नक्षलवाद: एक दुर्लक्षित समस्या


आज भारता समोर असणाऱ्या प्रमुख समस्या असोत की शत्रू असोत याबद्दल कोणत्याही सामान्य माणसाला विचारणा करता तो एक यादी सांगणार आहे मात्र या यादीत नक्षलवादाचे स्थान असेल का? असेल तर कोणत्या क्रमांकाला असेल? या प्रश्नांची उत्तरे स्वतःला विचारून पहा व खातरजमा करून घ्या.
आज भारतात कोणत्याही शहरात स्फोट घडला आणि तो दहशतवादी असला तर त्याचे प्रक्षेपण असो की चर्चात्मक काथ्याकुट किती दिवस चालतो हे मी सांगण्याची गरज नाही मात्र हाच स्फोट नक्षलवाद्यांचा असेल तर कितीवेळ चर्चा व प्रक्षेपण होते याबद्दल थोडा विचार ते अभ्यास करावा लागणार आहे. मिडीयाच्या आचरणाचा असो की विचारांचा सामाजिक मनावर व्यापक तसेच प्रभावी पगडा आहे.
समाजात अनेक ठिकाणी अनेक विषयावर चर्चा घडते पण या चर्चेत नक्षलवाद हा विषय कधी हाताळला जातो का? यावरती सखोल अभ्यास केला जातो का? नाही तरी आता सखोल अभ्यास करण्याची पद्धत कालबाह्य होत आहे याउलट माझा अभ्यास सखोल व सत्य असा विचार व आचार करण्याची संस्कृती उदयाला येत आहे.
समस्या कोणतीही असो तिला प्रारंभिक काळात दुर्लक्षित करण्यात येते विशेषतः जो पर्यंत मला भेडसावत नाही तो पर्यंत मी त्यासंदर्भात का म्हणून विचार करावा? या प्रकारची मानवी मानसिकता असल्याने कोणतीही समस्या उग्र स्वरूप धारण करीत आवाक्याच्या बाहेर जाते त्यावेळी युद्ध पातळीला प्रयन्त करण्यात येतात. दहशतवाद असो की नक्षलवाद या समस्यांना प्रारंभिक काळात क्षुद्र समजत किंवा माझी समस्या नाही यामुळे मी विचार करणार नाही यामुळे दुर्लक्षित करण्यात आले. आज दहशतवादाने समस्त जगाला ग्रासले आहे.
नक्षलवाद देखील एका व्यक्तीपासून सुरु झाला नंतर एक गाव, तालुका, जिल्हा ते राज्य पासून आता जवळपास समग्र देशात पसरत आहे. नक्षलवादाची पाळेमुळे अनेक देशात पोहचलेली आहेत. गुप्तचर विभागाच्या अहवाल नुसार आता त्यांनी दहशतवादी संघटना सोबत हातमिळवणी केली आहे. तरी देखील आमचा मिडिया सुस्त आहे. नक्षलवादी चळवळीला असणारे जनसमर्थन मग ते स्वेच्छेने असो की दहशतीने असो ते प्रथम खंडीत झाले तर नियंत्रण मिळवता येणार आहे. तसेच सामान्य माणसाने पोलीस असो लष्करी-निमलष्करी दल यांना सहाय्य करण्याची गरज आहे. थोडक्यात जनसमर्थन प्रवाहाची दिशा बदलण्याची गरज असून या कामात मिडीयाची भूमिका केंद्रीय आहे.
मिडीयाने नक्षलवादी चळवळीचे विदारक वास्तव जनते समोर मांडण्याची गरज आहे. आज मिडिया दहशतवाद असो की टीम अण्णा आंदोलन याला जितके प्राधान्य देते तितकेच प्राधान्य जर या प्रश्नाला दिले तर जनजागरण तसेच प्रबोधन होणार आहे. पण मिडीयाला जनजागरण असो की प्रबोधन यांच्या सोबत काही सोयरे-सुतक आहे का? असा प्रश्न पडण्या इतकी आजच्या मिडीयाची विदारक अवस्था आहे. पराकोटीचे बौद्धिक कुपोषण तसेच युद्धपातळीला असणारा परिपक्वतेचा अभाव यामुळे मिडीयाची दुरवस्था आहे. यामुळेच श्री.बच्चन यांच्या घरात मुलगा होणार की मुलगी? असो की आमीर खानच्या कुत्र्याचे नाव काय? हे आजच्या मिडीयाचे राष्ट्रीय प्रश्न आहेत.
धारावाईक मधील काल्पनिक पात्रांच्या जीवनात येणाऱ्या काल्पनिक समस्या साठी व त्यावर चर्चा करण्यासाठी मिडीयाला वेळ आहे पण वास्तविक मानवाच्या जीवनात डोकावणाऱ्या वास्तविक समस्या संदर्भात विचार करण्यास सुद्धा मिडीयाला वेळ नाही. मिडिया सोबत मिडीयाला टी.आर.पी. देणारी जनता देखील तितकीच धन्य आहे. अर्थात मिडिया असो की त्याला प्राधान्याने पाहणारी जनता आज वास्तव आणि विदारकता पाहण्यास तयार नाही कारण ते पाहणारी दृष्टी असो की आत्मसात करणारे आकलन यासाठी लागणारे धाडस नाही.
एकीकडे कसाबला-गुरूला फाशी का देत नाही यासंदर्भात तावातावाने बोलणारे मात्र नक्षलवाद संदर्भात मुग गिळून गप्प का? एखाद्या हिंस्त्र श्वापदाला पिंजऱ्यात बंद केल्यानंतर शेंबडे पोर सुद्धा शेंगा फेकून मारते पण तेच मुक्त संचार करणाऱ्या हिंस्त्र श्वापदाला साधी पाहण्याची हिंम्मत होते का? आज फाशीचा मुद्दा घेत गळा काढणारे राजकारण व समाजकारणात आहेत. सामाजिक सांकेतिक स्थळावर देखील यांचा भरणा आहे पण नक्षलवाद संदर्भात मुग गिळून गप्प का?
आपल्या देशाला दहशतवाद पेक्षा नक्षलवादा कडून अधिक धोका आहे कारण स्वकीयांचे शत्रुत्व. दहशतवादात कमीत कमी परकीय शत्रू सोबत लढा देताना त्याचे स्वरूप माहित आहे पण नक्षलवादात हे स्वरूप तितके स्पष्ट नाही. इथे आपलेच दात आणि आपलेच ओठ आहेत. घराचे वासेच घराशी शत्रुत्व करतात त्या घराचे भवितव्य काय?
एका वर्षात दहशतवाद्यांनी किती हत्या केल्या कोणताही पत्रकार सांगू शकतो मात्र नक्षलवाद्यांनी किती हत्या केल्या? याचे उत्तर देता येणार नाही. एकट्या गडचिरोली जिल्ह्यात एका वर्षात जवळपास ९०० हत्या केल्याचे एका चर्चा सत्रात ऐकले. एकंदरीत नक्षलग्रस्त जिल्हे व त्याचा विचार करून गणित मांडा.
नक्षलवाद म्हणजे सरकारची जबाबदारी किंवा कर्तव्य मानता कामा नये कारण आपण लोकशाहीत आहोत. प्रत्येकाला काही अधिकार सोबत कर्तव्य आहेत. टीम अण्णा सारखे फक्त हक्काचा विचार करून जमणार नाही तर प्रत्येकाने स्वतःच्या परीने कार्य करण्याची गरज आहे. बघा जरा लक्ष देता येते का? 

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते