माझे ते सर्वश्रेष्ठ


भूतलावर अनेक मानवी समाज-संस्कृती, धर्म आहेत. प्रत्येक मानव असो की समाज-संस्कृती अथवा धर्म यामध्ये काही भिन्नता आहेत यासंदर्भात कोणाचेही दुमत नसावे मात्र यासामस्त भिन्नता मागे एकता देखील आहे. अर्थात काही व्यक्ती एकता नाकारण्याची शक्यता आहे कारण एकता सहज निदर्शनास येत नाही.
समस्त भिन्नता मागील एक प्रमुख एकता म्हणजे माझा समाज-संस्कृती असो की धर्म तो सर्वश्रेष्ठ आहे असा समज ते घोषणा देणारी माणसे. याठिकाणी जे श्रेष्ठत्व बहाल करण्यात येते ते फक्त समाज-संस्कृती ते धर्म यांच्या पुरते मर्यादित नसून भाषा-प्रांत-राज्य-देश थोडक्यात जे घटक मी व माझ्याशी निगडीत ते समस्त घटक सर्वश्रेष्ठ आहेत अशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरुपात अभिव्यक्ती देणे हा मानवाचा एक स्वाभाविक गुणधर्म आहे. माणूस कोणत्याही समाजाचा, जाती-धर्माचा असो की भाषा- प्रांताचा असो तो माझे ते श्रेष्ठ समजतो.
सामान्यतः माझ्या निगडीत ते सर्वश्रेष्ठ अशी घोषणा करणे म्हणजे अस्मिता-स्वाभिमान समजण्यात येतो. अनेक मानवांना अस्मिता व स्वाभिमान या शब्दांचा साधा मतितार्थ-भावार्थ माहित नसतो पण हे प्राणाहून अधिक प्रिय असतात. वास्तवात अस्मिता व स्वाभिमान असेल तर तुलना करण्याची-घोषणा करण्याची गरज काय? अस्मिता व स्वाभिमान प्रत्येकाला आहे तसेच सगळ्यांनी त्याचा आदर करावा. माझी अस्मिता व स्वाभिमान इतरांपेक्षा श्रेष्ठ-सरस ठरवण्याचे कारण काय? तसेच इथे मोजमाप करण्याचे साधन काय तर अपरीपूर्ण दृष्टी- अपरीपूर्ण आकलन ते देखील माझे व माझ्या सोयीनुसार. वास्तवात इथे स्वाभिमान वा अस्मिता नसून या गोंडस नावाचा आधार घेत अहंकार वाटचाल करतो. तुलना-भेदभाव असो की श्रेष्ठत्व- कानिष्ठत्व या मागे अहंकार व अज्ञान आहे.
भाषा असो की प्रांत, धर्म असो की संस्कृती यामध्ये स्वाभिमान कशाचा? सर्वात प्रथम या सगळ्यात आमचे कर्तुत्व काय? आम्हाला हे वारसा हक्काने मिळतात म्हणजे आम्ही जन्म घेणे हे कर्तुत्व? की आमच्या आई-वडिलांचे कर्तुत्व? इथे जो स्वाभिमान आहे तो सहज नसून त्यामागे एक सशर्तता आहे. ज्या घटकाचा स्वाभिमान बाळगला जातो तो मी किंवा माझ्याशी निगडीत असावा लागतो अन्यथा ना स्वाभिमान ना घोषण.
स्वाभिमान व अस्मिता या दोन्ही शाश्वत आहेत का? मुळात ‘मी’च शाश्वत नाही तसेच हे समस्त घटक काळाच्या ओघात निर्माण झाले तसेच यामध्ये परिवर्तन घडले-घडत आहे तसेच घडत राहणार आहे. आम्हाला आमच्या स्वभावातील सशर्तता जाणवते का? तुलना-भेदभाव जाणवतो का? मुळात स्वभावाची जाणीव तसेच ज्ञान आहे का? ज्यांना धड स्वभाव संदर्भात ज्ञान नाही त्यांना अस्मिता-स्वाभिमान व अहंकार यामधील तफावत संदर्भात काय माहित असणार?
वास्तविक स्वाभिमान व अस्मिता असणारा माणूस सशर्त नसतो. तो तुलना-भेदभाव करीत नाही तसेच त्याच्या आचरणात-विचारात समता असते. तो समस्त घटकांचा आदर करतो. ज्या ठिकाणी अस्मिता व स्वाभिमान या गोंडस नावाखाली अहंकार झाकला त्याठिकाणी एकाचा आदर तर दुसऱ्याचा अनादर होणार कारण भेदभाव तसेच अज्ञान.
मी व माझ्याशी निगडीत ते सर्वश्रेष्ठ अशी घोषणा करताच मी अप्रत्यक्ष स्वरुपात श्रेष्ठ ठरतो यामुळेच माझ्याशी निगडीत त्याचा अपमान-अवहेलना- विटंबना होते. आमची अस्मिता व स्वाभिमान इतका किरकोळ आहे की उठसुठ कोणीही अपमान करेल? समाज असो की संस्कृती, भाषा असो की प्रांत व्यापक आहेत मात्र मानव व्यक्तिगत अहंकाराने त्यांना संकुचित व लहान ठरवतो यामुळेच सर्वश्रेष्ठ अशी घोषणा करीत राहतो.
माझ्याशी निगडीत ते सर्व श्रेष्ठ अशी घोषण का? तर स्वतःला श्रेष्ठ ठरवणे. या घोषनेतील फक्त मी व माझा काढा नंतर घोषणा देऊन पहा वास्तवाचा प्रत्यय मिळेल.  

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते