हुकूमशाहीच्या दिशेने
भारतीय सामाजिक जीवनात डोकावता भारतीय समाजाची वाटचाल एका हुकुमशाहीला जन्म देण्यास पूरक व पोषक वातावरण निर्माण करीत आहे किंवा करण्यात येत आहे. सध्या भारतीय सामाजिक जीवनात असंतोष, नैराश्य, तणाव व्यापक प्रमाणात आहे. अर्थात हा कालच्या काळात देखील होता मात्र त्याला समूहाच्या गानिमिकाव्याची जोड नव्हती तसेच त्या काळात भारतीय पणा होता मात्र सध्या एका भाषेचे, जातीचे, धर्माचे, व्यवसायाचे, प्रांताचे, जनतेचे, सरकारचे, विरोधीपक्षाचे अधिक मक्तेदार आहेत मात्र भारतीय कमी आहेत.
काही महाभाग यासाठी सरकारला जबाबदार ठरवतात. भारतीय समाजात तो दिवस दूर नाही की एखाद्या घरात मुल जन्माला आले त्याला सरकार जबाबदार तसेच वंध्यत्व असेल तरीही सरकार जबाबदार याप्रकारचे आरोप करण्यात येतील. थोडक्यात कोणत्या प्रकारचा व्यक्ती कोणता आरोप करणार याचा भरवसा नाही. कोणतीही वृत्तवाहिनी पहा याचा प्रत्यय मिळेल. पत्रकार असो की त्यांच्या सांगण्यानुसार असणारा तज्ञ असो की प्रवक्ता असो स्वतःला सत्य मानतात हे त्यांच्या अपरिपक्वतेचे लक्षण आहे. तसेच यांना स्वतःच्या दृष्टी नुसार सृष्टी यासंदर्भात भान नाही. अर्थात भान साठी जान हवी पण जान येण्यासाठी ज्ञान हवे. मुळात ज्ञानाचा अभाव असल्याने जान व भान नाही. चार पुस्तकांचा अभ्यास करून पदवी घेतली की ज्ञान मिळाले हा समज बाळगत वाटचाल करण्यात येते.
पत्रकार असो की तज्ञ अथवा प्रवक्ता हे समस्त वर्तमान समाज व संस्कृतीचे प्रतिनिधी आहेत यामुळे फक्त यांना किंवा निखळ सरकारला जबाबदार मानत स्वतःचे हात झटकण्याचा प्रयत्न करता अपरिपक्वता होणार आहे. कोणत्याही काळातील, कोणताही व्यक्ती, कोणत्याही प्रकारची कृती करतो त्यामागे त्याच्या संस्कारांची निर्णायक भूमिका असते यासंदर्भात ज्ञान होण्यासाठी जीवनाच्या मुक्त विद्यापीठात सतत अभ्यास करावा लागतो मात्र सध्या समाजात अभ्यास करणारे कमी व शिकवणारे अधिक आहेत यामुळेच तुला समजत नाही, तुला काळत नाही या प्रकारची वक्तव्य वारंवार ऐकण्यास मिळतात. स्वतःला खूप कळते किंवा माहिती आहे या संभ्रमात अनेक व्यक्ती वावरतात. यामुळे सध्या समजावून घेणारे कमी व समजावून सांगणारे अधिक आहेत. तसेच ऐकणारे कमी व ऐकवणारे अधिक आहेत याला जबाबदार कोण? तर सामाजिक संस्कार.
सामाजिक जडण-घडण मध्ये एका विशिष्ट वर्गाला जबाबदार ठरवणे तर्कसंगत असेल पण न्यायसंगत किंवा ज्ञान संगत नसेल कारण एकांगीपणा व परीपूर्णत्वाचा अभाव. तर्क हा नेहमी एकांगी असतो मात्र कधीही परीपूर्ण नसतो. वर्तमान समाजात तर्क व एकांगीपणा यांचे प्राबल्य अधिक आहे कारण एकांगीपनाचा संस्कार. तसेच स्वतःच्या एकांगीपनाला परिपूर्ण समजणारे अज्ञान. मानवाने याच एकांगीपणा व अज्ञान यामुळे एकत्र ते विभक्त कुटुंब असा प्रवास करताना स्वार्थ व फायदा यांचा विचार करून आचरण केले याचे परिणाम व दुष्परिणाम दुर्लक्षित करण्यात आले पण त्या दुष्परिणामांना तो सध्या सामोरा जात आहे. विभक्त होताना जो मार्ग अवलंबण्यात आला तो प्रेमाचा होता की मी योग्य, मी लायक, मी सत्य, तुम्ही अयोग्य, असत्य, नालायक हा होता. त्याकाळात लहान असणाऱ्या मुलांनी याच प्रकारचा संस्कार ग्रहण केला.
वर्तमान समाजातील कोणत्याही ठिकाणची, कोणत्याही प्रकारची चर्चा पहा याठिकाणी संस्कारांचा प्रत्यय मिळेल. प्रत्येक ठिकाणी परपरीक्षण करताना जान व भान यांचा अभाव स्पष्ट जाणवतो. आपण आपल्या दृष्टीने श्रुष्टी पाहताना त्याचे जे आकलन करतो किंवा परीक्षण करून जो निष्कर्ष घेतो त्यामागे आपले व्यक्तिगत निकष असतात यासंदर्भात जान व ज्ञान वर्तमान मानवाला नाही. थोडक्यात वर्तमान मानवाला स्वतः संदर्भात ज्ञान नाही यामुळे तो इतरांचे व्यक्तिगत दृष्टी, आकलन व निकष यांच्या आधारे परीक्षण करतो वर त्याला इतरांचे सत्य मानतो. वर्तमान मानव स्वतःचे परीक्षण करण्याच्या फंदात पडत नाही यामुळे त्याला ना धड स्वतःचा स्वभाव समजतो ना धड इतरांचा स्वभाव समजतो मात्र तो सहजतेने इतरांचा निर्णायक होण्याच प्रयत्न करतो ते देखील अपरीपूर्ण दुष्टी व आकलन यांच्या आधारे. प्रयेक व्यक्ती कळत-नकळत स्वतःला इतरांवर लादण्याचा प्रयन्त करतो, इतरांचा निर्णायक होण्याचा प्रयन्त करतो यामुळे संघर्ष घडतो.
कोणत्याही कौटुंबिक जीवनात डोकावता याचा प्रत्यय मिळतो. कुटुंबातील प्रत्येक घटक स्वतःला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष स्वरुपात इतरांवर लादण्याचा प्रयन्त करतो यामुळेच घटस्फोटाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढत आहे. थोडक्यात इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. एकत्र कुटुंब ते विभक्त कुटुंब होण्यामागे जी स्वाभाविकता-मानसिकता होती तसेच त्याचा जो संस्कार झाला त्याचा परिणाम म्हणजे कौटुंबिक कलह, घटस्फोट आहे. नात्यामध्ये तणाव जाणवला तर सरळ विभक्त होणे किंवा वेगळी चूल मांडण्याचा संस्कार घडत होता तसेच आहे.
भारतीय समाजात वेगळा धर्म, प्रांत, जात, भाषा या आधारे वेगळी चूल मांडण्याचा प्रयन्त होत आहे फक्त अस्मिता व स्वाभिमान या गोंडस नावाचा आधार घेत वास्तवात अहंकार कुरवाळण्याचा प्रयन्त होताना दिसतो. आज कोणाला कोणाचा पायपोस नाही. कोणीही कोणाचा आदर करताना स्वतः त्याची पात्रता ठरवण्याचा प्रयन्त करतो ते देखील स्वतःच्या अर्धवट आकलन क्षमतेने तसेच याच आधारे अपमान सुद्धा करतो. यामुळे सामाजिक जीवनात अशांतता आहे तसेच व्यापक प्रमाणात समस्या आहेत. प्रत्येक माणूस स्वतःच्या हिशोबाने इतरांना आचरण करण्यास भाग पडण्याचा प्रयन्त करतो यामुळे अनागोंदी माजत आहे.
माणूस स्वतः इतरांकडून अपेक्षा बाळगतो मात्र अपेक्षाभंग होताच दुसऱ्याला जबाबदार ठरवतो. माणूस स्वतः आशा बाळगतो मात्र निराशा होताच दुसऱ्यावर खापर फोडतो. माझी अशा असो की अपेक्षा ती वाजवी व रास्त मात्र इतरांची अपेक्षा असो की अशा ती अवाजवी व अनाठायी आहे. अधिकार मला मात्र कर्तव्य तुला. वर्तमान समाजात अधिकाराला हावरे व कर्तव्याला बावरे अशी अवस्था आहे या समाजात सगळी कर्तव्य सरकारला आम्हाला मात्र अधिकार प्रसंगी संसदेचे अधिकार सुद्धा आम्हाला ते देखील समाजातील चार डोकी गोळा करून तिला जनआंदोलन व जनसंसद ही उपमा देत समाज व जनता यांची दिशाभूल करणाऱ्या आंदोलनाने परपरीक्षण व असंतोष व्यापक प्रमाणात निर्माण केला.
लोकपाल आंदोलन पूर्वी व नंतर या वर्गीकरणात अभ्यास करता पर परीक्षणाला सत्य व नैतिकतेचा मुखवटा देत स्वार्थ व अहंकार वाटचाल करण्याचे प्रमाण व्यापक झाल्याचे दिसते. गंमत म्हणजे जो धड स्वतःचे घर नीट सांभाळत नाही तो देश कसा चालवावा हे सांगतो. जो स्वतः बेरोजगार तो रोजगार निर्मितीच्या वल्गना करतो. थोडक्यात स्वतःची प्रत्रता व लायकी न तपासता इतरांची लायकी तपासण्याला या आंदोलनाने मोकळे रान दिले तसेच प्रोत्साहन प्रदान केले यापेक्षा घातक म्हणजे होणारा संस्कार. यामुळे देशात भावी काळात अराजकता निर्माण होणे स्वाभाविक आहे.
कोणत्याही देशात अराजकता निर्माण होते तेव्हा एकतर लष्कर किंवा हुकुमशाही निर्माण होते असे इतिहास सांगतो. जन आंदोलन या नावाखाली सरकार व जनता भिन्न असल्याचे सांगण्यात येते तसेच राजकारण व वर्तमान राजकीयप्रणाली म्हणजे चिखल, दलदल सारखी वाच्यता सोबत एक व्यक्ती संसदेपेक्षा उच्च ठरवण्यात येतो तेव्हा त्या देशात लवकरच हुकुमशाही निर्माण होते हा जर्मनीचा इतिहास बोलका आहे.
कोणत्याही देशात एका क्षणात काही होत नाही. प्रत्येक घटनेमागे एक प्रदीर्घ प्रक्रिया असते ती पाहता हुकुमशाहीला पोषक वातावरण निर्माण होत आहे याला दुर्लक्षित करता येणार नाही. थोडक्यात समाजाने पाया रचला त्यावर टीम अण्णा कळस चढवणार की आणखीन कोणी याचे उत्तर भविष्यात मिळेल तसेच भावी पिढी आम्हाला माफ करणार नाही.
आपल्या पूर्वजांनी संघर्षानंतर स्वातंत्र मिळवले मात्र आम्ही स्वैराचार करून ते गमवण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहोत यामुळे सावध होण्याची गरज आहे अन्यथा बैल गेला नी झोपा केला असा प्रकार होत इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. कोण काय करते या पेक्षा आपण काय करतो हे तपासून पहावे. आपले आचरण लोकशाहीस साजेसे की हुकुमशाहीला साजेसे आहे याचा अभ्यास करून पहा म्हणजे प्रत्यय मिळेल. मुळात आमची जडण-घडण हीच मुळात हुकुमशाही वातावरणात होत आहे या वास्तवाला दुर्लक्षित करून निर्णय घेऊ नका ही विनंती.
Comments
Post a Comment