तडजोड की जोडतोड
वर्तमान पत्र म्हणजे सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब दर्शवणारा आरसा आहे. वर्तमान पत्रामुळे सामाजिक जीवनातील घडामोडींचा प्रत्यय मिळतो. वर्तमान समाजात घटस्फोटाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढत असल्याचे निदर्शनास येते. किंबहुना वाढता घटस्फोट पाहून दस्तरखुद्द न्यायालयाने यासंदर्भात चिंता व्यक्त केली. सध्या घटस्फोट म्हणजे एक सामाजिक समस्या हे स्वरूप धारण करीत आहे. गंमत म्हणजे कधी काळी समाधान असणारा घटस्फोट आज समस्या हे स्वरूप धारण करीत आहे. अर्थात काही लोक घटस्फोटाला समाधान समजतात यामुळेच घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. घटस्फोट म्हणजे समस्या समजणाऱ्या व्यक्तींची संख्या नगण्य आहे तसेच समाधान समजणारे अधिक प्रमाणात आहेत.
घटस्फोटाचे वाढते प्रमाण सामाजिक जीवनाला हानिकारक आहे याची जाणीव असणाऱ्या व्यक्ती एक समस्या समजतात. तेच व्यक्तिगत जीवनाला हानिकारक असणारे कौटुंबिक जीवन असा समज असणारे घटस्फोटाला समाधान समजतात. प्रत्येक व्यक्ती व्यक्तिगत दृष्टीने योग्य आहे मात्र इतरांच्या दृष्टीने अयोग्य देखील आहे. योग्य व अयोग्य या निखळ सापेक्ष संकल्पना आहेत. योग्य विना अयोग्य तसेच अयोग्य विना योग्य ठरवता येत नाही. योग्य-अयोग्य या परस्परविरोधी व परस्परपूरक संकल्पना आहेत. या संकल्प्नांची परिभाषा व्यक्तिपरत्वे बदलतात कारण परिभाषा निर्माण करणारे आकलन, दृष्टीकोन व्यक्तिपरत्वे बदलतो. आकलन व दृष्टीकोन हा संस्कार परत्वे बदलतो. मात्र मानवाला स्वतः संदर्भात ज्ञान नाही यामुळे तो स्वतःचे योग्य हे अंतिम सत्य किंवा जागतिक योग्य मानतो यामुळे माझे योग्य सगळ्यांनी मानावे हा अट्टाहास करतो यातून संवादाच विवाद घडतो. घटस्फोटा मागे संवादाचा विवाद आहे.
घटस्फोटाला समस्या समजतात तसेच समाधान समजतात हे दोघे योग्य तसेच अयोग्य देखील आहेत. मात्र मानव एकांगी पाहतो तसेच एकांगी आकलन करतो कारण सुलभता व मार्यदा. कोणताही मानव कोणतीही गोष्ट ना समग्र पाहतो ना समग्र आकलन करता येते कारण दृष्टी व आकलन मर्यादा तसेच जे पाहतो तितके आकलन करण्यात सुलभता आहे परंतु इथे समग्रतेचा अभाव असतो याला मानव सहजगत्या दुर्लक्षित करतो. याउलट मी जे मर्यादित पाहतो किंवा समजतो हेच सत्य असा अट्टाहास करतो कारण अज्ञान. सामान्यतः मानव स्वतःचे अज्ञान न पाहता फक्त ज्ञान पाहतो व आचरण करतो व हेच अज्ञान समस्या निर्माण करते.
कोणत्याही विवाहित पुरुष अथवा स्त्रीला बेसावध असताना, तुम्ही विवाह करण्याचे कारण काय असा अनपेक्षित प्रश्न करून पहा म्हणजे मानवाचे ज्ञान व अज्ञान याचा प्रत्यय मिळणार आहे. यासंदर्भात कधी विचार केला नाही, सगळे करतात म्हणून मी केला, प्रथा-परंपरा आहे त्याचे पालन केले, थोडक्यात अनुकरण केले याप्रकारचे उत्तर व्यापक प्रमाणात मिळते. काही व्यक्ती शारीरिक व मानसिक भूक मिटवण्याची सोय असा विचार करतात तेच काही प्रजनन करून वंश विस्तार, चालवणे असा विचार करतात. एकंदरीत याप्रकारचे उत्तर देणारे व्यक्तिमत्व हे संकुचित दृष्टीकोन व अज्ञान यांचे प्रतिक आहे. तसेच यांच्या वैवाहिक जीवनात कलह, तणाव आहे.
विवाह म्हणजे भारतीय संस्कृती मध्ये एक संस्कार आहे पण सध्या त्याला सोहळा समजले जाते हा भाग वेगळा. विवाह संस्कार केल्यानंतर संसार सुरु होतो. वैवाहिक जीवनाला संसार म्हणतात तसेच ब्रम्हांड स्वरूपी व्यापक जीवन चक्राला देखील संसार म्हणतात यावरून या संस्काराची व्यापकता तसेच महत्व स्पष्ट होते. संसार कोणताही असो त्यामध्ये सहजीवन आहे. कोणत्याही सहजीवनातील कोणताही घटक परिपूर्ण नाही तसेच या सहजीवनात प्रत्येक घटक समान महत्वाचा आहे. मात्र मानव व्यक्तिगत अपुऱ्या बुद्धीने कमी-जास्त असा भेदभाव करतो कारण स्वभाव. कोणत्याही सहजीवनात समन्वय व संतुलन महत्वाचे आहे यासाठी प्रत्येक घटक अपरिपूर्ण व समान आहे मात्र मानव स्वतःला परिपूर्ण समजतो यामुळे गल्लत घडते.
सहजीवनातील समन्वय व संतुलन राखण्यासाठी प्रत्येक घटकाला तडजोड करावी लागते तसेच प्रत्येक घटक तडजोड करतो परंतु ही तडजोड इतर घटकांना समजते अथवा जाणवते असा नियम नाही. मानवाचे अपरिपूर्णत्व दूर करण्यासाठी व सामाजिक समतोल राखण्यासाठी विवेकी व्यक्तींनी विवाह स्वरूप संस्कारांचा प्रारंभ केला परंतु त्याचे अनुकरण करताना मतितार्थ व ज्ञान काळाच्या ओघात लोप पावले यापेक्षा त्यामध्ये परिवर्तन झाले. पुरुष असो की स्त्री शारीरिक व मानसिक दृष्टीने अपरिपूर्ण आहेत. स्त्री व पुरुष हे विरुद्ध ध्रुव आहेत यामुळे त्यांच्यात आकर्षण आहे तसेच एकमेकाविना परिपूर्ण होत नाहीत. कोणत्याही पुरुषाला स्त्री उत्तमरीतीने समजावून घेऊ शकते तसेच समजून सांगू शकते तसेच स्त्री बाबत पुरुष करू शकतो ही निसर्ग रचना आहे.
आर्थिक दृष्टीने स्वावलंबन म्हणजे परिपूर्णत्व होत नाही. अर्थात काही व्यक्ती समजतात हा भाग वेगळा. यामुळे आता मला तुझी गरज नाही, मी यापलीकडे तडजोड करू शकत नाही असा प्रकार घडतो. परस्परातील संबध राखण्यासाठी असो किंवा घटस्फोटा नंतरचे जीवन असो या दोन्हीत तडजोड ही आहे. मुळात मानवी जीवन म्हणजे एक तडजोड आहे फक्त ती किती प्रामाणिक पणाने केली जाते याला महत्व आहे. आपण आपल्या वैवाहिक जीवनात नेमके काय करतो याचा विचार करून पाहावा कारण आपल्या आचरणाचा प्रभाव तसेच संस्कार इतरांवर होत आहे. आपल्या आचारनाचे इतर अनुकरण करणार आहेत.
घटस्फोट हा चिंतनाचा एक व्यापक विषय आहे. यावर विस्ताराने एक पुस्तक लिहिले असून त्यापैकी काही भाग इथे नमूद केला आहे. सदर पुस्तक प्रकाशन संस्कारांत आहे. प्रकाशन होण्यास बराच कालावधी आहे परंतु याविषयावर लिहावे असे वाटले.
Comments
Post a Comment