मी सत्य :- एक गैरसमज


कोणत्याही दोन व्यक्तीमधील, कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही विषयावर सुरु असणारा संवाद पाहताना, काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात.
एक म्हणजे व्यक्ती तत्परतेने प्रतिक्रिया देताना आवेगात व आवेशात असतो. दुसरे म्हणजे तो सहजतेने इतरांचे आकलन संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण करतो, प्रसंगी इतरांना समजत किंवा कळत नाही असा आरोप ते दावा करतो. तिसरे म्हणजे माझा समज अथवा मी ज्यांना मानतो त्यांचा समज हेच अंतिम सत्य आहे. चौथे म्हणजे माझा तो समज व इतरांचा गैरसमज आहे यामुळे इतरांनी माझाच समज सत्य मानत वाटचाल करावी. याप्रकारामुळे कळत-नकळत संवादाचे विवादात रुपांतरण होते यामुळे निष्पत्ती कोणती हे सांगण्याची गरज नाही. अर्थात असा समस्त प्रकार जाणीव पूर्वक घडत नाही तर तो मानवी अज्ञानामुळे घडतो.
वर्तमान मानवाला स्वतः संदर्भात ज्ञान नाही यामुळे स्वतःच्या आकलन सापेक्ष इतरांचे परीक्षण करण्याला तो सत्य मानतो. वास्तवात मानव अज्ञानामुळे व्यक्तिगत मर्यादा दुर्लक्षित करतो.
मत मतांतर हा मानवी स्वभावाचा अविभाज्य घटक आहे यामागे मानवी आकलन आहे. मानवी आकलन मागे त्याचा दृष्टीकोन आहे. मानवाच्या दृष्टीकोन मागे त्याचा संस्कार आहे. संस्कार परत्वे मानवाचा दृष्टीकोन ते आकलन यामध्ये परिवर्तन घडते. दृष्टीकोन व आकलन परत्वे स्वभाव बदलतो यामुळे मुल्यांकन व प्राधान्यक्रम बदलतो यामुळे निकष बदलतात. निकष बदलतात त्याप्रमाणे निष्कर्ष बदलतो.
निष्कर्ष म्हणजे मानवाचे मत आहे. कोणताही व्यक्ती कोणतेही मत व्यक्त करतो त्यामागे त्याचा समग्र स्वभाव आहे. एखाद्या व्यक्तीचे एखादे मत समजावून घेताना जर त्याचा स्वभाव समजला तर त्याचे मत समजणार आहे. सध्या ज्या तत्परतेने प्रतिक्रिया देण्यात येते तसेच त्यामागील आवेग पाहता इतरांना समजावून घेणे कमी व समजावून सांगण्याचा प्रकार अधिक घडतो. थोडक्यात सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न व प्रकार घडतो मात्र स्वर्ग खरेच गाठला का ? यासंदर्भात खातरजमा केली जात नाही कारण अज्ञान.
मानव स्वतःच्या स्वभाव संदर्भात अज्ञानी असल्याने स्वतःच्या निष्कर्षाला-मताला समग्र सत्य मानतो. वर्तमान मानव व्यक्तिगत अज्ञानामुळे सत्याला देखील संकुचित करण्याचा प्रमाद करीत आहे.
मानव व्यक्तिगत आकलन व समज यांना सत्य मानतो मात्र सत्य म्हणजे काय? यासंदर्भात विचार करतो का ? सत्य म्हणजे परिपूर्ण व अपरिवर्तनशील मानवी समज व आकलन हे दृष्टीपरत्वे बदलतात.
मानवाचा दृष्टीकोन, आकलन तसेच मत यामध्ये परिवर्तन घडते कारण अपरीपुर्णत्व. मानवाच्या पाहण्याला मर्यादा आहेत यामुळे तो समग्र पाहत नाही यामुळे समग्र आकलन होत नाही यामुळे त्याचे मत तसेच निष्कर्ष समग्र नाही.
मानवाचा फक्त दृष्टीकोन बदलता आकलन, निष्कर्ष, मत यामध्ये परिवर्तन घडते. प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र दृष्टीकोन आहे यामुळे प्रत्येकाचे आकलन व निष्कर्ष-मत स्वतंत्र आहे.
एक मानव दुसऱ्या मानवाच्या मतावर आक्षेप घेतो मात्र त्यापूर्वी त्या मताचे परीक्षण करतो. याठिकाणी परीक्षण करताना व्यक्तिगत दृष्टीकोन, आकलन, स्वभाव केंद्र मानत परीक्षण करतो वास्तवात ज्या व्यक्तीचे मत त्याचा दृष्टीकोन, आकलन ते स्वभाव केंद्र मानत परीक्षण करण्याची गरज आहे कारण त्याविना मत समजणार नाही. मात्र ज्यांना स्वतःचा दृष्टीकोन, आकलन, स्वभाव यासंदर्भात ज्ञान नाही त्या व्यक्ती इतरांच्या दृष्टीकोन, आकलन, स्वभावाला केंद्र मानत परीक्षण करतील का? याउलट स्वतःचा स्वभाव केंद्र मानत इतरांचा दृष्टीकोन, आकलन, स्वभाव यांना सरळ अयोग्य ठरवतील कारण सुलभता मात्र आपला व्यक्तिगत दृष्टीकोन, आकलन समग्र आहे का ? आपण या समस्त अपरीपूर्ण घटकांना कोणत्या आधारे सत्य समजतो याचा मागोवा घेतला तर समज मधील गैरसमज लक्षात येतो.
समज व गैरसमज भिन्न नसून एक आहेत. जोपर्यंत समज मधील गैर आढळत नाही तोपर्यंत तो एक समज आहे तसेच गैरसमज हा देखील एक समज आहे. आपण आपल्या समज मध्ये काही गैर आहे का याचा मागोवा न घेता समज हेच सत्य मानत आचरण करतो कारण आत्मपरीक्षणाचा अभाव.
आत्मपरीक्षण करण्याविना व्यक्तिगत मर्यादा संदर्भात जाणीव होणार नाही तसेच सत्याची जाणीव होणार नाही. सत्य हे बहुआयामी असून मानव व्यक्तिगत अज्ञान व मर्यादा यामुळे एखादा आयाम पाहतो वर त्याला समग्र सत्य मानतो. वास्तवात मानव जे पाहतो तसेच त्यामधून जे समजतो यामध्ये सत्याचा आयाम आहे मात्र समग्र नाही याचा प्रत्यय घेण्यासाठी एक रुपयाचे नाणे घ्यावे व एका वेळेस समग्र नाणे पाहण्याचा प्रयत्न करून पहावा.
मानव एका वेळेस एका नाण्याची एक बाजू पाहू शकतो ती देखील समग्र स्वरूपात पाहता येत नाही. मानवाला एक वेळेस एका नाण्याची एक बाजू पाहताना समग्रतेने पाहता येत नाही तर अंशात्मक स्वरूपात पाहता येते तर त्या पाहण्याला सत्य मानता येणार का ? अंशात्मक पाण्यातून जे आकलन होणार त्याला सत्य मानणार का ? जो व्यक्ती ज्ञानी तो स्वतःला सत्य मानत नाही याउलट अज्ञानी स्वतःला सत्य मनात यापैकी आपण स्वतः कोणत्या वर्गात मोडतो याचा अभ्यास करून पाहाव म्हणजे समज मधील गैरसमज दूर होण्यास मदत मिळेल. 

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते