पुढच्यास ठेच मागचा शहाणा
टीम अण्णा यांच्या मुंबई मधील आंदोलनाच्या अवस्थे पासून समाजाने जर अर्थबोध घेतला तर पुढच्यास ठेच मागचा शहाणा होणार आहे. टीम अण्णा यांचे आंदोलन यशस्वी की अपयशी हा निष्कर्ष व्यक्तीच्या दृष्टी, आकलन सापेक्ष निकषावरून ठरणार आहे. प्रत्येक निष्कर्ष एक शक्यता पेक्षा मुल्यवान नाही तसेच सत्य नाही.
आत्मपरीक्षणात्मक व विवेकी दृष्टीने पाहता या आंदोलनात अतिरेक व अट्टाहास असल्याचे जनतेच्या निदर्शनास आल्याने अल्प अथवा अपेक्षा पेक्षा कमी प्रतिसाद मिळाला या वास्तवाला नाकारता येणार नाही. आंदोलन असो की सामाजिक जीवन अथवा व्यक्तिगत जीवन या सगळ्यात कुठेतरी थांबावे लागते किंवा एक मर्यादा निश्चित करून राहावे लागते मात्र इथे नेमके तेच घडले नाही.
सामाजिक आंदोलनास एक राजकीय स्वरूप देण्यात आले ते देखील स्वतः हून हे स्वरूप घेण्यामागे दबावाचे राजकारण ही भूमिका असे सांगण्यात आले इथे गल्लत झाली. एकीकडे राजकारण म्हणजे दलदल सांगायचे व त्यामध्ये मनसोक्त दगड फेक करायची यामुळे मुलभूत दिशा व आंदोलनाची दशा बदलत गेली. थोडक्यात समाजकारणाची मर्यादा ओलांडून राजकारण झाले कारण कुठे थांबावे याचे भान नव्हते.
मुळात या आंदोलना मागे भान होते का? असा प्रश्न मनात उद्भवतो. कारण या आंदोलनाचा मूळ विषय हा कायद्याने भ्रष्टाचार नियंत्रीत करणे किंवा फक्त शासकीय भ्रष्टाचार नियंत्रण असा संकुचित होता. कायद्याने भ्रष्टाचार नियंत्रण हा विचार संकुचित दृष्टीकोन दर्शवतो. दृष्टीकोन संकुचित असेल तर आकलन देखील संकुचित राहणार. आंदोलनकर्ते संसद व जनसंसद असे विभाजन करतात तसेच एका व्यक्तीला संसदे पेक्षा श्रेष्ठ ठरवतात, आम्ही सामाजिक कार्यासाठी झटतो यामुळे शासनाची थकबाकी देणे लागत नाही, स्वतःच्या सामाजिक संस्थेसाठी इतर संस्थांची फासावूक केली तर चालते हे समस्त संकुचित आकलन द्योतक आहे. यापुढे मी नैतिक आहे यामुळे मी कोणाच्याही चरित्राचे परीक्षण व हनन करण्याची मला मुभा आहे!
परपरीक्षण करताना आपण निरीक्षक आहोत तसेच आपल्या दृष्टीवर पुर्वानुग्रहाचा चष्मा नाही याची खातरजमा करावी लागते. परपरीक्षण करताना दृष्टी व आकलन सापेक्ष निकषावर परीक्षण करून आपण निष्कर्ष घेतो याचे भान राखावे लागते. अन्यथा आपण निरीक्षकाचे समीक्षक ते निर्णायक न्यायाधीश कधी होतो ते समाजत नाही तसेच आपल्या या न्यायात एकांगीपणा असतो यामुळे अन्याय होतो. टीम अन्नाला यासंदर्भात भान नव्हते यामुळे संसद व राजकारण संदर्भात गरळ ओकण्याचा प्रकार घडला अप्रत्याक्षात मर्यादा उल्लंघन झाले तसेच संसदेवर स्वतःला लादण्याचा प्रयत्न करतान आपण लोकशाही मध्ये वावरतो याचे विस्मरण झाले.
टीम अण्णा आंदोलनात जे काही घडले त्यामागे व्यक्तिगत मर्यादा संदर्भात विस्मरण असल्याने समस्त प्रकार घडला. अर्थात यासाठी निखळ टीम अण्णा जबाबदार नाही कारण व्यक्ती आचरण मागे संस्कार आहे. टीम अण्णा असो की भ्रष्टाचारी असो की सामान्य माणूस असो ते सामाजिक संस्कारांचे प्रतिनिधित्व करतात. सामाजिक जीवनात डोकावता याचा प्रत्यय मिळतो. आपण आपले आचरण तपासून पहावे म्हणजे वास्तवाचा प्रत्यय मिळणार आहे.
आम्ही आचरण करताना व्यक्तिगत मर्यादा प्रती भान राखतो का? इथे खरी गंमत आहे. प्रत्येक जन मर्यादा पालन करतो पण ज्याला मर्यादा समजतो, मानतो त्यांचे पालन करतो. मर्यादांची परिभाषा तो स्वतः ठरवतो तसेच त्यानुसार पालन करतो पण तो स्वतः इतरांच्या देखील मर्यादा ठरतो तसेच याला मर्यादा उल्लंघन समजत नाही, असा प्रकार सगळे करतात यामुळे तणाव निर्माण होतो.
आपण मर्यादा पालन करतो की उल्लंघन करतो याची खातरजमा करण्यासाठी आपल्या जीवनात तणाव आहे का ते पहावे. तणाव असेल तर मर्यादा उल्लंघन आहे कारण तणाव ही मर्यादा उल्लंघनाची निषप्पती आहे. आमच्या आशा व अपेक्षांना काही मर्यादा आहेत का? मानवाची वर्तमान जीवनशैली पाहता मानवी जीवन हे आशा व अपेक्षा यांच्या विस्तारासाठी आहे की जगण्यासाठी, आस्वाद घेण्यासाठी असा प्रश्न पडतो. आशा व अपेक्षा हेच जीवन झाले असून त्यांची पूर्तता करण्यासाठी माणूस धावतो आहे. कधी जीवनाची गरज तर कधी जीवनाची तरतूद तर कधी सुरक्षित भवितव्यासाठी यासारख्या गोंडस नावाखाली मर्यादा उल्लंघन करण्यात येते मात्र तणाव वास्तव दर्शवतो.
मर्यादा उल्लंघन करण्यचे काही फायदे मिळतात मात्र त्याचसोबत अप्रत्यक्ष स्वरुपात तोटा देखील होतो अर्थात तो तोटा कालांतराने प्रत्यक्ष स्वरूप धारण करतो मात्र त्यावेळी हा तोटा वेगळा समजण्यात येतो तसेच तो जाणवे पर्यंत वेळ निघून गेलेली असते. जाणारा कोणताही क्षण कशा नेही परत मिळत नाही यामुळे प्रत्येक क्षणात जागरूक राहून मर्यादा पालन करता एक माणूस राम होतो तेच मर्यादा उल्लंघन करता रावण होतो. आपण प्रवास कोणत्या दिशेने करावा हा व्यक्तिगत निर्णय आहे पण तत्पूर्वी टीम अण्णाची अवस्था दुर्लक्षित करू नका.
जर टीम अण्णाने मर्यादेत राहून काम केले असते तर खऱ्या अर्थाने समाजकारण झाले असते अर्थात जर तर पेक्षा वास्तव महत्वाचे आहे हा भाग वेगळा. मर्यादेत राहून काय मिळते असा एक प्रश्न मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे कारण स्वभाव. प्रथम विचार मिळकतीचा. जो मर्यादेत राहतो त्याला अमर्याद मिळते पण जो अमर्याद वागतो त्याला मर्यादित मिळते हे समजण्यास जरा कठीण आहे पण अनुभव घेण्यास सुलभ आहे. फक्त प्रयत्न करून पहावे.
Comments
Post a Comment