तरच प्रजासत्ताक होईल


दिनांक २६ जानेवारी रोजी भारतात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आज प्रजासत्ताक दिन आहे. अनेक व्यक्ती एकमेकांना शुभेच्छा प्रदान करतील, झेंडा वंदन करतील, काही जण सुट्टीचा आनंद घेतील. पण क्षणभर चिंतन करून आपण वास्तवात प्रजासत्ताक आहोत का? याची खातरजमा करतील का?
काही व्यक्ती राजकारण व नेते यांच्याकडे बोट दाखवत वर्तमान प्रजासत्ताक दुरवस्थेला जबाबदार ठरवण्याचा प्रयन्त करतील. अर्थात या व्यक्ती मिडीयाच्या असणार कारण काही झाले तरी सरकार व राजकारण यांना जबाबदार ठरवण्याची त्यांना सवय जडत आहे. मीडियाचा सामाजिक मनावर प्रभाव आहे.
देशातील वर्तमान परिस्थिती प्रजासत्ताकला तारक की मारक हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज नाही. कोणताही वर्तमान म्हणजे भूतकाळाची एक निष्पत्ती आहे तसेच भविष्याचा पाया आहे. भूतकाळ घडून गेलेला आहे तसेच भविष्य घडणार आहे या दरम्यान असणाऱ्या वर्तमानात आम्हाला प्रयन्त करता येणार आहे.
आम्हाला म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकाला प्रयन्त करावा लागणार आहे. अर्थात या प्रयन्ता मध्ये कोणी सिंहाचा वाटा घ्यावा अथवा खारीचा वाटा घ्यावा. कमीत कमी आपण आपल्या घरात लोकशाही नांदेल याची दक्षता घ्यावी म्हणजे पुढील पिढीवर लोकशाहीचा संस्कार तरी होईल. वर्तमान समाजातील घरात लोकशाही आहे का? आपण आपल्या घरात डोकावून पहा व खातरजमा करावी ही विनंती.
वर्तमान समाजातील बहुसंख्य घरात लोकशाहीचा अभाव असल्याचे प्रकर्षाने जाणवते. आडात असेल तर पोहऱ्यात येईल. वर्तमान समाजातील जे कोणी कुटुंब प्रमुख आहेत त्यांची जडण-घडण हीच मुळात हुकुमशाही वातावरणातील आहे. तसेच मानवी स्वभाव अनुकरण प्रिय आहे. मानव सरळ अनुकरण करतो अर्थात ज्याला योग्य समजतो त्याचे अनुकरण करतो मात्र योग्य हेच अयोग्य याची त्याला जाणीव नाही. हुकुमशाहीचे वातावरणात लहानाचे मोठे होणारा माणूस लोकशाहीत स्वैराचार करणार तसेच इतरांवर हुकुम चालवणार यात शंका नाही. तसेच वर्तमान समाजातील स्वैराचार मागे हुकुमशाहीचा इतिहास आहे.
घरात लोकशाही असेल तर मत-मतांतर-मतभेद म्हणजे स्वाभाविक घटक असण्याचा संस्कार होणार आहे मात्र हुकूमशाहीत मत-मतांतर-मतभेद म्हणजे शत्रुत्व. वर्तमान समाजात मतभेद म्हणजे शत्रुत्व आहे. लोकशाही घरात सगळ्यांना मत व्यक्त करता येते यामुळे प्रत्येकाची प्रगल्भता वाढते तसेच सगळ्यांना सोबत घेत वाटचाल करताना एकमेकाचा आदर केला जातो. हुकूमशाहीत याउलट घडते. एकाच व्यक्ती मत मांडतो यामुळे वैचारीक वाढ खुंटते तसेच एकमेकाचा आदर करण्यापेक्षा अपमान-अवहेलना करण्याचा प्रकार घडतो. वर्तमान समाजात वैचारीक वाढ खुंटलेल्या व्यक्तींची संख्या लक्षणीय प्रमाणात आहे यामुळेच उठसुठ स्वतःच्या तर्काने बेफाम आरोप करणे ते अवहेलना करणे पासून इतरांची पात्रता तपासण्याचा प्रकार सरार्स घडतो. या वर्तमान मागे भूतकाळातील संस्कार आहे, जडण-घडण आहे.
आज अचानक सामाजिक परिवर्तन होत भारतीय प्रजासत्ताकची अवस्था बदलणार ही भोळी किंवा वांझोटी अपेक्षा बाळगत भविष्य बिघडवण्या पेक्षा फक्त स्वतःच्या घरात लोकशाही प्रश्थापित करता भावी पिढी व भावी समाजाला लोकशाहीचा संस्कार प्रदान करावा म्हणजे देशातील लोकशाहीत सुधारणा होणार आहे. निखळ निवडणूक प्रक्रिया सुधारणा करून तात्पुरते ठिगळ जोडता येईल पण ते किती दिवस टिकणार.
सामान्यतः माणूस मी एकटा काय करणार किंवा माझ्या एकट्याने काय फरक पडतो असा विचार करतो. मात्र एक खूप काही करू शकतो कारण याच एकाचे दोन होताच संसार सुरु होतो तसेच एक कुटुंब निर्माण होते. एक कुटुंब म्हणजे समाज, देश, संसार यांचे संक्षिप्त स्वरूप आहे. यामुळे प्रथम स्वतःचे घर सुधारा समाज व देशात सुधारणा घडतील फक्त थोडा कालावधी लागेल. आजची दुरवस्था एका दिवसातील नाही त्याच प्रमाणे सुव्यवस्था देखील एका दिवसात निर्माण होणार नाही.
कमीत कमी आजच्या दिवसात तरी देश व समाजाचा विचार करावा कारण ‘मी’ला ‘आम्ही’ विना किंमत नाही. जो पर्यंत आम्ही आहोत तो पर्यंतच मी ला काही मोल आहे. आपण रोज स्वतःचा, कुटुंबाचा विचार करतो पण जर देश व समाज असेल तरच स्वतःला व कुटुंबाला भवितव्य आहे. अर्थात ते उज्वल हवे तर लोकशाही अन्यथा पहिले पाढे पंचाव्वन्न करीत येरे माझ्या मागल्या होत दुरवस्था होत राहणार. एकदा चिंतन करून पहावे ही विनंती. चूक भूल क्षमस्व.

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते