितपत अभ्यास करतात हे सांगता येत नाही. ढोबळ मानाने अभ्यास करीत नसावे असा निष्कर्ष मिळतो.
उच्च स्तर मिळावे या अपेक्षेने जे धर्मांतर करतात ते मात्र उपेक्षित राहतात. यांची अवस्था म्हणजे आगीतून उठून फुफाट्यात अशी होते कारण नवीन धर्म स्वीकारला पण त्या धर्मियांनी यांना स्वीकारणे गरजेचे असते, त्या धर्मातील प्रस्थापित स्वतःला उच्च समजतात तर ज्यांनी स्वीकारला ते कनिष्ठ समजले जातात. थोडक्यात जे जुन्यात होते तेच नव्याने सुरु होते पण माघारी फिरता येत नाही कारण पुन्हा जाणे म्हणजे आणखी नाचक्की होणार.
धर्मांतराचे अजून एक प्रमुख कारण म्हणजे आर्थिक प्रलोभन. धर्मांतर करण्यासाठी धनसंपदा, नोकरी, व्यवसाय करण्यात मदत अशी नाना विविध प्रकारची प्रलोभन दिली जातात. काही व्यक्ती या प्रलोभनाला बळी पडतात. प्रलोभन देणे व स्वीकारणे मानवी स्वभावाचा एक घटक आहे. कोणता व्यक्ती कोणत्या प्रलोभनाला बळी पडणार याचा काही नियम नाही. ज्याला एक वेळेचे जेवण करण्याचे धान्य मिळत नाही त्याला जर पोतेभर धान्य मिळाले तर तर तो धर्म कोणताही असो चरितार्थ सोय झाली याचा प्रामुख्याने विचार करीत असेल तर त्यामध्ये काय गैर?
कोणत्याही व्यक्तीला त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा धर्म पालन करताना तो पुस्तकी धर्म पाहणार का? मुळात तो ज्या धर्मात असतो त्याच्या इतर धर्म बांधवांनी जर त्याचे पोट भरण्याची सोय केली ते तो धर्मांतर करणार नाही पण माणूस सर्वात प्रथम प्राधान्य देतो ते स्वतःला.
प्रलोभन नंतर धर्मांतराचे कारण म्हणजे भय. अनेक राज्यकर्ते असोत कि राज्याश्रय असणारा धर्म असो त्याने बळाचा वापर करीत जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडले असल्याचा इतिहास आहे. अर्थात यामागे धर्मप्रेम कमी माझा धर्मप्रेम अधिक म्हणजे अहंकार आहे. अहंकारी राज्यांनी स्वतःचा धर्म ते विचार इतर सामान्य व्यक्तीवर लादण्याचा प्रकार वारंवार केला होता. कोणत्याही प्रकारचे भय दर्शवत लादलेला धर्म कोणत्याही व्यक्तीला ना समजणार, ना उमजणार पण तो पालन करणार अर्थात त्यामधून सुटका करण्याचा प्रयत्न देखील केला असेल पण धर्मातील कर्मठ लोकांनी त्याला मान्यता दिली नसावी.
धर्म कोणताही असो त्यामध्ये कर्मठ वर्ग असतो तसेच आहे व हाच कर्मठ वर्ग म्हणजे कोणत्याही धर्मातील सर्वोच्च स्तर वा वर्ग असतो. धर्मातील शास्त्र काय सांगते ते लोकांनी काय करावे याचे सगळे निर्णय हेच कर्मठ घेत असतात. संत ज्ञानेश्वर यांच्या वडिलांनी संन्यास धारण करून पुन्हा त्याग केला यावरून त्यांना सहकुटुंब वाळीत टाकण्यात आले होते तर त्या काळात ज्याने धर्मांतर केले त्याला पुन्हा धर्मात घेतले असेल का?
थोड्या फार प्रमाणात प्रत्येक धर्मात कर्मठपणा होता त्यामुळे अनेकांनी प्रसंगी धर्मांतर केले पण नवीन धर्मात तेच अनुभव मिळाले. सध्या अनेक कर्मठ धर्मावर संकट, धर्माचे नुकसान अश्या प्रकारच्या वल्गना करीत आहेत. आपल्या धर्मातील कोणी धर्मांतर केले तर धर्मावर संकट मात्र तेच इतरांनी आमच्या धर्मात प्रवेश केला तर देवाने सद्बुद्धी दिली असा दावा करण्यात येतो.
भारतातील काही कर्मठ व्यक्तींना वर्तमान भारतीय जीवन प्रणाली खटकते आहे कारण त्यांना कधी काळी असणारा सर्वोच्चपणा सध्या मिळत नाही व तो पुन्हा प्राप्त करण्यासाठी इतर धर्मातील धर्मगुरू असो कि व्यक्ती ते कसे नालायक व अत्याचारी आहेत हे सामान्य मनावर बिंबवण्याचा प्रकार करीत आहेत, यामधूनच इतिहास बदलण्याचा प्रयत्न ते प्रकार वारंवार करीत आहेत.
इस्लामिक राज्यकर्ते होते त्यांनी धर्मस्थळ उध्वस्थ केली व जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पडले असे वारंवार सांगतात पण त्यांनी मस्जिद देखील पडली व अनेक मंदिरांना दान दिले हे कधी सांगत नाहीत. राजेशाही काळात मंदिर असो कि मस्जिद पडण्यामागे राजकारण ते अर्थकारण होते. यापलीकडे ते जेकाही घडले तो काळ राजेशाहीचा होता मात्र वर्तमानकाळ लोकशाहीचा आहे. सर्व धर्म समभाव अशी वाटचाल केली तर देशाची प्रगती होणार आहे. देश टिकला ते आम्ही व आमच्या न समजलेल्या धर्माला अस्तित्व राहणार आहे.
कोणताही धर्म म्हणजे मेंढरांचा कळप नाही. धर्म पालन व संख्या यांचा दुरान्वये समंध नाही. स्वतःच्या अंतरंगात डोकावून पहा आपण आपल्या धर्माचे पालन कोणत्या प्रकारे व प्रमाणात करतो नंतर बाकीच्या गप्पा. किती लोक धर्म पालन करतात यापेक्षा कोणत्या प्रकारे पालन करतात हा खरा मुद्दा आहे. आपण धर्मांतर संदर्भातील पोस्टचा प्रथम अभ्यास करावा नंतर प्रतिक्रिया व मत बनवा.
कोणत्याही व्यक्तीने धर्मांतर कोणत्या कारणास्तव केले हे फक्त त्यालाच माहित असते बाकी सगळे तर्क असतात. कोणत्याही तर्काचा अर्क म्हणजे एक शक्यता असून ते वास्तव नाही. आपण आपल्या कृतीचा अभ्यास करून प्रत्यय घ्यावा.
धर्मांतर ते धर्मअंतर यावरून गोंधळ करण्यापेक्षा वर्तमान व भविष्याचा विचार करून वाटचाल करावी तरच आपल्याला व आपल्या भावी पिढीला उज्वल भवितव्य आहे अन्यथा कर्मठपणा त्यांचा देखील बळी घेणार आहे.

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते