अर्धवट इलाज का?
टीम अण्णा तसेच बाबा
रामदेव यांच्यातील जी काही समानता आहे ती म्हणजे अर्धवट इलाज करण्याचा अट्टाहास.
इथे अर्धवट कारण टीम अण्णा सामान्य माणूस तसेच समाजातील भ्रष्ट प्रवृत्ती संदर्भात
मुग गिळून गप्प आहे तेच बाबा भारतात असणाऱ्या काळ्या पैशा संदर्भात मौन बाळगून आहेत.
भ्रष्ट समाज भ्रष्ट
नेता निर्माण करतो कारण संस्कार. नेता असो की अधिकारी याच समाजात जन्माला येत याच
समाजात संस्कार घेत लहानाचे मोठे होतात. आज स्वार्थ साधण्याचा संस्कार घरा घरात
पाहण्यास मिळतो पण त्याला स्वार्थ साधने असे समजले जाते मात्र हाच प्रकार नेता वा
अधिकारी करतो त्यावेळी भ्रष्टाचार ठरतो तेच टीम अण्णा सदस्य करतात त्यावेळी
शिष्टाचार ठरतो हा भाग वेगळा.
भ्रष्टाचार विरोधी
आंदोलनच्या नावाखाली फक्त शासकीय भ्रष्टाचार संदर्भात वाच्यता करणाऱ्यांना
भ्रष्टाचाराचे मूळ उगम स्थान ना दिसले ना यासंदर्भात बोलले. कमीतकमी समाजाला चार
ओळींचे अवाहन करून अथवा मी भ्रष्टाचार करणार नाही अशी एक प्रतिज्ञा घेण्याचे अवाहन
करून आंदोलन केले असते तर तो पूर्ण इलाज वाटला असता मात्र इथे आंदोलन एक सोपस्कर
अथवा सोयीस्कर ते अर्धवट इलाज भासते याबद्दल कधी विचार केला का?
बाबा रामदेव यांचे
परकीय देशात असणाऱ्या काळ्या पैश्याला भारतात घेऊन येण्या संदर्भातील आंदोलन
म्हणजे काय? आपल्या देशात असणारा काळा पैसा देणगी घेत सफेद केला जातो तसेच परदेशात
असणारा काळा पैसा अत्यंत नगण्य आहे यापेक्षा अनंत पटीने जास्त काळा पैसा आपल्याच
देशात आहे. जर हा पैसा बाहेर काढला तर देशाची एक पंचवार्षिक योजना पूर्ण होणार ती
देखील शिलकेला निधी ठेवत तसेच देशावरील समस्त कर्ज मोकळे करून याबद्दल सगळ्यांना
माहिती आहे पण त्याकडे लक्ष दिले तर माझा काळा पैसा बाहेर पडणार आहे. बाबा याबद्दल
काहीच बोलण्यास तयार नाहीत ते का? तेरी भी चूप मेरी भी चूप की अज्ञान?
अण्णा असोत की बाबा
वास्तवात अर्धा इलाज करतात त्याचे नेमके कारण काय? टीम अण्णा सारखे इतरांचे उद्देश
मोजणारे मशीन माझ्या कडे नाही यामुळे मी शक्यता आधारित विचार करतो. एक तर
भ्रष्टाचार असो की काळा पैसा यासंदर्भात अज्ञान असावे अथवा वेड पांघरून पेडगावला
जाण्याचा प्रकार असो. मी एक डॉक्टर यामुळे त्या भाषेत विचार करतो.
समाजात डॉक्टर दोन
प्रकारचे असतात एक स्वतः अर्धवट असतात मात्र त्याचा विचार न करता इलाज करतात.
अर्धा डॉक्टर पूर्ण इलाज करणार का? एक डॉक्टर पूर्ण जाणकार असतो पण मुद्दाम अर्धा
इलाज करतो कारण पैसा मिळत राहावा, फायदा मिळत राहावा. थोडक्यात रुग्णाच्या
अज्ञानाचा गैरफायदा घेणारे डॉक्टर देखील अर्धा इलाज करतात.
अण्णा व बाबा यांना
त्यांच्या विषयाचे ज्ञान नसेल तर त्यांनी आंदोलन करावे का? इथे मिडिया वास्तव न
पाहता उदोउदो करून स्वतःचे भांडवल गोळा करण्याचे कारण काय? इथे देखील त्याच शक्यता
आहेत. अज्ञान अथवा वेड पांघरणे. यांना समर्थन देणारे तरी वेगळे काय करतात? जरा
स्वतःच्या आत डोकावण्याचा प्रयत्न करून पहा म्हणजे वास्तव समोर येणार आहे.
अण्णा व बाबा यांची
उंची पाहता त्यांना अज्ञानी म्हणावे तरी पंचाईत नाही म्हणावे तरी पंचाईत? कदाचित
त्यांना ज्ञान आहे पण समर्थन मिळणार नाही याचा विचार करून त्यांनी यासंदर्भात मौन
बाळगले असावे. एखाद्याने विचारले तर यथा राजा तथा प्रजा सांगत सुटका करता येणार
आहे पण राजेशाही भारतीय इतिहासात जमा झाली असून आता लोकशाही म्हणजे यथा प्रजा तथा
राजा असा प्रकार आहे. जनता काय करू शकते याच अनेक दिग्गज नेत्यांनी अनुभव घेतला
आहे आणि तोच अनुभव यांना मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अण्णा आणि बाबा
यांच्या आंदोलनात अनेक आभास आणि वास्तव आहेत. फक्त जरा जवळून पाहण्याची गरज आहे.
चळवळ की वळवळ?( आभास की वास्तव?) या माझ्या पुस्तकाचे लिखाण झाले असून पुढील
संस्कार सुरु आहेत. या पुस्तकात मी माझ्या परीने आढावा घेतला आहे. फक्त उद्देश
मोजणारे मशीन उपलब्ध न झाल्याने सत्याचा दावा अथवा अट्टाहास न करता निर्णय
वाचकांवर सोपवला आहे.
Comments
Post a Comment