माणूस संकुचित होत आहे.


     मानव या ब्रम्हांड मधील एक प्राणी. एकीकडे ब्रम्हांड- विश्व प्रसरण पावत आहे पण मानवाचे विश्व मात्र संकुचित होत असल्याचे प्रकर्षाने जाणवते. प्रत्येक मानवाच्या अंतरंगात असणारे विश्व आकुंचित होत आहे. काळाच्या ओघात मानवाचा स्वभाव संकुचित होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अर्थात यासाठी काळ सापेक्ष अभ्यास करावा लागतो. भूतकाळ व वर्तमान काळ यांचा तुलनात्मक अभ्यास करावा लागतो. या तुलनात्मक अभ्यासात स्वाभाविक निकषांवर निरीक्षण करता जो निष्कर्ष मिळतो तो मानव संकुचित होत असल्याचा निष्कर्ष प्रदान करतो.
      वर्तमान मानव एकीकडे ग्लोबालाझेशनाच्या गप्पा मारतो मात्र कृती करताना मी व माझा विस्तार, फायदा यांना प्राधान्य देतो. गंमत म्हणजे घरातील इतर व्यक्ती सोबत संवाद नसतो मात्र जगातील दुसऱ्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या अपरिचित माणसा सोबत संवाद असतो. कौटुंबिक घटकांना देण्यासाठी वेळ नाही मात्र फेसबुक सारख्या सांकेतिक स्थळांना देण्यासाठी मुबलक वेळ आहे. आपल्या घरात काय घडते हे कळत नाही पण जगात काय चालले यासंदर्भात बित्तम बातमी असते. स्वतःची दशा व दिशा समजत नाही पण जगाची दिशा व दशा समजते. वर्तमान मानवाला अणु-रेणू यांचे अंतरंग समजते मात्र स्वतःचे अंतरंग समजते का? आज मानवाला समस्त पदार्थांचे गुणधर्म( स्वभाव) माहित आहेत पण स्वतःचे गुणधर्म(स्वभाव) माहित आहेत का?
      मानवाला स्वभाव माहित नसताना ‘स्व’-भाव संदर्भात महित असेल ही निरर्थक अपेक्षा बाळगण्यात अर्थ नाही. मानवाला स्वभाव संदर्भात असणारी अनभिज्ञता व अज्ञान यामुळे माणूस आज व्यापक वेगाने संकुचित होत आहे. मानवाचा हा संकुचितपणा त्याच्या तसेच सृष्टीच्या विनाशाला कारणीभूत ठरणार आहे. माणूस मी व माझे यांचे रक्षण करतान इतरांचे भक्षण करीत आहे. मानव मी, माझे व आपले तसेच तू-तुझे, व तुमचे भिन्न समजतो, मानतो. मानवाचा मी फक्त स्वतः पुरता मर्यादित आहे. थोडक्यात मानव स्वार्थी होत असून व्यक्तिगत दृष्टीने जग पाहतो व तितकीची जगाची व्यापकता समजतो. दुसऱ्या शब्दात दुष्टी ही सृष्टी मानतो. मानवाला स्वतःच्या दृष्टी संदर्भात जाणीव नाही यामुळे मर्यादांची जाणीव नाही. दिसण्याला व्यापक मर्यादा आहेत पण असण्याला मर्यादा नाहीत. मात्र मानव दिसण्याला असणे समजत गल्लत करतो परिणाम स्वरूप एकांगी समजण्याला समग्र समजत विनाशाकडे वाटचाल करीत आहे.
      मानव स्व-अर्थाने जगाचे मुल्यांकन करीत वाटचाल करतो परिणाम स्वरूप मानवातील हिंसाचार व्यापक प्रमाणात व व्यापक गतीने वाढत आहे. गंमत म्हणजे हा हिंसाचार प्राणीमात्र सारखा जीवन संघर्षासाठी नसून जीवन प्रवासात सुलाभातासाठी निर्माण केलेल्या संकल्पनांचे अस्तित्व राखण्यासाठी हिंसाचार आहे. देश, धर्म, जात, भाषा, प्रांत, शत्रू यासारख्या संकल्पना साठी एक मानव दुसऱ्या मानवाचा बळी घेतो. मानव या संकल्पनांना सत्य मानतो तसेच यांचे रक्षण करतो मात्र जो जन्माला त्याचे मरण व अंत निश्चीत आहे या निसर्ग नियमाला तो दुर्लक्षित करतो. भूतकाळात यापैकी कोणतीही संकल्पना अस्तीत्वा मध्ये नव्हती. किंबहुना मानव अस्तीत्वा मध्ये नव्हता पण हे वास्तव मानव ना पाहण्यास तयार ना मान्य करण्यास तयार कारण अज्ञान व अहंकार.
      मानव उपजत अज्ञानी आहे परंतु याचे त्याला विस्मरण होत आहे. तसेच पुस्तकी अभ्यास करून पदवी मिळवताच तो स्वतःला ज्ञानी समजण्यास प्रारंभ करतो यामुळे जीवनाच्या विद्यापीठातील स्वतःची विद्यार्थी अवस्था दुर्लक्षित करतो परिणाम स्वरूप मानव विज्ञानाचा माहितगार आहे पण स्वतः संदर्भात अज्ञानी आहे. जो स्वतः संदर्भात अज्ञानी तो स्वतःचा अहंकार तसेच अहंकाराचा संभ्रम ओळखणार का? वर्तमान समाजात मानवी अहंकार प्रबळ होत असून त्यामुळे हिंसाचार, द्वेष, कलह, संशय, तू तू-मै मै वाढत आहे. विश्वात घडणारे परिवर्तन मानवाला समजते मात्र स्वतः मधील परिवर्तन पासून तो अनभिज्ञ आहे. एकदा स्वतःच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न करून पहा वास्तवाचा प्रत्यय मिळेल. स्व सापेक्ष जग पाहण्या पेक्षा जग सापेक्ष स्वतःला पहावे थोडक्यात उलटे पाहवे म्हणजे खूप काही दिसणार आहे.
      वरील लिखाण निष्कर्षात्मक आहे मात्र त्यामागील निकष व विश्लेषण यावर ‘स्व’भाव सापेक्षता( दृष्टी मागील सृष्टी) या लवकरच प्रकाशित होणाऱ्या पुस्तकात सविस्तर मांडले असून श्री.कुमार केतकर यांनी प्रस्तावना दिलेली आहे. अर्थात ज्यांना स्वतः मध्ये स्वारस्य आहे त्यांच्या साठी उपयुक्त आहे. 

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते