जीवन एक मुक्त विद्यापीठ
जीवन म्हणजे काय? या
प्रश्नाचे उत्तर व्यक्तीच्या स्वभावानुरूप आहे. प्रत्येक व्यक्तीचा दृष्टीकोन,
आकलन, संस्कार ते संकल्पना भिन्न आहेत. प्रत्येकाला स्वतःची दृष्टी आहे
त्याप्रमाणे सृष्टी भासते. माझ्या दृष्टीने जीवन म्हणजे एक मुक्त विद्यापीठ आहे
कारण मी एक विद्यार्थी आहे.
मला माझ्या
दृष्टीकोन, आकलन, संस्कार तसेच संकल्पना यांच्या मर्यादा ज्ञात आहेत. मला
माझ्यातील अपूर्णत्वाची जाणीव तसेच भान आहे. मला माझ्या ज्ञानाची तसेच अज्ञानाची
कल्पना-जाणीव आहे. सामान्यतः ज्ञान मिळाले म्हणजे अज्ञान नाहीसे झाले असे समजण्यात
येते कारण ज्ञान व अज्ञान यांना विरुद्धार्थी शब्द समजण्यात येते. मात्र विरुद्धता
त्याठिकाणी परस्पर पूरकता आहे.
ज्ञाना विना अज्ञान
तसेच अज्ञान विना ज्ञान यांचे आकलन होत नाही. ज्ञानाला प्रकाशाची उपमा देण्यात
येते तसेच अज्ञानाला अंधाराची उपमा देण्यात येते. प्रकाश आला म्हणजे अंधार नाहीसा
होतो का? अंधार कधीही नाहीसा होत नाही तर प्रकाशामुळे त्याचे अस्तित्व जाणवत नाही
तसेच प्रकाश किरण पोहचतात त्याठीकाणाचा अंधार जाणवत नाही. प्रकाशामुळे अंधार
अप्रत्यक्ष स्वरूप धारण करतो तसेच प्रकाश नाहीसा होताच पुन्हा अस्तित्व प्रकट
करतो- प्रत्यक्ष स्वरूप धारण करतो.
मला माझे ज्ञान तसेच
अज्ञान यांची कल्पना असल्याने मी या दोघात तुलना करतो त्यावेळी ज्ञान कमी व अज्ञान
अधिक भासते. ब्रम्हांडा तील प्रकाश व अंधार यांचे प्रमाण पाहता प्रकाशाला मर्यादा
आहेत मात्र अंधाराला मर्यादा नाहीत. कोणत्याही व्यक्तीच्या ज्ञानाला मर्यादा आहेत
कारण मानव या निसर्ग चक्रातील एक कडी आहे. अनेक कड्या मिळून एक शृंखला निर्माण
करतात. प्रत्येक कडी भिन्न असेल तर कडी जोडली जाणार नाही तसेच शृंखला निर्माण
होणार नाही.
मानवाची दृष्टी न
परिपूर्ण पाहते न परिपूर्ण आकलन करते याउलट मानव एकांगी पाहतो तसेच एकांगी आकलन
करतो त्याला परिपूर्ण समजतो मात्र समज हाच गैरसमज याचे त्याला भान नाही. अर्थात
भान होण्यासाठी जाण महत्वाची आहे तसेच जाण साठी ज्ञान महत्वाचे आहे. मानव शाळेत
शिक्षण घेतो व त्याला ज्ञान समजतो तसेच इकडून-तिकडून माहिती गोळा करण्याला ज्ञान
समजतो मात्र त्याला ज्ञान व माहिती मधील तफावत समजत नाही. माहिती बाळगतात त्यांना
कळते पण वळत नाही मात्र ज्ञान असेल तर कळते तसेच वळते.
आपण परिपूर्ण नाही
हे सगळ्यांना कळते मात्र वळते का? वर्तमान समाजात जो-तो दुसऱ्यांना शिकवण्याचा
प्रयन्त करीत आहे यामुळे तुला माहित नाही, तुला कळत नाही यासारखी वाक्य ऐकण्यास
मिळतात. थोडक्यात स्वतःची माहिती सत्य मानत ती इतरांच्या माथी मारण्याचा प्रयन्त
करण्यात येतो. वर्तमान मानवाने सत्याला देखील संकुचित केले आहे. वर्तमान मानव
स्वतःचे एकांगी आकलन, समज, संकल्पना यांना सत्य मानतो. यामुळे त्याच्या जीवनात
कलह, ताण-तणाव, समस्या, असुरक्षितता, धावपळ, दगदग आहेत.
वर्तमान मानव अहंकार
निर्मित गरजांची पूर्तता करण्यासाठी धावत आहे. वर्तमान मानव स्वतःच्या संकल्पनांची
पूर्तता करण्यासाठी धावत आहे मात्र या समस्त धावपळीत जीवन दुर्लक्षित होत आहे. आज
विश्व ज्ञानाच्या गप्पा मारणाऱ्या माणसाला स्वतःच्या स्वभावाची कल्पना नाही तर
ज्ञान खूप दूर आहे. मात्र वर्तमान मानव इतरांचा स्वभाव जाणण्याच्या वल्गना करतो.
थोडे स्वतःचे
परीक्षण करून पहा दृष्टीकोन, आकलन असो की ज्ञान परिपूर्ण आहे का? ज्ञान मिळाले तर
जीवनाचा अर्थ- मतितार्थ उमगणार आहे पण वर्तमान मानवाला दुसऱ्या अर्थामागे
धावण्याची सवय असल्याने त्याने जीवनाचा बाजार मांडला आहे पण बाजार लवकर आटोपला
जातो हे दुर्लक्षित होत आहे. मुळात जो जीवन असो की स्वतःचे अपूर्णत्व दुर्लक्षित
करतो तो याकडे कधी लक्ष देणार?
मानव काही करताना
प्रथम फायद्याचा विचार करतो कारण बाजरी करणाचा एक परिणाम आहे. ज्ञान मिळवण्याचा
फायदा काय? असा विचार माणूस करणार यामध्ये शंका नाही पण ज्ञान मिळते तेव्हा
फायद्या मधील तोटा सुध्दा दिसतो कारण प्रत्यक्ष सोबत अप्रत्यक्ष पाहण्याची क्षमता
प्राप्त होते. ज्ञान प्रत्येकाला झेपत नाही तसेच मिळत देखील नाही. अर्थात ज्या
व्यक्ती मधील विद्यार्थी जागा-सक्रीय आहे त्याला ज्ञानोपासना करता येते.
जो विद्यार्थी आहे त्याला
भेटणारा प्रत्येक सजीव-निर्जीव घातक काहीना काही शिकवण जरूर देतो. काही शिकवण नाही
मिळाली तरी जीवनाचे वास्तव जरूर दर्शवतो फक्त पाहणारी दृष्टी व आकलन करणारा स्वभाव
गरजेचा आहे. प्रयन्त करून पहा. शोधा म्हणजे खूप काही सापडेल.
Comments
Post a Comment