महागाई विरुद्ध बोंब पण चोरी बाबत आळीमिळी गुपचिळी का?


महाराष्ट्राचा अर्थ संकल्प सादर झाला त्यामधील घरगुती गँस वरील कर वाढ होताच विरोधक असो की जनता यांना आयते कोलीत मिळाले. सगळ्या थरातून भाव वाढीला विरोध करण्यात आला अर्थात यामध्ये काही महाभागांनी स्वतःची पोपटपंची साधली. पोपटपंचीच कारण भाववाढीचा विरोध करणारे घरगुती गँसचा होणारा गैरवापर संदर्भात मात्र आळीमिळी गुपचिळी का करतात?
गावा-गावातील हॉटेल व्यावसाईक असोत की गँसवर चालणारे चारचाकी वाहन असोत यामध्ये सर्रास घरगुती गँसचा वापर करताना आढळतात. अर्थात काही व्यक्ती यासाठी जास्तीचे पैसे देखील मोजतात. गँसचा दुकानदार असो की ग्राहक काळाबाजार करून पैसे कमावतात हे एक उघड गुपित आहे. सगळा प्रकार राजरोस पणाने सुरु आहे पण यासंदर्भात स्वतःला लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ समजणारे असो की स्वतःला समस्त समाजाचे स्वयंघोषित प्रतिनिधी समजणारे टीम अण्णा सदस्य असोत मुग गिळून गप्प का बसतात?
पत्रकार असो की टीम अण्णा अथवा सामाजिक घटक असोत सध्या सरकार त्याचे कर्तव्य करीत नाही यासाठी बेंबीच्या देठा पासून ओरडत आहे पण यापैकी किती व्यक्ती प्रथम स्वतःच्या कर्तव्याचे पालन करतात? समाजात अधिकाराला हावरे पण कर्तव्याला बावरे अशी अवस्था असणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे यामुळेच हक्क-अधिकार यांच्या साठी लढा दिला जातो पण कर्तव्याला सरळ वाटण्याच्या अक्षता लावण्यात येतात. ज्याला लोकशाही संदर्भात कवडीचे ज्ञान आहे तो देखील कर्तव्य मान्य करतो, पालन करतो मात्र ज्यांना कवडीचे ज्ञान नाही ते फक्त अधिकार-हक्क यासाठी लढा देताना कर्तव्याला साफ दुर्लक्षित करतात मात्र सरकारला न चुकता-न विसरता त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देतात.
आज समाजात जवळपास ३० ते ४०% घरगुती गँसचा काळाबाजार ते गैरवापर होते. यासंदर्भात सरकारने कारवाई करावी ही अपेक्षा बाळगणारे स्वतः काय करतात? आज गावा-गावात हा प्रकार राजरोस चालतो मात्र गावातील सामान्य माणूस, पोलीस असो की पत्रकार अथवा तथाकथिक समाजसेवक(सरकार विरोधक) काय करतात? मुग गिळून गप्प बसतात त्याचे कारण काय? यासंदर्भात कधी कोणते आंदोलन अथवा ब्रेकिंग न्यूज झाल्याचे पाहण्यात किंवा ऐकण्यात नाही. श्री.अमिताभ बच्चन यांना नातू होणार की नात यासाठी धावणारे पत्रकार असोत की एखाद्या नेत्याची बाईट घेण्यासाठी धावणाऱ्या पत्रकारांना काळाबाजार पाहावा-शोधावे-त्याचे कव्हरेज करावे याबद्दल सुचत नसेल? तर पत्रकार-वार्ताहर म्हणून काम करण्यास या व्यक्ती लायक आहेत का?
टीम अण्णा सदस्यांना हा राजरोस भ्रष्टाचार दिसत नसेल किंवा दिसत असताना त्याबद्दल ते चकार शब्दाने बोलत नसतील तर त्यांचा लढा खरोखर भ्रष्टाचार विरुद्ध आहे की लोकशाही विरुद्ध आहे अशी शंका निर्माण होते? सामान्य माणूस भ्रष्टाचार करीत नाही असा त्यांचा गोड-गैरसमज असेल तर त्यांना जनतेचे नेतृत्व करण्याचा अधिकार आहे का?
सामान्य माणूस समस्त प्रकारचा कर भरणा करताना किती प्रामाणिक असतो याबद्दल चर्चा न करणे उत्तम पण दुसऱ्यांचा काळा पैसा दिसतो त्याबद्दल आंदोलन होते पण देशातील काळा बाजार कोणत्याही प्रकारचा असो त्याबद्दल आळीमिळी गुपचिळी का? सामान्य माणूस घरगुती गँसचा जो काळा बाजार करतो त्यामुळे महागाई वाढत नाही का?  घरगुती गँससाठी सरकार जे अनुदान देते त्यासाठी लागणारा पैसा करांच्या माध्यमातून गोळा केला जातो. एकीकडे करचुकवणे तर दुसरी कडे काळा बाजार करणे यासारखी कृत्य करून आम्ही देशप्रेमी आहोत यासाठी कसाबच्या फाशीची मागणी करतो. धन्य ती जनता आणि धन्य तो देश. या देशात सगळे राम भरोसे का चालणार नाही. थोडा विचार करून पहा.
स्वतःला नैतिक समजणे आणि वास्तवात असणे यामधील तफावत लक्षात घेतली तर काळा बाजार असो की भ्रष्टाचार थांबणार आहे. कायदा करून फक्त एका कायद्याची भर किंवा काय द्यायचे याची भर होणार आहे. प्रथम कर्तव्याचे पालन ठीक-ठाक केले तर कायदा किंवा अधिकार यांची गरज भासणार नाही कारण विवेकी व ज्ञानी कर्तव्याचे पालन करतात त्यामुळे कायद्याचे पालन करतात तिथे अधिकाराची गरज भासत नाही. प्रथम स्वतःचा काळा बाजार थांबवा नंतर महागाई संदर्भात आरडा-ओरडा करावा लागतो का? ते पहा.

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते