कृषीप्रधान, क्रिकेटप्रधान, मद्यप्रधान की पिचकारीप्रधान........


आम्ही शालेय जीवनात असताना भारत एक कृषीप्रधान देश असल्याचे आम्हाला शिकवण्यात-सांगण्यात आले. भारतीय संस्कृती असो की अर्थ व्यवस्था ही कधी काळी शेती प्रधान होती यासंदर्भात कोणाचेही दुमत नाही मात्र परिवर्तन हा निसर्ग नियम यामुळे संस्कृती असो की अर्थ व्यवस्था त्यामागील प्राधान्य घटक असो की पार्श्वभूमी असो त्यामध्ये परिवर्तन होणे स्वाभाविक-नैसर्गिक आहे.
वर्तमान भारतीय संस्कृती असो की अर्थ व्यवस्था असो त्यामधील प्राधान्य घटक कोणता? कृषी प्रधान हे परंपरागत-पठडीतील किंवा पाठ केलेले उत्तर देणे सोपे आहे पण वास्तव पाहणे असो की स्वीकारणे असो जरा कठीण आहे. मी परपरीक्षण वादी किंवा टीम अण्णा सदस्य अथवा विरोधी पक्ष नेता, पत्रकार नाही यामुळे सगळे खापर सरकारच्या माथी मारणे व स्वतःची जबाबदारी-कर्तव्य यांना पाठ दाखवणे मला जमत नाही. मी स्वतः काय पाहतो तसेच त्यामधून काय समजतो व वागतो याचा प्राधान्याने विचार करतो.
वर्तमान समाजात कृषी क्षेत्राला कितपत प्राधान्य दिले जाते? तसेच क्रिकेट, दारू, तंबाखू-गुटखा-पान यांना कितपत प्राधान्य दिले जाते? कधी काळी भारतीय संस्कृती मध्ये फक्त वावर(शेत) महत्वाचे होते नंतर त्यामध्ये पावरची(सत्ता) भर पडली. पावर मधील वावर वाढत गेला त्यामुळे वावर मधील वावर कमी झाला. सोबत उद्योग धंदा वाढत गेला यामुळे हातात पैसा खेळण्यास प्रारंभ झाला. यामुळेच सामान्य माणसाची गरिबीची व्याख्या म्हणजे अन्न,वस्त्र,निवारा,मनोरंजन या समस्त गरजा भागतात तो गरीब.
भारतातील गरिबांची संख्या लक्षणीय आहे यामुळेच अरबो रुपयांचे आय.पी.एल. होते तसेच क्रिकेट बोर्ड ची संपत्ती एका राज्याची अर्थव्यवस्था पेक्षा अधिक आहे. तसेच या गरीब देशात रोजची दारू ती देखील अधिकृतरित्या किती खपते? आज मी निरे सारख्या ग्रामीण भागात राहतो ज्याची सरकारी लोकसंख्या १२हजार आहे समस्त पंचक्रोशी सह ३०हजार लोकसंख्या असणाऱ्या गावात जवळपास ५०हजार रुपयांची दारू रोज विकली जाते. जर या सरासरीत समग्र देशाचा विचार केला तर कृषी प्रधान,क्रिकेट की मद्य प्रदान असा प्रश्न पडतो.
तंबाखू-गुटखा खाऊन कुठे-कोणत्याही क्षणी, कोणत्याही पद्धतीने पिचकारी मारणे हा आम्हा भारतीयांचा जन्म सिद्ध अधिकार आहे. आम्ही कुठे पिचकारी मारावी हे आम्ही ठरवताना आम्हाला स्वतःच्या सोयीला प्राधान्य देण्याची सवय आहे. भले ती पिचकारी दुसऱ्यांच्या अंगावर उडो की दारावर उडो आम्हाला काही देणे घेणे नाही. ज्या ठिकाणी लोकांचा अधिक वावर त्याठिकाणी पिचाकारीचे रंग काम हमखास पाहण्यास मिळते. पिचकारी मारणे ती देखील मनाला वाटेल तेव्हा व मनाला वाटेल त्याठिकाणी हा संस्कार असल्याने संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे.
संस्कार व संस्कृती मानवाची जडण-घडण करतात त्याप्रमाणे मानवाचा प्राधान्य क्रम बदलतो. आपण स्वतःच्या अंतरंगात डोकावून याच प्रत्यय घेऊ शकता. आपण स्वतः कोणत्या घटकाला प्राधान्य देतो याचा थोडा मागोवा घेऊन पहा म्हणजे कृषी, क्रिकेट,मद्य,पिचकारी, द्वेष, घृणा, जात,धर्म,भाषा,प्रांत यासारखे अनेक प्राधन्य घटक मिळणार आहेत. सर्वात महत्वाचा घटक म्हणजे ‘मी’ प्राधन्य आहे की नाही त्याची खातरजमा करून घ्यावी.

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते