लोकशाही की हुकुमशाही?


भारतात घटनात्मक लोकशाही आहे. लोकशाही म्हणजे काय हे सगळ्यांना माहित आहे पण ज्ञान किती व्यक्तींना आहे हा मात्र संशोधनाचा एक विषय आहे. वर्तमान भारतीय लोकशाहीची दुरवस्था असो की अनर्थ असो तो पाहता असा विचार मनात डोकावणे स्वाभाविक आहे. जर टीम अण्णा आंदोलन पहिले किंवा जनआंदोलन मानले तर हा विषय गहन व गंभीर होते.
लोकशाही म्हणजे तुम्ही तुमचे मत मांडा त्याचे विश्लेषण करा तसेच इतरांचे मत देखील विचारात घेत त्याचे विश्लेषण करा. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र आहे. आपण आपला व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार बजावतो त्याप्रमाणे इतरांना देखील संधी प्रदान करणे. लोकशाहीत मी स्वच्छ व नैतिक तसेच तू भ्रष्ट व अनैतिक असल्याचे माझे मत असून तुला मत व्यक्त करण्याचा अधिकार नाही असा प्रकार लोकशाही द्योतक आहे का? न्यायालय देखील द्विपक्षीय युक्तिवाद ऐकते थोडक्यात प्रत्येकाला स्वतःची बाजू मांडण्याचा तसेच मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे.
टीम अण्णाला कदाचित लोकशाही मान्य नसावी अथवा मी करेल-सांगेल तीच पूर्व म्हणजे लोकशाही वाटत असावी यामुळे त्यांनी ज्या लोकपाल साठी आग्रह धरला त्याला अमर्याद अधिकार तसेच अनिर्बंधता प्रदान करणारे प्रयोजन त्यांनी केले. थोडक्यात घरात चोर घुसला तर त्याचे निर्मुलन ते निर्दालन करण्यासाठी मागील दाराने दरोडेखोराला निमंत्रण देणे असा प्रकार करण्याचा प्रयन्त करण्यात आला. भारतीय लोकशाही मध्ये कायदा करताना त्यावर सर्वांगीण चर्चा होते यामुळे दरोडेखोराचा प्रवेश प्रलंबित झाला. अर्थात चर्चा टाळण्याचा प्रयन्त करण्यासाठी प्रचंड घाई करणे व त्यासाठी मुदत देण्याचा प्रकार घडला.
एकीकडे चर्चा सुरु असल्याने लोकांचे लक्ष इतरत्र वेधण्यासाठी आंदोलनाचा खटाटोप करण्यात आला याच उतावळेपणाने आंदोलनास धाप लागली. लोकशाहीत कोणालाही अमर्याद अधिकार- ताकद-सत्ता नाही तर प्रत्येकावर काही निर्बंध देखील आहेत अर्थात यासंदर्भात आकलन होण्यासाठी लोकशाहीचा अभ्यास करणे ते लोकशाही आत्मसात करावी लागते पण ज्यांना मी सांगेन तीच पूर्व करण्याची सवय असते त्यांना ना लोकशाही समजते ना उमजते.
अण्णांच्या हुकुमशाही वागण्याला कंटाळून अनेक सहकाऱ्यांनी त्यांना तसेच त्यांच्या आंदोलनास राम-राम ठोकला आहे. अण्णांच्या प्रत्येक आंदोलनात सहकारी नवीन असतात तसेच जुन्या सहकाऱ्यांनी पाठ फिरवलेली असते. बाबा आढव, मोहन धारिया, डॉ.कुमार सप्तर्षी सारखे हाडाचे चळवळकर्ते दुरावण्या मागे अण्णांची हुकुमशाही म्हणा की एकाला चलो म्हणा करणारी प्रवृत्ती जबाबदार आहे.अण्णा इतरांच्या मताला-विचाराला भीक घालत नाहीत कारण ‘मी’ नैतिक ‘मी’ स्वच्छ पण परिपूर्ण आहे का? सर्वज्ञ आहे का? एक व्यक्ती अथवा एक समूह परिपूर्ण होण्यासाठी लोकशाही महत्वाची आहे.
लोकशाही मध्ये मत-मतांतर यांचा एकत्रित विचार करून त्यावर भिन्न-भिन्न दृष्टीने अभ्यास करून एक सामुहिक मत ते देखील सुवर्ण मध्य साधणारे मत निर्माण करण्याचा प्रयन्त करण्यात येतो मात्र टीम अण्णाला सर्वमत अथवा सर्वांगीण चर्चा नको असावी यासाठी जे आम्ही सांगतो त्यामधील काना मात्र ते स्वल्पविराम यासह कायदा केला तर लायक, भ्रष्टाचार विरोधक अन्यथा तुम्ही नालायक तसेच कमकुवत कायदा करण्याच्या दृष्टीने वाटचाल करता कारण तुम्ही भ्रष्ट.
जागतिक हुकुमशाही संदर्भात मागोवा घेतला तर त्याठिकाणी सर्वात प्रथम तत्कालीन राज्य व्यवस्था संदर्भात असंतोष निर्माण करीत लोकांच्या नैराश्य तसेच अज्ञानाचा गैरफायदा घेत अराजकता निर्माण करणे, राज्यकर्ते संदर्भात अनादर निर्माण करून जनमत प्रक्षोभित करायचे, राज्यप्रणाली मध्ये अपेक्षित बदल करून घ्यायचे आणि सत्तांतर घडवत हुकुमशाही निर्माण करणे असा क्रम आहे.
टीम अण्णा त्याच मार्गावरून वाटचाल करीत आहे का? जनतेमध्ये भ्रष्टाचार संदर्भात असणारा असंतोष हा असुयापोटी की त्रासापोटी हा संशोधनाचा एक विषय पण तो नंतर. जनामतातील भ्रष्टाचार मुद्दा घेत नेते असो की राजकारण यासंदर्भात मत कलुषित करण्यात आले तसेच अनिर्बंध, अमर्याद असा व्यक्ती एका पदावर बसण्याची तरतूद करण्यासाठी अट्टाहास ते इतरांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करण्यात आला.
लोकशाही मध्ये तुम्ही तुमचे मत मांडा पण ते इतरांवर लादणारा अट्टाहास करता येणार नाही. आपल्या मतांमधील त्रूटी आपण स्वतः पाहण्यास असक्षम आहोत तर कमीत कमी जो विरोधक आहे त्याच्या मताला नीट ऐकावे म्हणजे त्रूटी संदर्भात विचार करता येतो पण इथे पुर्वानुग्रह की जाणीवपूर्वक इतरांच्या मताला व्यक्त करण्याची संधी नाकारण्याचा प्रयन्त ते प्रकार करण्यात येत आहे. क्षणभर उद्देश योग्य मानला तर मार्ग देखील योग्य पाहिजे पण इथे मार्ग असंविधानात्मक आहे.
भारतीय लोकशाही ही भारतीय संविधानाने चालते. भारतीय संविधान हे मुलभूत-मार्गदर्शक आहे त्यानुसार राज्यप्रणाली काम करण्यास बांधील आहे. ज्याठिकाणी संविधानाचे उल्लंघन त्याठिकाणी भ्रष्टाचार आहे. आपण स्वतः कधी संविधान वाचले आहे का? तर आत्मसात करणे खूप अंतरावर आहे पण न वाचता, न आत्मसात करता सरळ जीभ उचलून टाळ्याला लावणे अत्यंत सुलभ आहे. अर्थात हा प्रकार म्हणजे लोकशाहीतील स्वैराचार तसेच नैतिक दृष्टीने भ्रष्टाचार आहे. टीम अण्णाला संविधानात्मक मार्गाचे वावडे आहे कारण संविधान पेक्षा आम्ही मोठे आहोत असा यांना दंभ आहे. संसद पेक्षा आम्ही मोठे म्हणजे काय? संविधान तसेच देश यापेक्षा मोठे आहोत.
टीम अण्णा संविधानात्मक मार्गाने वाटचाल करण्यास असमर्थ आहे कारण त्यांना आपण स्वतः किती पाण्यात आहोत याची कल्पना आहे. संविधानात्मक मार्गाने निवडणुका लढवा म्हणजे खऱ्या अर्थाने जन प्रतिनिधी होत लोकनियुक्त जन संसदेत येत हवा तो कायदा करा याला कोणाचाही आक्षेप नाही पण एकंदरीत राज्यप्रणाली मध्ये हवा तो बदल तो देखील असंविधानात्मक मार्गाने करण्यामागे हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करण्याचे लक्षण आहे.
टीम अण्णा मध्ये किती लोकशाही आहे हाच मुळात संशोधनाचा विषय आहे आणि हीच टीम विधेयक-कायदा निर्माण करणार तो लोकशाहीला पूरक-पोषक असेल का? मुळात ज्यांचे आचरण स्वैराचार साजेसे तसेच स्वैराचाराला प्रवृत्त ते प्रोत्साहित करणारे आहे ते लोकशाहीला प्रगल्भ तसेच पोषक करणारा कायदा निर्माण करतील? जे नेत्यांच्या स्वातंत्र्यावर आज प्रत्यक्षात घाला घालतात ते उद्या सामान्य जनतेच्या स्वातंत्र वर घाला घालणार नाहीत का? वास्तवात आजच ते अप्रत्याक्षात घाला घालत आहेत कारण नेते जनतेचे प्रतिनिधी आहेत.
टीम अण्णा स्वयंघोषित प्रतिनिधी तेच नेते संविधानात्मक प्रतिनिधी आहेत. दोघे जनतेचे प्रतिनिधित्व करतात. आज लोकशाही समाजातील असो की देशातील यामध्ये लोकशाही पेक्षा हुकुमशाही प्रवृत्तीचे लोक अधिक प्रमाणात आहेत कारण घरातील जडण-घडण हुकुमशाही वातावरणात होते. आपल्या घरात सगळ्यांना व्यक्तिगत मत प्रकट करणे ते सर्वानुमते अंमलबजावणी करण्याचा प्रकार घडतो का? प्रथम इथे सुधारणा करण्याची गरज आहे. अर्थात कायदा करून नव्हे तर प्रबोधन करून.
आज घरात लोकशाही निर्माण झाली तर समाज व देशातील लोकशाही प्रगल्भ ते परिपक्व होणार आहे अन्यथा हुकुमशाहीची नांदी होणार यामध्ये शंका नाही. हुकुमशाही एका दिवसात निर्माण होत नाही तर त्यामागे एक प्रदीर्घ प्रकिया सुप्तावस्थेत सुरु असते त्याचे एक द्योतक म्हणजे हे आंदोलन आहे.    

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते