घातक परिवर्तन(भाग-७)
मानवी स्वभाव केंद्र विवेकाकडून अहंकाराकडे
प्रवास करण्यामुळे मानवी स्वभावात जे काही परिवर्तन घडत आहेत त्यामध्ये
आत्मपरीक्षणाचा अभाव तसेच परपारीक्षणाचा व्यापक प्रभाव आहे. परपरीक्षण करण्यामुळे
स्वतःला दुर्लक्षित करण्यात येते.
सृष्टी पाहताना दृष्टी दुर्लक्षित करण्यामुळे आग
रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असा प्रकार वारंवार घडत असल्याचे निदर्शनास येते.
दुसऱ्या शब्दात जखम पायाला आणि पट्टी डोक्याला असा प्रकार घडतो. सगळ्यात मोठी गंमत
म्हणजे पट्टी करणारा असो कि बंब चालवणारा, त्याला मार्गदर्शन करणारा म्हणतो कि
इतरांना काही काळात नाही मी सांगतो तेच खरे व सत्य बाकी अज्ञानी किंवा स्वार्थी
आहेत.
दृष्टी तशी सृष्टी यासंदर्भात सगळ्यांना माहिती
पण ज्ञान आहे का? माणूस दृष्टी नुसार सृष्टी पाहतो पण अज्ञाना मुळे दृष्टी हीच
सृष्टी मानतो. तसेच स्वतःच्या दृष्टी नुसार सृष्टी मध्ये परिवर्तन ते बदल करण्याचा
प्रयन्त करतो. प्रत्येक माणूस स्वतःच्या सोय तसेच हिशोबाने सृष्टी बदलण्याचा
प्रयन्त करतो. सृष्टी मध्ये इतर व्यक्ती तसेच व्यक्ती समूह यांचा देखील समावेश
असल्याने संघर्ष घडणे अटळ आहे.
वर्तमान मानवाला स्वतःच्या दृष्टी संदर्भात ज्ञान
नसल्याने तो सृष्टी बदलण्याचा प्रयन्त करीत संघर्षाला जन्म देतो पण हेच स्वतःच्या
अहंकारा सोबत संघर्ष करता स्वतःच्या दृष्टी मध्ये परिवर्तन सहज शक्य आहे. दृष्टी
बदलताच सृष्टी बदलते. पण मानवी स्वभावातील अहंकार स्वतः मध्ये परिवर्तन-बदल न करता
इतरांच्यात परिवर्तन-बदल करण्यचा प्रयन्त करतो कारण एकतर इतरांना हीन समजतो तसेच
इतरांना कळत-समजत नाही किंवा कमी अक्कल आहे असा समज बाळगतो.
वर्तमान समाजात जो-तो इतरांना
शिकवण्याचा-समजावण्याचा प्रयत्न करताना आढळतो यामागे कारण काय? स्वतःच्या
स्वाभाविक मर्यादा तसेच अपरीपुर्णत्व यांचे अज्ञान असल्याने माणूस या जगी मी एकटाच
शहाणा असा प्रकार सर्रास करतो. या जगी मी एकटाच शहाणा अशी विचारधारा असणाऱ्या दोन
व्यक्ती एकत्र येतात त्याठिकाणी वाद-विवाद घडणे स्वाभाविक आहे. विवादाचे कलह ते
हिंसाचारात रुपांतरण होणे स्वाभाविक आहे.
सामजिक जीवन असो कि कौटुंबिक जीवन असो त्यामध्ये
सध्या वैचारिक देवाण-घेवाण कमी पण विवाद अधिक होतात. विवादात मुलभूत मुद्दा राहतो
बाजूला सरळ आरोप-प्रत्यारोप यांच्या फैरी झाडण्यात येत वादाचे मूळ कारण असो कि
विषय याचे दोन्ही पक्षांना विस्मरण होते. या संदर्भात प्रत्यय घ्यायचा असेल तर
सामाजिक संकेतिक स्थळांना भेट द्या त्याठिकाणी मिळणाऱ्या प्रतिक्रिया असो कि विवाद
यांचा मागोवा घ्यावा.
थोडक्यात वर्तमान समाजात स्वतःचे अज्ञान
पाहण्याचा संस्कार तसेच संस्कृती आहे का? स्वतःचे अज्ञान पहिल्या-तपासाल्याविना ते
दुर करण्याचा प्रयन्त होणार का? दुसऱ्या शब्दात समाजात बौद्धिक कुपोषण म्हणा किंवा
परिपक्व-प्रगल्भ आकलन अभाव म्हणा याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढत आहे. आपण स्वतः
कोणत्या वर्गात मोडतो याची तपासणी करून पहावी त्याविना कुपोषण दूर करता येणार नाही
किंवा परिपक्वता-प्रगल्भता प्राप्त होणार नाही.
समाजात बौद्धिक कुपोषितांची संख्या म्हणा किंवा
अपरिपक्व ते प्रगल्भतेचा अभाव असणारे आकलन असते त्या समाजाचे भवितव्य काय? जो
वर्तमान आहे त्यामध्ये घडणाऱ्या घटनांचे प्रमाण वाढणार आहे. हिंसाचार असो कि
दहशतवाद, नक्षलवाद, जातीय वाद, धर्मांधता, बलात्कार यासारख्या घटना वाढणार कि कमी
होणार? नेहमी प्रमाणे कायदे कडक नाहीत किंवा सरकार काही करीत नाही असे खापर
फोडण्याचे प्रमाण वाढणार कि कमी होणार?
थोडे आत्मपरीक्षण करून पहा नंतर परिवर्तन कोणत्या
दिशेने करावे याचा निर्णय घ्यावा. आपण भविष्याचे जनक आहोत याचे भान राखावे हि
विनंती.
Comments
Post a Comment