बेरोजगारी मागील काही दाहक वास्तव
बेरोजगारी ही
काळासोबत निर्माण झालेली एक सामाजिक समस्या आहे. बेरोजगारी ही जवळपास प्रत्येक
देशाला भेडसावणारी समस्या आहे. एकीकडे लोकासंखेचा डोलारा वाढत आहे त्याप्रमाणात
रोजगार निर्माण होत नाहीत याबद्दल दुमत नाही मात्र जे रोजगार उपलब्ध आहेत
त्याठिकाणी काम करण्याची बेरोजगारांची मानसिकता नाही या वास्तवाला नाकारता येणार
नाही.
एकीकडे रोजगार मिळत
नाही अशी तक्रार करणारे अनेक आहेत मात्र कामगार मिळत नाही अशी तक्रार करणारे देखील
तितक्याच प्रमाणात आहेत. माझ्या मते रोजगार मिळत नाही यापेक्षा मला अपेक्षित
असणारा रोजगार मिळत नाही असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. बेरोजगारी मध्ये
अपेक्षेची भूमिका निर्णायक आहे. कोणताही व्यक्ती रोजगारी की बेरोजगार यामध्ये त्या
व्यक्तीची अपेक्षा निर्णायक आहे. अर्थात प्रत्येक व्यक्ती योग्य व वाजवी अपेक्षा
बाळगतो मात्र त्याच्या व्यक्तिगत दृष्टी व आकलन यांच्या अनुसार जे योग्य व वाजवी
आहे त्याच अपेक्षा बाळगतो याबद्दल दुमत नाही.
अपेक्षा त्या ठिकाणी
अपेक्षाभंग तसेच योग्य त्याठिकाणी अयोग्य व वाजवी त्याठिकाणी अवाजवी देखील आहे
याबद्दल मानवाला ना ज्ञान, ना भान, ना जान. अपेक्षा विना अपेक्षा भंग होणार का?
योग्य विना अयोग्य होणार का? वाजवी विना अवाजवी होणार का? कोणत्या व्यक्तीने कोणती
अपेक्षा बाळगावी हा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे मात्र अपेक्षाभंगाचे खापर इतरावर
फोडता काम नये.
आज अनेकांना
अपेक्षित रोजगार मिळत नाही तसेच भविष्यात देखील मिळणार नाही कारण अपेक्षा बदलतात
तसेच वाढत राहतात. ज्यांना कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही त्यांना व्यापक
प्रमाणात रोजगार उपलब्ध आहेत ते देखील अनपेक्षितरीत्या. रोजगाराप्रती अपेक्षा
म्हणजे त्याची सशर्तता आहे. सशर्तता म्हणजे अज्ञान व अहंकार यांचे द्योतक आहे.
याप्रकारच्या व्यक्ती वास्तव दुर्लक्षित करतात तसेच कामाचे दर्जात्मक वर्गीकरण
करताना हे हलके, ते न शोभणारे काम असा विचार करतात व बेरोजगार राहतात प्रसंगी इतर
बेरोजगार गोळा करून टवाळकी करण्यात धन्यता मानतात परंतु मिळेल ते काम करून अनमोल
अनुभव प्राप्त करण्याची संधी दवडतात.
कोणत्या क्षेत्रातील
कोणता अनुभव कोणत्या ठिकाणी व कोणत्या पद्धतीने व कोणत्या प्रकारे व कोणत्या
प्रमाणात व कसा उपयुक्त ठरणार याचा कोणताही नियम अथवा भरवसा नाही. थोडक्यात मिळेल
तो रोजगार करता एकतर अनुभव मिळतो दुसरे कमीत कमी परावलंबन होते तसेच आपल्या
कौटुंबिक घटकांच्या आपणाकडून असणाऱ्या काही अपेक्षा काही प्रमाणात पूर्ण होण्यास
प्रारंभ होतो. एखाद्या कामाची लाज बाळगण्यापेक्षा परावलंबन ते देखील
कर्त्या-सावरत्या वयात अधिक लाजिरवाणे आहे असे मला वाटते.
समजा अपेक्षित काम-रोजगार
मिळत नसेल तर स्वयंरोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. अर्थात यासाठी भांडवल
कमी पण इच्छा शक्ती अधिक गरजेची असते. इच्छा तिथे मार्ग आहे फक्त शोधावा लागतो.
तसेच सोबत आत्मविश्वास असावा लागतो. आत्मविश्वास असणारा व्यक्ती स्वतः जवळ काय
नाही याचा फाजील विचार करीत नाही किंवा त्याचा पाढा वाचत नाही, याउलट जे उपलब्ध
आहे त्याचा वापर व विनियोग करीत मार्ग निर्माण करतो. यामुळे या व्यक्तींना वारंवार
संधी मिळते मात्र अज्ञानी व अहंकारी संधीची वाट पाहतात किंवा संधी गेल्याचा
पश्चाताप करीत संधी एकदाच मिळते असा पाढा वाचतात. वास्तवात संधी शोधा म्हणजे सापडत
राहते. जो शोधतो तो कधीच बेरोजगार राहणार नाही मात्र वाट पाहणार त्याला रोजगार
मिळणार नाही.
Comments
Post a Comment