बैल गेला नी झोपा केला
एकापाठोपाठ उघडकीला आलेले भ्रष्टाचार प्रकरण पाहता बैल गेला
नी झोपा केला या म्हणीचा प्रत्यय मिळतो. टू जी घोटाळा असो की राष्ट्रकुल स्पर्धा
मधील घोटाळा असो हे घडले नंतर कॅगचा रिपोर्ट आला त्यावेळी मिडिया तसेच विरोधी
पक्षाला जाग आली. घोटाळा घडत असताना किंवा तो घडल्या-घडल्या मिडिया वा विरोधी
पक्षाला जाग आली नाही. माझ्या दृष्टीने सरकार सोबत मिडिया व विरोधी पक्ष देखील या
घोटाळ्यास तितक्याच व्यापक प्रमाणात जबाबदार आहेत. मिडिया व विरोधी पक्ष यांनी
कर्तव्यात कसूर केला आहे. मात्र यासंदर्भात कोणीही वाच्यता करीत नाही.
लोकशाही प्रणालीत विरोधीपक्ष हा सरकारचा अविभाज्य घटक आहे.
सरकारी कामावर देखरेख करणे तसेच सरकार कडून काम करून घेणे हे विरोधी पक्षाचे
काम-कर्तव्य आहे. सरकारी ध्येय-धोरण यामधील त्रुटींचा अभ्यास करणे, मागोवा घेणे हे
विरोधी पक्षाचे काम आहे अर्थात विरोधा साठी विरोध करणे हे विरोधी पक्षाचे काम
नाही. मात्र वर्तमान विरोधी पक्ष स्वतःचे कर्तव्य व काम दुर्लक्षित करून निखळ
विरोधासाठी विरोध करीत असल्याचे अनेकदा प्रकर्षाने जाणवते.
मिडिया म्हणजे लोकशाहीचा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे.
मिडीयाने सातत्याने जागरूक राहून समाजाला जागरूक करावे हे मिडीयाचे कर्तव्य तसेच
काम-कार्य आहे. कधी काळी शोध पत्रकारिता नावाचा प्रकार होता. विशेष म्हणजे
त्याकाळात साधनांची व्यापक प्रमाणात कमतरता होती मात्र वर्तमान काळात अनेक
प्रकारची साधने असताना शोध पत्रकारिता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे की काय अशी
शंका निर्माण होण्यास वाव आहे. वर्तमान मिडीयाला वास्तविक सामाजिक जीवनातील
घडामोडी व समस्या यापेक्षा विविध वाहिन्या वरील धारावाहिक मधील कथा व व्यथा
महत्वाच्या भासतात. तसेच सिनेतारकांच्या आयुष्यात घडणाऱ्या वास्तव व काल्पनिक कथा
यामध्ये जास्त स्वारस्य आहे.
सरकरी निविदा निघतात तसेच सरकार ज्याठिकाणी ठेकेदारी
पद्धतीने काम करून घेते त्याठिकाणी व्यापक प्रमाणात भ्रष्टाचार होतो किंवा
होण्याची शक्यता अधिक असते हे उघड गुपित सगळ्यांना माहित असताना विरोधी पक्ष तसेच
मिडीयाला यासंदर्भात माहिती नसावी? जे गुपित सामान्य माणसाला माहित आहे ते
विरोधकांना तसेच मिडीयाला माहित नसावे यावर कोण विश्वास ठेवणार? इथे एक-दोन हजार
किंवा लाखांची निविदा नाहीत तर अरबो रुपयांचा व्यवहार-निविदा असताना विरोधी पक्ष व
मिडीयाने दुर्लक्ष केले की दुर्लक्ष करण्याचे नाटक केले? प्रथम स्वहित साधले मात्र
कॅगचा अहवाल येताच आम्ही पहिले- सर्व प्रथम यासाठी पळापळ केली हे समजण्यास मार्ग
नाही.
इतके मोठे घोटाळे होताना विरोधी पक्ष व मिडिया यांची जी
काही भूमिका होती त्यामागे एकतर तेरी भी चूप और मेरी भी चूप किंवा बैल गेला नी
झोपा केला आहे. दुसऱ्या शब्दात झोपा केला की झोपेचे सोंग केले हे समजण्यास मार्ग
नाही. अर्थात निखळ विरोधी पक्ष व मिडिया यांच्या कर्तव्याचा विचार करून चालणार
नाही तर समाजाच्या कर्तव्याचा देखील विचार करावा लागेल कारण सरकार, सरकारी कर्मचारी,
विरोधीपक्ष, मिडिया यामध्ये काम करणारे व्यक्ती याच समाजात जन्म व संस्कार घेत
लहानाचे मोठे होतात. जसा संस्कार तशी कृती. मुळात लोकशाहीचा पाया असणारा समाज हाच
नेहमी बैल गेल्या नंतर जागा होतो त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात फसवणूक होत आहे.
एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला फसवतो त्यावेळी फसवणारा
गुन्हेगार समजला जातो मात्र फसलेला व्यक्ती बेसावध असतो त्यामुळे फसगत होते. जर
फासणारा सावध असेल तर फसेल का? आज घोटाळा उघडकीला आल्यानंतर सगळ्यांनी आकंड-तांडव
करण्याचा प्रयन्त केला मात्र तेच स्वतःचे परीक्षण केले तर स्वतःची झोप व झोपेचे
सोंग लक्षात येणार आहे पण स्वतःचे परीक्षण आम्हाला झेपणार का?
Comments
Post a Comment