बेगडी देशभक्ती
कोणत्याही सामाजिक स्थळाला
भेट देताच वंदे मातरम बोलणे व देशभक्ती यावर टिप्पणी असल्याचे निदर्शनास येते. जे
कोणी वंदे मातरम म्हणत नाहीत ते देशद्रोही आहेत असा आरोप करण्यात येतो पण खरी गंमत
म्हणजे आरोप करणाऱ्या व्यक्तीला संपूर्ण वंदे मातरम म्हणता येत नाही असे अनेक
व्हिडीओ वारंवार पाहण्यात येतात.
इतरांनी काय करावे हे
सांगणाऱ्या व्यक्तीला आपण स्वतः काय करतो याचे भान वा जान नसल्याचे निदर्शनास
येते. नुसत्या घोषणा दिल्या म्हणजे देशभक्ती होते का? देशभक्ती इतकी क्षुल्लक
गोष्ट आहे का? वर्तमान समाजातील सामाजिक सांकेतिक स्थळांना भेट देताच देशभक्ती व
त्यावरील मक्तेदारी प्रकर्षाने जाणवते. सोबत होणारी फजिती देखील दिसते.
आपण इतरांच्या देशभक्ती
संदर्भात शंका घेतो कारण आपली देशभक्ती बेगडी आहे. जो बेगडी देशभक्त आहे त्याच्याच
मनात इतरांच्या देशभक्ती संदर्भात शंका निर्माण होतात. दोष सृष्टी मध्ये नसून
दृष्टीत आहे. कोणताही देशभक्त इतरांच्या देशभक्तीची तपासणी करणे किंवा प्रमाणपत्र
देण्याच्या फंदात पडत नाही.
देश म्हणजे काय? तसेच
त्याची भक्ती काय असा प्रश्न घोषणावादी तरुणांना केला तर काय प्रतिक्रिया मिळते
याचा अनुभव घेत वास्तवाचा प्रत्यय घ्यावा. वर्तमान समाजातील तरुण मुला मुलींच्या
मनावर घरच्या पेक्षा सांकेतिक स्थळांचे संस्कार अधिक आहेत. अर्थात यासंदर्भात
त्यांना दोष देता येणार नाही. घरा घरात आपसातील संवाद कमी झाला असून सांकेतिक
स्थळावरील विवाद अधिक प्रमाणात होत.
सांकेतिक स्थळावर संवाद कमी
व विवाद अधिक होताना दिसतात कारण तरुणांना स्वतः चे विचार ते समज म्हणजे अंतिम
सत्य वाटत असते. सांकेतिक स्थळावर विवादात अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यचा प्रकार
वारंवार होत असल्याचे निदर्शनास येते. अर्थात यामागे संस्कार कारणीभूत आहेत. माणूस
कोणताही असो संस्कार त्याची जडण घडण करीत असतात. संस्कार हि अविरत व अव्याहत सुरु
असणारी एक प्रक्रिया आहे.
वर्तमान समाजात जे काही घडत
आहे त्यामागे कालचा संस्कार व कृती यांची जबाबदारी आहे. भारतीय संस्कृती मध्ये
कधीकाळी एकत्र कुटुंब पद्धत अस्तित्वात होती पण ती पद्धत कालांतराने कालबाह्य ते
अव्यवहार्य ठरली. वर्तमानकाळातील बहुतेक तरुण विभक्त कुटुंब पद्धती मधून आलेले
असल्याने मीच योग्य, मीच सत्य, माझे ते खरे, माझा तो समाज बाकी इतरांचा गैरसमज असे
प्रकार वारंवार घडतात. परिणाम स्वरूप समाजातील घटस्फोट घेण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या
वाढले आहे.
घर, कौटुंबिक जीवन, संस्कार
व देशभक्ती यांचा काय संबध असा अनेक तरुणांना प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. देश एक
एकत्र कुटुंब आहे. या कुटुंबात अनेक धर्म, जाती व जमातीचे लोक नांदत आहेत. पण
मुळात कुटुंब व्यवस्थेचे महत्व, मर्म ते धर्म यांचे ज्ञान झाल्याविना भक्ती कशी
निर्माण होणार? संस्कार कळले तर तर व्यक्तिमत्व व त्याची जडण घडण, भावना, विचार ते
क्रिया व प्रतिक्रिया यांचे ज्ञान होणार आहे.
वर्तमान समाजात कोणताही
व्यक्ती कोणत्याही प्रकारची क्रिया करतो अथवा प्रतिक्रिया व्यक्त करतो त्यावेळी तो
कोणत्या जातीचा वा धर्माचा, कोणत्या राजकीय पक्षाचा समर्थक यांना प्राधान्य
देणाऱ्या दृष्टीकोनातून पाहण्यात येते पण तो एक व्यक्ती असून त्याला त्याचे
स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे याचे सहज विस्मरण होते. किंबहुना आम्हाला त्यासंदर्भात
ज्ञान नाही असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आज जवळपास प्रत्येक व्यक्ती एकमेकाकडे
संशयाने पाहत आहे. जवळपास प्रत्येकाच्या मनात एकमेकाप्रती द्वेष ते कटुता आहे.
गंमत म्हणजे संशय, द्वेष,
घृणा, तिरस्कार ते कटुता आमच्या अंतरंगात पण आम्ही त्यासाठी इतरांना जबाबदार ठरवत
त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागत फिरतो. घोषणा देत देशभक्तीचा पुरावा मागणे हा त्याच
संशयाचा भाग आहे. आपल्या ज्याकाही भावना वा विचार आहेत त्याला फक्त आपण आपले
संस्कार ते दृष्टीकोन हेच जबाबदार असतात पण आपण इतरांना जबाबदार ठरवतो. आपण आपल्या
दृष्टीने जग पाहतो याचे अनेकांना भान नाही याउलट चोराच्या उलट्या बोंबा प्रमाणे
इतरांना देशभक्तीचे पुरावे मागत फिरतो.
आपण इतरांचे परीक्षण
करण्यापेक्षा स्वतःचे परीक्षण करणे कधी हि उत्तम कारण यामुळे आपल्या
व्यक्तिमत्वाचा विकास होत वैचारिक परिपक्वता व प्रगल्भता प्राप्त होते. आपण जर
परिपक्व व प्रगल्भ झालो तर देश स्वरूप कुटुंबातील विवाद व कलह यांचे प्रमाण कमी
होणार आहे. विवाद व कलह कमी झाले तर एकोपा निर्माण होणार सोबत सामाजिक शांतता
निर्माण होणार आहे. जिथे कलह नाहीत त्याठिकाणी प्रगती झपाट्याने होते, भले ती
व्यक्तिगत असो कि सामाजिक.
भारतीय समाजात सध्या धर्म,
जातपात, राजकीय पक्ष ते वैचारिक मतभेद यावरून व्यापक प्रमाणात कलह ते विवाद आहेत.
आज आम्ही एकत्र येण्यास असमर्थ आहोत. एकाच धर्मात देखील पंथ व त्यांचे मतभेद आहेत.
धर्म या नावाखाली भले एक होतात पण पुन्हा पंथ वेगळे होतात या ठिकाणी धर्माच्या
नावाखाली होणारे ऐक्य म्हणजे फक्त एक भ्रम आहे.
समाजात जर शांतता असेल तरच
प्रगती होणार अन्यथ देशाच्या प्रगतीला खीळ बसते. आता जे घोषण देणे म्हणजे देशभक्ती
समजतात ते वास्तवात देशद्रोह करीत आहेत पण त्यांना कल्पना नाही कारण अज्ञानातील
सुख. आपण आपल्या अंतरंगात डोकावून पहा व तपासणी करून पहा. आपण सर्वात प्रथम
प्राधान्य कोणाला देतो? स्वतःला कि समाजाला? उत्तर स्वतःला असेच मिळणार आहे.
आपण देश व घर भिन्न मानतो,
देश व धर्म भिन्न मानतो, देश धर्म तर लांब प्रसंगी आई, वडील, भाऊ, बहिण यांना
भिन्न मानतो तर समाज व देश खूप लांब आहेत. इतरांची तपासणी करण्यापेक्षा व इतरांना
बदलण्याचा प्रकार ते प्रयत्न करून संघर्ष ते विवाद निर्माण करण्यापेक्षा प्रथम
स्वतःला सुधारा म्हणजे जग सुधारणार आहे. पण आम्ही स्वतःला सुधारलेले मानत इतरांना
सुधारण्याचा प्रकार करतो हाच मुळात समाज द्रोह असून हाच देशद्रोह आहे.
भावना दुखावल्या या
नावाखाली देशात हिंसाचार करीत सामाजिक मालमत्तेचे नुकसान करणारे कोणत्या अर्थाने
देशभक्त आहेत? आपण सहजतेने इतरांच्या देशभक्ती वर प्रश्न चिन्ह निर्माण करतो पण
स्वतः काय करतो याचे भान नाही. घोषणा देत देशाचा विकास व प्रगती होत नाही तर
त्याला वास्तवात कृती करावी लागते. आपण आपल्या कृतीचे विश्लेषण करून पहावे यावरून
आपल्या देशभक्तीचे वास्तव आपल्याला जाणवणार आहे.
Comments
Post a Comment