घातक परिवर्तन(भाग-९)
वर्तमान समाजात जे
काही परिवर्तन घडतात त्यामध्ये पैसा हा खूप काही ते दैवत असल्याने प्रतिष्ठा असो
की कर्तृत्व यांचे मापदंड ते निकष बदलणे स्वाभाविक आहे. पैसा असेल तर कर्तृत्व
किंवा प्रतिष्ठा अन्यथा अपमान किंवा कर्तृत्वहीन-नालायक ठरवला जातो. तसेच
बेताल-बेलगाम बोलत हिंसा-घृणा-द्वेष-तिरस्कार यांना उघड-जाहीररीत्या खतपाणी
घालणाऱ्या व्यक्तीला प्रतिष्ठा-सन्मान देणे असेल किंवा कर्तृत्व ठरवण्याचा प्रकार
असेल तो सर्रास घडतो.
थोडक्यात कर्तृत्व
असो की प्रतिष्ठा यांचे मापदंड-निकष यामध्ये परिवर्तन घडत आहे. कधी काळी पैसा
किंवा संपत्ती पाहून कर्तृत्व अथवा प्रतिष्ठा मापदंड-निकष होते का? कधी काळी
एकंदरीत समग्र व्यक्तीमत्वाचा विचार तसेच आचार यांना पाहता तसेच त्यांचे सामाजिक
कार्य असो की सामाजिक जीवनातील भूमिका-योगदान यांना अनन्य साधारण महत्व होते.
किंबहुना कधी काळी
किती संपत्ती यापेक्षा ती कोणत्या मार्गाने येते याला अनन्य साधारण महत्व होते
त्यामुळे त्या काळात भ्रष्टाचार हा व्यभिचार समाजला जात होता मात्र वर्तमान काळात
एकतर भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला तसेच माझा भ्रष्टाचार हाच फक्त शिष्टाचार असून
इतरांचा भ्रष्टाचार म्हणजे व्यभिचार आहे. तसेच मला भ्रष्टाचार करण्यास संधी मिळत
नसल्याची असूया म्हणजे नैतिकता आहे. मी असुयापोटी भ्रष्टाचार विरोधात लढा देतो की
वास्तवात भ्रष्टाचार संदर्भात लढा देतो याबद्दल खातरजमा न करता बेताल,बेफाम,
बेलगाम बोलतो कारण मी नैतिक भले त्यामध्ये स्वतःला स्वतःने दिलेले प्रमाणपत्र का
असेना पण मी सांगतो तीच पूर्व दिशाच असा प्रकार करणाऱ्यांना प्रतिष्ठा प्रदान
करण्यात येते.
वर्तमान समाजात
असण्यापेक्षा दिसण्याला महत्व यामुळे संपत्ती असो की प्रतिष्ठा यांचा देखावा-आभास
निर्माण करण्यासाठी माणूस धावतो. तसेच माणूस या दिखाव्याला बळी पडतो. पैसा
असल्याचा देखावा असो की वाम मार्गाने मिळवण्याचा प्रयन्त करण्यात येतो. वर्तमान
मागे कालचा भूतकाळ आहे.
कधी काळी गावात
दुर्मिळ असणाऱ्या घटकांना बाळगणाऱ्या व्यक्तीला सन्मान मिळत होता. सायकल नवीन होती
त्या काळी सायकल असणाऱ्याला प्रतिष्ठा, फोन, दूरचित्रवाणी संच, दुचाकी-चारचाकी
वाहन असणाऱ्याला प्रतिष्ठा देण्यास प्रारंभ झाला. प्रतिष्ठा देणारे घटक उपलब्ध
करण्यासाठी पैसा हवा यासाठी मिळेल तो किंवा दिसेल तो मार्ग योग्य-नैतिक ठरवण्यात
आला. त्याची परिणीती म्हणजे वर्तमान मानवाची भ्रष्टाचारी प्रवृत्ती असेल किंवा
पैसा त्याला प्रतिष्ठा देणे असेल किंवा यामार्गाने ती मिळवण्याचा प्रयन्त असेल
करण्यात येत आहे.
वर्तमान समाजात
ज्याच्या कडे पैसा किंवा सत्ता त्यांच्या मागे लाचार होत फिरणाऱ्या व्यक्तींची
संख्या लक्षणीय आहे. याठिकाणी अस्मिता किंवा स्वाभिमान ना दिसतो ना आठवतो मात्र
भाषा किंवा प्रांत-धर्म संकटात अशी हाकाटी द्या मग पेटून उठतो तसेच हाकाटी
देणाऱ्याला मान-सन्मान ते प्रतिष्ठा देण्यात येते.
समस्त संकल्पना
परिवर्तन स्वीकारताना अथवा त्यामध्ये दुरुस्तीचा प्रयत्न करताना आपण आपल्या
मर्यादा पाहणे किंवा त्यांचे पालन करणे घडते का? तसेच आपण परिवर्तनाची री ओढताना
देखील स्वतःच्या मर्यादांचे भान राखतो का? विचार करून पहा तसेच इतरांच्या
परिवर्तनाचा विचार किंवा आचार करण्यापेक्षा प्रथम स्वतः मध्ये परिवर्तन करावे हे
उत्तम.
Comments
Post a Comment