भ्रष्ट जनता, भ्रष्ट सरकार


सध्या जेष्ठ सरकार सुधारक श्री. अण्णा हजारे यांच्या आंदोलनात आरोप व प्रत्यारोप करताना भ्रष्टाचाराचा मुलभूत विषय व आशय बाजूला जात मीच योग्य व नैतिक, सत्य असे स्वरूप प्राप्त होताना काही महत्वाचे घातक दुर्लक्षित झाले किंवा करण्यात आले.
      सर्वात प्रथम जनता व सरकार यांना भिन्न समजण्यात आले यामुळे सरळ सरकार व राजकारणी म्हणजे भ्रष्टाचारी तसेच राजकारण म्हणजे दलदल, चिखल याप्रकारची वक्तव्य करण्यात आली. आपण लोकशाही देशात वावरतो किंवा लोकशाही म्हणजे काय याचे विस्मरण अथवा अज्ञान असावे यामुळे याप्रकारची वक्तव्य करण्यात आली असावीत.
      टीम अण्णा यांची लोकशाहीची व्याख्या मला ज्ञात नाही पण नागरिकशास्त्र मध्ये जी लोकशाहीची व्याख्या आहे त्यानुसार लोकांनी, लोकांसाठी, लोकांमार्फत चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही होय. माझ्या माहिती नुसार यासाठी आपल्या देशात रीतसर निवडणुका होतात व जनता आपले प्रतिनिधी निवडतात व ते सरकार स्थापन करतात. अर्थात याला राज्यघटनेची संविधानात्मक कायद्याची चौकट आहे. थोडक्यात नियमावली आहे मात्र जनता हीच सरकार निवडते म्हणजे अप्रत्यक्ष स्वरुपात जनता हीच सरकार आहे. इथे टीम अण्णा सारखे स्वयं घोषित समाजाचे मक्तेदार एकत्र येत सरकार स्थापन करीत नाहीत किंवा मनमानी करीत नाहीत थोडक्यात स्वैराचार नसून संविधानाचार आहे.
      लोकशाहीत जनता असो की सरकार यांना काही अधिकार आहेत पण कर्तव्याचे बंधन देखील आहे. लोकशाहीत सरकार म्हणजे जनतेचे प्रतिनिधित्व. जर वर्तमान सरकार भ्रष्ट असेल तर जनता भ्रष्ट आहे. जर राजकारण दलदल व चिखल असेल तर जनता त्याची निर्माती आहे. कोणताही नेता हा फक्त प्रतिनिधी आहे. कोणताही नेता हा त्याचा समाज, संस्कृती, संस्कार यांचे प्रतिनिधित्व करतो.
      वर्तमान समाजात स्वार्थ, अहंकार यांचे प्राबल्य असल्याने सामाजिक समस्या व्यापक प्रमाणात वाढत आहेत ते देखील कायदा असताना याचे मुलभूत कारण समाजातील नागरिकांचा संस्कार आहे. भारतीय संस्कृती मध्ये कधी काळी आत्मपरीक्षण व परम अर्थ साधणारी संस्कृती होती मात्र एकत्र ते विभक्त होताना स्वार्थ व अहंकाराचा संस्कार घडला. भ्रष्टाचार ही स्वार्थ व अहंकाराची एक निष्पत्ती आहे.
      कधी काळी समाजात समाजकारणातील कर्तुत्व पाहता किंमत-प्रतिष्ठा होती मात्र काळाच्या ओघात पैसा व आर्थिक सुबत्ता पाहून किंमत व प्रतिष्ठा प्रदान करण्यास सुरवात झाली. आज समाजात पैसा म्हणजे कर्तुत्व मोजण्याचा निकष आहे. पैसा असेल तर कर्तुत्ववान अन्यथा नाकर्ता, कार्तुत्वाहीन समजत हेटाळणी करण्यात येते. पैसा कोणत्या मार्गाने येतो याला महत्व नाही. अर्थात याला फक्त सरकार किंवा सरकारी कर्मचारी किंवा राजकारण जबाबदार नाही तर याला सर्वार्थाने समाज जबाबदार आहे  तसेच मी व माझे पूर्वज याच समाजाचे अविभाज्य घटक होते व आहे.
      समाजात परिवर्तन घडवण्याची इच्छा असेल तर प्रारंभ स्वतः पासून करावा लागतो. स्वतःला स्वतःच्या दृष्टीने स्वच्छ समजणे व  वास्तवात असणे यात अंतर आहे. जो वास्तवात स्वच्छ त्याचा आत्मा ते आचरण स्वच्छ असते. स्वच्छ मनाचा माणूस इतरांवर आरोप ते चिखलफेक करणे किंवा संशय घेत नाही थोडक्यात परपरीक्षण करीत नाही तसेच दुसरे काय करतात याची तपासणी करण्याचा फाजील प्रयत्न करीत नाहीत कारण यांना दृष्टी तशी सृष्टी याची जाणीव आहे. दृष्टी बदलताच सृष्टी बदलते. दोष सृष्टीत नसून दृष्टीत आहे मात्र व्यक्तिगत दृष्टी दोष न पाहता, स्वतःचे अज्ञान न पाहता, स्वतःची पात्रता न तपासता स्वंय घोषित स्वैराचारी आचरण ते देखील लोकशाहीत असेल तर याला भ्रष्टता किंवा भ्रष्टाचार समजता येणार की नाही?
      समाजात व्यक्तिगत मतितार्थ (स्वार्थ) व ‘मी’ पणा (अहंकार) यांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष स्वरूपात प्राधान्य देणारे व्यक्तिमत्व म्हणजे बौद्धिक पातळीला भ्रष्ट व्यक्तिमत्व आहे. बुद्धी भ्रष्ट असणारा व्यक्ती स्वैराचार करणार यात शंका नाही. स्वैराचारी व्यक्ती दुराग्रही तसेच अट्टाहास युक्त आचरण करणार यामध्ये शंका नाही मग तो दहशदवादी असो की नक्षलवादी, हिंसाचारी असो की बलात्कारी, भ्रष्टाचारी असो की भ्रष्टाचारी विरोधक असल्याचा देखावा ते कांगावा करीत स्वतःचा अट्टहास समाज व सरकार यावर लादण्याचा प्रयत्न करणारी स्वंय घोषित टीम असो.
      स्वातंत्र्य व स्वैराचार यामध्ये अंतर आहे. तुम्ही तुम्हाला काय वाटते ते मत मांडा पण इतरांची अवहेलना अथवा विटंबना करता स्वैराचार आहे. तुम्ही तुमच्या मताचा आग्रह करा पण अट्टाहास करता स्वैराचार आहे.
      आपण आपले व्यक्तिगत आचरण तपासून पहावे अर्थात धाडस असेल तर अन्यथा सरळ स्वतःची भ्रष्टता मान्य करावी. कारण प्रत्येक व्यक्ती स्वार्थ साधतो तसेच अहंकाराला प्राधान्य देतो, परापरीक्षण करतो, दुसऱ्यांची लायकी ठरतो. थोडक्यात स्वतःच्या डोळ्यातील मुसळ न पाहता इतरांच्या डोळ्यातील कुसळ शोधण्याचा प्रयत्न करतो. स्वतःच्या दृष्टी व आकलन यांच्या मर्यादा न पाहता दुसऱ्यांचे चरित्र ते पात्रता तपासतो ते देखील अपुऱ्या आकलन क्षमतेने. अगोदर स्वतःचा भ्रष्टाचार पहा व तो दूर करावा.
      कोणताही स्वच्छ समाज त्याचे प्रतिनिधित्व करण्यास भ्रष्ट मानवाची निवड करणार का? भ्रष्टाचार असो की कोणतीही घटना थोडे व्यापक दृष्टीने अभ्यासण्याचा प्रयन्त करून पहा प्रचीती मिळेल. मात्र माणूस स्वतःची विद्यार्थी अवस्था विसरतो त्यामुळे त्याची अवस्था मेंढरासारखी होते व एका पाठोपाठ दुसरे निघतात. एकाने सरकारवर टीका केली की दुसऱ्याने सुरवात करायची हा प्रकार लोकशाहीला घातक आहे. यामुळे समाजात अराजकता माजेल कारण परपरीक्षण. जो तो लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र या नावाखाली स्वैराचार करणार वर नैतिकतेचे लेबल. स्वातंत्र या गोंडस नावाखालील स्वैराचार पहायचा असेल तर सामाजिक सांकेतिक स्थळांना भेट द्या वास्तवाचा प्रत्यय मिळेल. याठिकाणी जो तो पर परीक्षण करताना आढळतो तसेच स्वतःला सत्य मानतो यासारखा सामाजिक भ्रष्टाचाराच दुसरा दाखला हवा असेल तर कोणत्याही वृत्त वाहिनीला भेट द्या त्याठिकाणी होणारी चर्चा पहा तिथे परपरीक्षण व मी सत्य असा अट्टहास पाहण्यास मिळेल.
      वाढता भ्रष्टाचार ही खरी पोटदुखी आहे की मला संधी मिळत नाही ही असूया-खंत आहे याचा आत्मपरीक्षणात्मक निर्णय घ्यावा ही विनंती.अखेर दिसते तसे नसते म्हणून जग ............

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते