भाव-नांना भाव का?

कोणीही कुठेही हल्ला करणे ते देखील भावना भडकल्याने, क्रियेला एक प्रतिक्रिया असा प्रकार प्रथम घडतो आहे का? महाराष्ट्रात ही नवीन संस्कृती उदयाला आलेली आहे. कोणताही समूह उठतो व भावना भडकल्या, क्रियेला प्रतिक्रिया असे म्हणत राजरोस धुडगुस घातला जातो. काही व्यक्ती या कृतीला योग्य समजतात तेच काही व्यक्ती अयोग्य समजतात. ज्याचा जसा संस्कार तसा दृष्टीकोन व आकलन त्यापारत्वे आचरण.
इथे प्रश्न आहे तो मुळात भावना का भडकतात? एकी कडे आम्ही भावना म्हणतो म्हणजे भाव-ना तरीही त्या भडकतात म्हणजे भाव आहे. भडकणे हा भाव झाला. एकतर भाव आहे म्हणून भडकणे असताना भाव-ना भडकल्या कितपत योग्य आहे? मुळात आम्हाला भावना मधील भाव संदर्भात माहिती आहे का? ना भाव कळतो ना भावना कळतात तरीही भडकतात कारण अज्ञान.
भाव म्हणजे मुल्यांकन तसेच प्रत्येक व्यक्ती नुसार हे मुल्यांकन बदलते. अर्थात यासाठी व्यक्तिगत स्वभावाचे ज्ञान तसेच भान-अभ्यास पाहिजे पण त्यासाठी आम्हाला सवड आहे कुठे. मुळात आम्हाला स्वतः मध्ये स्वारस्य आहे का? जो पर्यंत स्वभाव तसेच ‘स्व’भाव यांचे ज्ञान होत नाही तो पर्यंत भाव तसेच भावना यांचे वास्तविक आकलन होत नाही.
मला जे वाटते-समजते ते म्हणजे भावना का? मला जे वाटते अथवा समजते त्याचे माझ्या दृष्टीने मूल्य- भाव असेल पण त्याचे सामाजिक मूल्य काय? अर्थात मी व माझ्या भोवताली गोंडा घोळणारे यांच्या पुरता मर्यादित समाज मानले तर सामाजिक मूल्य आहे मात्र समाजातील एखादा समूह म्हणजे समाज मानने हे संकुचित दृष्टीकोन व आकलन यांचे द्योतक आहे.
संकुचित दृष्टीकोन व आकलन असणारा माणूसच भावनांना भाव प्रदान करतो यामुळे हिंसाचार, बलात्कार, दरोडा, हत्या-आत्महत्या, अतिरेक, नक्षलवाद, दंगल सारखे प्रकार घडतात. काही व्यक्ती याला वासनेची परिणीती मानतात मात्र वासना मध्ये देखील वास-ना आहे. वासनेची भावना भडकते त्यामुळे हे प्रकार घडतात. भावना भडकणे योग्य असेल तर हे समस्त प्रकार योग्य आहेत तसेच प्रत्येक व्यक्ती मनमानी करून आचरण करणार असेल तर देशात न्यायालय तसेच सरकार यांची गरज नाही. हम करे सो कायदा करीत आचरण करावे नाहीतरी याप्रकारचा मानवी इतिहास आहे. नाहीतरी मानवाला त्याचा इतिहास गौरवशाली वाटतो यामुळेच वर्तमान काळ न पाहता इतिहास कुरवाळत बसतो. यामुळे वर्तमानात कर्तुत्व करण्याची गरज नाही सरळ आयत्या पिठावर रेघोट्या मारत बसायचे.
मानवाने एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेण्याची गरज आहे. कोणतीही भावना असो की भाव हा व्यक्तिगत तसेच स्वाभाविक आहे पण माणूस हा सामाजिक प्राणी या वर्गवारीत मोडतो उगाच झुंडीने गोळा होत सामाजिक भावना समजत गदारोळ करणे म्हणजे व्यक्तिगत संकुचित दृष्टी व आकलन यांचे प्रदर्शन मांडणे आहे.
सर्वात प्रथम स्वतःच्या स्वभावाचा मागोवा घेत भाव पाहावा म्हणजे भाव-ना संदर्भात ज्ञान होणार आहे. तसेच यासोबत व्यक्तिगत दृष्टी नुसार सृष्टी बदलते याचा प्रत्यय मिळेल. दोष सृष्टीत नसून पाहणाऱ्या सृष्टी मध्ये आहे यामुळे प्रथम दृष्टी बदला सृष्टी बदलण्याची गरज भासणार नाही. अर्थात हे सगळ्यांना माहित आहे तसेच कळते पण ज्ञान अभावी वळत नाही. जो स्वतःच्या भावना नियंत्रित करू शकत नाही त्याने दुसऱ्या कडून स्वनियंत्रीत आचरणाची अपेक्षा बाळगावी का? अखेर चुकतो तो माणूस तसेच चुकांन पासून शिकतो तो ज्ञानी माणूस आहे. आपण माणूस म्हणून जन्माला आलो पण माणूस म्हणून जगतो किंवा जगू देतो का? थोडे आत्मपरीक्षण करून पाहवे तसेच आचरण करावे कारण वर्तमानातील आचरण भविष्याची निर्मिती करणार आहे. यामुळे भावनांना भाव द्यावा की कर्तव्याला भाव द्यावा हा व्यक्तिगत निर्णय आहे मात्र याचे परिणाम सामाजिक होणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते