घातक परिवर्तन(भाग-६)
सामाजिक पातळीला होणाऱ्या समस्त स्वाभाविक
परिवर्तन मधील स्वतःची भूमिका असो कि कर्तव्य दुर्लक्षित करणे अथवा नाकारण्याचा
प्रयन्त करणे म्हणजे थोडक्यात कर्तव्य तसेच जबाबदारी नाकारणे हे समाजाच्या वर्तमान
तसेच भवितव्यासाठी अत्यंत घातक आहे. दुसऱ्या शब्दात खापर इतरांच्या माथी फोडणे असे
म्हणता येणार आहे पण याठिकाणी थोडा फरक म्हणजे स्वतःची कर्तव्य दुर्लक्षित
करण्याचा प्रयत्न तसेच प्रकार आहे.
वर्तमान समाजाची होणारी अधोगती असो कि वाढती
अनैतिकता यामध्ये आपली भूमिका आहे कि नाही? अर्थात इथे सामाजिक प्रवाह बदलणे किंवा
दिशा देणे, समाजसुधारणा करणे यासारख्या अपेक्षा नाहीत मात्र आपण आपल्या परीने
खारीचा वाटा उचलणार आहोत कि नाही?
मी काय करू शकतो, जे सगळे करतात तेच मी करतो, आपण
काय करू शकतो, जे सगळ्यांचे होणार तेच माझे होणार, होणाऱ्या गोष्टी होणार त्या
टाळता येणार नाहीत, याचा माझ्या जीवनाशी काय समंध, याने मला काही फरक पडत नाही
किंवा झळ पोहचत नाही, इथे सवड असो कि आवड आहे कोणाला, याप्रकारची विचारधारा
बाळगणाऱ्या व्यक्तींची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढत आहे.
एकतर बघ्याची भूमिका घेणारे असो कि स्वतःला
कमकुवत समजणारे असो अथवा मला याच्याशी सोयरे-सुतक नाही अशी अलिप्त ते नकारात्मक
भूमिका घेणारे वर्तमान समाजात लक्षणीय प्रमाणात आहेत. या समस्त प्रकारच्या व्यक्ती
वर्तमान तसेच भविष्यातील समाजाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहेत.
वर्तमान समाजात होणाऱ्या प्रत्येक परिवर्तन मागे
कोणी एक व्यक्ती अथवा समूह नाही तसेच एका क्षणात समस्त परिवर्तन घडले नाहीत.
प्रत्येक परिवर्तनाचा प्रवास प्रारंभ हा एक व्यक्ती ते समूह पासून समाज असा प्रवास
आहे. परिवर्तन प्रारंभ होताना ते सूक्ष्म स्वरुपात असल्याने त्याची दखल घेतली गेली
नाही म्हणा किंवा दुर्लक्षित करण्यात आले असे म्हणा याने फारसा फरक पडत नाही. काही
परिवर्तन संदर्भात समाजाने प्रथम टीका-उपहास करणे असा प्रकार घडला मात्र नंतर
त्याच परिवर्तनाचे अनुकरण ते आचरण करण्यात आल्याचे निदर्शनास येते.
परिवर्तन कोणत्याही प्रकारचे असो अहंकारावरून
विवेकाकडे प्रवास असो कि विवेकाकडून अहंकाराकडे प्रवास असो मानवाने प्रथम नकारघंटा
वाजवली पण नंतर त्याचा मार्गाचे अनुकरण केल्याचे इतिहास सांगतो. आपण आपल्या
स्वभावाचे निर्णायक आहोत कि आपला अहंकार आपल्या स्वभावाचा निर्णायक आहे? आपण
स्वतःचे मालक आहोत कि अहंकाराचे गुलाम आहोत याचा प्रथम अभ्यास करून निर्णय घ्यावा
म्हणजे आपण काय केले पाहिजे तसेच आपण काय करू शकतो याचा प्रत्यय येणार आहे.
सामाजिक प्रतिक्रिया कोणती असेल किंवा असावी याचा
विचार न करणे उत्तम. आपण स्वतः काय करतो तसेच करावे याचा विचार उत्तम. प्रथम स्वतः
आत्मपरीक्षण करून वाटचाल करण्याची गरज आहे. अर्थात काही व्यक्ती प्रथम मुर्ख
ठरवतील, वेड्यात काढतील पण याच व्यक्ती नंतर अनुकरण करतील.
आपण इतरांचे अनुकरण करणे किंवा प्रवाहात वाहत
जाणे म्हणजे पुरुषार्थ कि इतरांनी आपले अनुकरण करणे तसेच एक प्रवाह निर्माण करणे,
प्रवाहाला नवीन दिशा देणे म्हणजे पुरुषार्थ याचा विचार करून पहा. आपण आपला विवेक
सक्रीय करून वाटचाल करीत राहणे कठीण आहे का? आम्हाला आमच्या अहंकारावर नियंत्रण
मिळवण्याचा पुरुषार्थ करणे अशक्य आहे का? जो पुरुषार्थ करण्यास असक्षम त्याला
आम्ही कोणते संबोधन प्रदान करतो? दुर्दैवाने त्यांची संख्या वर्तमान समाजात अधिक
आहे. विचार करा आणि निर्णय घ्यावा हि विनंती.
Comments
Post a Comment