परावलंबी सुख-दुखः


माणूस आयुष्यभर सुख शोधण्याचा प्रयन्त करतो मात्र ते त्याला मिळते का? या प्रश्नाचे उत्तर व्यक्ती परत्वे बदलते कारण सुखाची संकल्पना-परिभाषा-व्याख्या व्यक्ती प्रमाणे बदलते. माणूस सुख शोधतो म्हणजे वास्तवात तो अंतरंगातील संकल्पनेचा शोध घेतो मात्र यासंदर्भात त्याला कल्पना वा माहिती नसते यामुळे याबद्दल ज्ञान असणे फार दूरची गोष्ट आहे.
सामान्यतः माणूस स्वतःचे सुख-दुखः ठरवताना इतरांसोबत स्वतःची तुलना करून निर्णय घेतो कारण स्वभाव व संस्कार. सामान्य माणूस स्वतः स्वतःचे सुख-दुखः ठरवतो तसेच इतरांचे देखील सुख-दुखः ठरवण्याचा प्रयन्त करतो. माणूस स्वतःची सुखाची व्याख्या दुसऱ्यावर लादतो. एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीने स्वतःच्या मालकीचे चारचाकी वाहन दारात असणे म्हणजे सुख त्याच्या दृष्टीने ज्यांच्या दारात चार चाकी तो सुखीच आहे. माझ्या दारात चार चाकी नाही तर मी दुखीः तसेच ज्यांच्या दारात चार चाकी नाही ते सगळे दुखीः आहेत.
कोणत्याही सामान्य माणसाला स्वतःचे सुख-दुखः ठरवण्यासाठी इतरांची गरज भासते. कोणत्याही मानवाला स्वतः जवळचे सुख इतरांचा आधार न घेता समजते किंवा जाणवते का? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी द्यावे लागेल. दुसऱ्या जवळ काय आहे हे पहिल्या विना आपल्याजवळ काय नाही याची जाणीव होत नाही तसेच दुसऱ्या जवळ काय नाही हे पहिल्या विना आपल्या जवळ काय आहे याची जाणीव होत नाही. थोडक्यात दुसरा अथवा इतर व्यक्ती नसतील तर मानवाला ना त्याचे सुख समजणार, ना दुखः समजणार.
माणूस कमावता झाला किंवा आर्थिक दृष्टीने स्वावलंबी झाला तर तो स्वतःला स्वावलंबी समजतो मात्र त्याला आपण अंशात्मक स्वावलंबी आहोत याचे सहजगत्या विस्मरण होते. माणूस म्हणजे निसर्गारूपी जीवन चक्रातील एक छोटी कडी आहे मात्र या वास्तवाला तो विसरतो यामुळे हकानाहक मनस्ताप व तणाव निर्माण करून घेतो.
सुख-दुखः वास्तवात संकल्पना आहेत तसेच या संकल्पना काळाच्या ओघात संस्कार होतो त्याप्रमाणे बदलत जातात कारण संस्कार व दृष्टीकोन. कोणत्याही व्यक्तीला सुख म्हणजे काय? दुखः म्हणजे काय? या प्रकारचा प्रश्न करून पहा म्हणजे प्रत्यय मिळणार आहे. याठिकाणी सुख दुखःची संकल्पना तसेच परावलंबन यांचा प्रत्यय मिळणार आहे.
मी काही मित्रा समवेत बिहार राज्याचा दौरा केला त्यावेळी माझ्या मित्रांना त्यांच्या सुखाचा प्रत्यय मिळाला. हे मित्र नेहमी महाराष्ट्रात हे नाही, ते नाही असा राग आलाप घेत मात्र बिहार मध्ये फिरल्यानंतर महाराष्ट्रात काय आहे याची त्यांना जाणीव झाली यामुळे त्यांचा सूर व नूर पालट झाला आहे. आज त्यांना स्वतःचे सुख समजत आहे. आज त्यांना त्याच्या जवळ काय आहे याची जाणीव होत असून समाधान मिळत आहे. याठिकाणी समाधान त्याठिकाणी सुख आहे तसेच असमाधान त्याठिकाणी दुखः आहे.
सुख-दुखः असो की समाधान-असमाधान या मानव निर्मित संकल्पना आहेत. यासंकल्पना परस्पर विरोधी मात्र परस्पर पूरक व सापेक्ष आहेत. याठिकाणी सुख-दुखः असो की समाधान-असमाधान या संकल्पना महत्वाच्या नसून यांच्या कडे पाहणारा दुष्टीकोन व निर्णय करणारे आकलन महत्वाचे आहे बाकी सगळा संभ्रम आहे. कोणताही निष्कर्ष महत्वाचा नसून त्यामागील निकष महत्वाचा आहे.

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते