कायद्यापेक्षा प्रबोधनाची गरज
सध्या मिडिया व समाज यांच्या दृष्टीने भ्रष्टाचार म्हणजे एक “करंट इशु” आहे. भ्रष्टाचाराचा इलाज करण्यासंदर्भात व्यापक प्रमाणात चर्चासत्र ते वादासत्र घडत आहेत. या समस्त चर्चासत्रात भ्रष्टाचाराचा मुलभूत मुद्दा बाजूला राहतो व मी सांगतो, मी सुचवतो तोच उपचार योग्य व अंतिम असा प्रकार घडतो. तुझा उपाय कमकुवत, कुचकामी, त्यामध्ये पळवाटा ते आयोग्यता व त्रूटी आहेत असा युक्तिवाद ते तर्क करण्यात येतो. आरोप ते प्रत्यारोप करण्यात येतात व भ्रष्टाचाराचा मुद्दा बाजूला राहतो व गुद्देगिरी सुरु होते. याठिकाणी गंम्मत म्हणजे या समस्त चर्चेचा मूलाधार काय? या समस्त चर्चेमध्ये निर्णायक कोण तसेच काय तर मी व माझे आकलन.
जगातील कोणत्याही व्यक्तीचे आकलन परिपूर्ण आहे का? जगातील कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही बाबतीत परिपूर्णत्व आहे का? काही महाभाग स्वतःला परिपूर्ण समजतात मात्र समज व वास्तव यामध्ये अंतर आहे. समाजात अनेक व्यक्ती स्वतःला परिपूर्ण व सत्य समजतात कारण अज्ञान. जो मानव स्वतःचे अज्ञान दुर्लक्षित करतो तोच मानव स्वतःला सत्य समजतो तसेच स्वतःच्या माहितीला ज्ञान समजतो यामुळेच स्वतःच्या अपूर्ण माहितीला सत्य मानत अट्टहास करतो. सध्या समाज व मिडिया मधील चर्चा म्हणजे कायद्याने भ्रष्टाचार नियंत्रण ते निर्मुलन करण्याचा प्रयन्त करण्याचा अट्टाहास.
समस्त चर्चा मध्ये ज्ञान किती व माहिती किती? याचे संशोधन करण्याची गरज आहे. कायद्याने भ्रष्टाचार निर्मुलन किंवा नियंत्रण ही समजूत असणारे माहितीला ज्ञान समजतात कारण कायद्याने प्रवृत्ती बदलते, आचरण बदलते ही धारणा. यावर्गवारीत मोडणाऱ्या व्यक्तींना मानवी स्वभावाचे तसेच कायद्याच्या मर्यादा संदर्भात अज्ञान आहे.
भ्रष्टाचार म्हणजे काय? हा प्रश्न दहा-वीस माणसांना करून पहा म्हणजे प्रत्यय मिळेल. आचरणातील भ्रष्टता म्हणजे भ्रष्टाचार. आचरण मागे समग्र स्वभाव आहे तसेच भ्रष्टता या शब्दाची व्याख्या ते परिभाषा ठरवन्यामागे स्वभाव आहे. प्रत्येक व्यक्ती त्याच्या दृष्टीकोन, आकलन, याप्रमाणे भ्रष्टता या शब्दाची व्याख्या करतो.
प्रत्येक घरात लहान मुल असते. लहान मुल हट्ट करते त्यावेळी पालक हट्ट पूर्ण करतात कारण मुलाचे आकांड-तांडव पासून सुटका हवी. एक प्रकारे पालक स्वतःची सुटका करून घेण्यासाठी कळत-नकळत लाच देतात पण याला मुलाचा हट्ट पूर्ण करणे समजण्यात येते. प्रत्येकाला मित्र असतात तसेच त्यांच्याकडे काही काम असते त्यावेळी इच्छा असो व नसो गोड बोलणे किंवा त्याच्या कलेने घ्यावे लागते याठिकाणी भ्रष्टाचार न समजता आपले काम साध्य करणे किंवा स्वार्थ साधने समजण्यात येते. अर्थात कोणत्या व्यक्तीने कोणत्या शब्दाची परिभाषा कोणत्या पद्धतीने करावी यासंदर्भात ज्या त्या व्यक्तीचा स्वभाव निर्णायक आहे मात्र त्याने इतरांची परिभाषा ठरवणे किंवा मुल्यांकन करणे म्हणजे स्वतःचे अज्ञान व अहंकार प्रकट करणे आहे.
भ्रष्टाचाराची एकच परिभाषा निर्माण करण्याची नितांत गरज आहे. अर्थात मी करतो तीच परिभाषा असा अट्टाहास करता काम नये कारण मर्यादा. मानवाच्या दृष्टी व आकलनास निसर्गतः काही मर्यादा आहेत यामुळे मानव तसेच मानवाची निर्मिती परिपूर्ण नाही. कायदा ही मानवाची निर्मिती असल्याने त्यामध्ये परीपुर्णत्वाचा अभाव आहे. सोबत त्रुटींचा सोईस्कररीत्या फायदा घेणे हा मानवाचा उपजत स्वभाव आहे. कायदा निर्माण करून समाजात एक शिस्त निर्माण करता येते परंतु जर समाजाने कायद्याचे पालन केले तर अन्यथा कायदा फक्त पुस्तकामध्ये राहतो. सध्या भारतीय सामाजिक जीवनात कायद्याचे पालन व उल्लंघन यांचे प्रमाण पाहता कायदा वांझोटा ठरत असल्याचे निदर्शनास येते यामागे कायद्याचे पालन नाकारण्याचा संस्कार आहे किंवा सोय सुलभता नुसार पालन व उल्लंघन करण्यचा संस्कार व स्वभाव आहे.
भ्रष्टाचार विरोधी कायदा करून त्याचे समाजाकडून पालन होणार याची कोणतीही शाश्वती नाही याउलट व्यक्तिगत स्वार्थ साधण्यासाठी याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. माहितीचा अधिकार सध्या वर व वधू संशोधन करण्यासाठी वापरण्यात येतो त्या प्रमाणे या लोकपाल कायद्याचा वापर करून व्यापक प्रमाणत भ्रष्टाचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जगातील कोणत्याही देशातील कोणताही कायदा मानवाची प्रवृत्ती बदलण्यास असक्षम आहे मात्र हेच कोणत्याही व्यक्तीला जागरूक करता तो कोणत्याही ज्ञात व अज्ञात कायद्याचे उल्लंघन करीत नाही. अर्थात याठिकाणी जागरुकता म्हणजे झोपण्याशी निगडीत नसून विवेक अभिप्रेत आहे. कोणताही विवेकी माणूस कोणत्याही प्रकारचा प्रमाद करीत नाही. कोणताही विवेकी माणूस कोणत्याही प्रकारची सामाजिक समस्या निर्माण करीत नाही. विवेकी माणूस निर्भय असताना देखील कायद्याचे पालन करतो तेच अहंकारी माणूस भित्र असून कायद्याचे उल्लंघन करतो. तेच अहंकारी मानवाचे प्रबोधन करता त्याचा विवेक सक्रीय होतो. प्रबोधन मानवी स्वभावात व्यापक परिवर्तन घडवते.
अपरीपूर्ण कायदा करून व्याप वाढवण्यापेक्षा सामाजिक प्रबोधन करून समाजाचा विवेक सक्रीय करता समाजात सुव्यवस्था निर्माण होणार आहे. विवेकी समाजात ना भ्रष्टाचार, ना हिंसाचार, ना चोरी ना सीना जोरी याउलट सगळ्यांचा मान-सन्मान होणार आहे. विवेकी समाजात ना उच्च ना नीच समता प्रस्थापित होणार आहे. थोडक्यात प्रत्येक समस्या निवारण करता येणार आहे मात्र त्यासाठी सामाजिक अहंकाराचा बळी द्यावा लागेल पण इथे समाजाचे नेतृत्व करणारेच अहंकारी असल्याने सामाजिक विवेक जागरूक होण्याची शक्यता धुसर आहे. एकदा स्वतः स्वतःचे प्रामाणिक परीक्षण करून पहावे म्हणजे प्रत्यय मिळेल.
Comments
Post a Comment