भ्रष्टाचार की शासकीय भ्रष्टाचार


भष्टाचार एक करंट इश्यू आहे. टीम अण्णा व तथाकथित समाजाचे मक्तेदार व ठेकेदार सध्या लोकशाहीच्या नावाखाली उघड हुकुमशाही पद्धतीने वाटचाल करीत आहेत मात्र हा ना स्वैराचार ना भ्रष्टाचार समाजाला जातो हा भाग अलाहिदा. सध्या लोकपाल सारखी संस्था निर्माण करून भ्रष्टाचार रोखण्याच्या गप्पा ते दिवास्वप्ना पाहण्याचा व दर्शवण्याचा प्रयत्न होत आहे मात्र याने भ्रष्टाचार नाहीसा होणार की फक्त शासकीय पातळीवरील भ्रष्टाचार कमी होणार? हा संशोधनाचा तसेच चिंतनाचा विषय व आशय आहे.
      एकंदरीत या समस्त आंदोलनात ‘भ्रष्टाचार’ हा प्रमुख मुद्दा आहे की ‘शासकीय’ पातळीला होणारा भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा आहे? जर भ्रष्टाचार हा मुद्दा असेल तर समाजाला एकाही शब्दाने भ्रष्टाचार न करण्याचे आवाहन का नाही? एकतर सामाजिक पाठींबा मिळणार नाही हे भय किंवा समाज निष्पाप व निरागस असण्या संदर्भातील गैर समाजायुक्त अज्ञान आहे. या दोन्ही अवस्था समाजिक भ्रष्टाचाराला पोषक आहेत यामुळे शासकीय भ्रष्टाचाराला पोषक आहेत.
      मी टीम अण्णा व तथाकथित समाजाच्या मक्तेदार इतका अगाध ज्ञानी नाही पण मला जे समजते त्यानुसार कोणत्याही व्यक्तीच्या, कोणत्याही आचरण मागे त्याचा स्वभाव निर्णायक आहे. किंबहुना आचरण ही स्वभावाची एक निष्पत्ती आहे. स्वभाव ही संस्कारांची निष्पत्ती आहे. जसा संस्कार तशी जडण-घडण तसा स्वभाव व तसेच आचरण आहे. आचरण सगळ्यांना दिसते अथवा सदृश्य आहे मात्र स्वभाव व संस्कार यांना दृश्य स्वरूप नाही. अर्थात हे समजण्यासाठी प्रथम स्वतःचा स्वभाव व संस्कार यांची जाणीव हवी यासाठी आत्मपरीक्षण हवे.
      आत्मपरीक्षण करण्यासाठी ज्ञान व धाडस लागते. ज्ञान मिळवण्यासाठी दृष्टीकोन व्यापक असावा लागतो तसेच स्वतः मधील विद्यार्थी जागरूक असावा लागतो मात्र सध्या चार पुस्तक वाचून पदवी मिळताच माणूस स्वतःला अगाध ज्ञानी समजतो व सरळ परपरीक्षण करतो वर त्याला इतरांचे सत्य मानतो. सध्या शब्दात अकलेचे तारे तोडतो किंवा अर्ध्या हळकुंडाने पिवळा होतो यामुळे दुसऱ्यांचा अनादर करणे तसेच दुसऱ्यांची पात्रता-लायकी ठरवणे असा प्रकार घडतो. या वर्गात मोडणाऱ्या व्यक्ती स्वतःची दृष्टी न पाहता मी पाहतो, मी समजतो, मी सांगतो तीच श्रुष्टी व सत्य असा अट्टाहास करतात. या व्यक्ती कळत नकळत स्वतःच्या मर्यादा दुर्लक्षित करतात यामुळे अतिरेक घडतो.
      भ्रष्टाचार असो की दहशदवाद अथवा नक्षलवाद, बलात्कार, चोरी, हिंसाचार, या सारख्या सामाजिक समस्या मागे अतिरेक किंवा मर्यादा उल्लंघन आहे. टीम अण्णा असो की त्यांचे समर्थक हे देखील मर्यादा उल्लंघन करीत आहेत मात्र त्याला नैतिकता व लोकशाहीतील अधिकाराचा मुखवटा आहे. अर्थात कोणताही मुखवटा काळाच्या ओघात गळून पडतो मात्र तो पर्यंत समाजाचे नुकसान होते. भ्रष्टाचार रोखण्याचा दावा करणारे समाजहिताच्या नावाखाली कायदा व नियम यांचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा भ्रष्टाचार नाही का? नियम असो की कायदा तो सगळ्यांना सारखा आहे. मात्र टीम अण्णा फक्त सरकार व सरकारी प्रणाली मधील भ्रष्टाचार नियंत्रण कायदा तो देखील आम्ही सांगतो तोच असेल तर सक्षम असा अट्टहास करताना सामाजिक भ्रष्टाचाराला मात्र साफ दुर्लक्षित करतात ते का?
      सरकारला एक कायदा व जनतेला मोकळीक. गंमत म्हणजे सरकार असो की सरकारी प्रणाली यामध्ये काम करणारा माणूस आहे तसेच तो देखील याच समाजात जन्म घेत संस्कार ग्रहण करीत लहानाचा मोठा होतो. वर्तमान सरकार असो की सरकारी कर्मचारी यांच्या भ्रष्टाचार मागे कालच्या समाजाचा भ्रष्टाचार आहे. तसेच वर्तमान समाजात जन्म व संस्कार घेणारा उद्याचा नेता व सरकारी कर्मचारी आहे. वर्तमान संस्कार पहिला का?
      मुलगा शाळेत जात नसेल तर तुला हे देतो- ते देतो. तुझा नंबर आला तर हे घेणार-ते देणार. तू माझे काम कर तुला बक्षीस देतो. यासारख्या वातावरणात वाढणारा भावी आयुष्यात काय करणार? पालक स्वतः सोयीस्कररित्या नियम व कायदा यांचे पालन व उल्लंघन करताना मुले पाहतात ती मुले कायद्याचे पालन करणार की त्यामधील पळवाटा शोधण्यात धन्यता मानतील? इतरांचे आचरण तपासण्यापेक्षा थोडे स्वतःचे परीक्षण करून पहा वास्तवाचा प्रत्यय मिळणार आहे. आपण कर्तव्याला प्राधान्य देतो की अधिकाराला याचा विचार करावा. अधिकाराला हावरे व कर्तव्याला बावरे असणाऱ्या समाजात भ्रष्टाचार होणार यात शंका नाही तसेच तो कायद्याने नियंत्रित वा नष्ट होणार नाही अर्थात यासंदर्भात जाणीव होण्याची गरज आहे. जाणीव साठी स्वतःचे परीक्षण हवे मात्र ते न करता इतरांचे परीक्षण करणाऱ्या समाजात कोणता व किती प्रमाणातील भ्रष्टाचार नाहीसा होणार आहे?
                भ्रष्टाचार नाहीसा करण्याची इच्छा असेल तो स्वतःचे परीक्षण करून आचरण करणार मात्र ज्याला सरकारी भ्रष्टाचार संदर्भात असूया, द्वेष, तिरस्कार, उबग तेच कायद्याचा अट्टाहास करणार. थोडक्यात ज्ञानी स्वतःचे परीक्षण करून स्वतःचा भ्रष्टाचार नाहीसा करणार तेच अज्ञानी कायदा करून भ्रष्टाचार नाहीसा करण्याचा देखावा करीत स्वतःचा भ्रष्टाचार झाकण्याचा प्रयत्न करणार. आपण कोणत्या वर्गात मोडतो याचा परीक्षण करून निर्णय घ्यावा.

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते