भविष्य
माणूस व भविष्य यांचे नाते अतूट आहे. किंबहुना समस्त सृष्टीचे भवितव्य मानव ठरवणार आहे. आज मानव भवितव्य सुरक्षित करण्यासाठी अहोरात्र झटत आहे पण भविष्य म्हणजे काय याचा कधी सखोल विचार करून झटतो की सगळे करतात म्हणून मी करतो? या प्रश्नाचे उत्तर अत्यंत महत्वाचे आहे. कारण याप्रश्नाचे उत्तर मानवी स्वभाव, आकलन, दृष्टीकोन यातून घडणारे आचरण ठरवणार आहे यामुळे भविष्य ठरणार आहे. इथे एका मानवाचा किंवा एका कुटुंबाचा भविष्याचा विचार अथवा प्रश्न नसून मानवी समूह तसेच सृष्टी यांच्या भवितव्याचा प्रश्न व विचार आहे. काही मानव फक्त स्वतः पुरता विचार करतात मात्र अप्रत्यक्षात समस्त मानवी समूहाला बाधित करतात कारण संस्कार व अनुकरण. या मानवाची अपत्य असोत की संपर्कात येणाऱ्या व्यक्ती असोत यांच्या आचरणाने प्रभावित व संस्कारीत होतात.
भविष्य म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर व्यक्ती परत्वे बदलते कारण आकलन संकल्पना, परिभाषा. मानवाची जडण-घडण होणार त्याप्रमाणे संकल्पना व परिभाषा. प्रत्येक व्यक्ती व्यक्तिगत दृष्टीने योग्य तीच संकल्पना-परिभाषा करणार यामध्ये शंका नाही. भविष्य म्हणजे येणारा संभाव्य काळ, एक शक्यता, वर्तमान काळाची एक निष्पत्ती. वास्तवात मानवाने आकलन सुलभ करण्यासाठी काळाचे सोयीस्कररीत्या केलेले एक विभाजन आहे. वर्तमान हा एकमेव काळ आहे. भूतकाळ हा स्मृती संग्रह किंवा कालचा वर्तमान होता. तसेच भविष्य हा कल्पना विस्तार तसेच उद्याचा संभाव्य वर्तमान आहे. काळ व जीवन यांचा अनन्य साधारण महत्व आहे असे धर्म व विज्ञान सांगते.
कोणताही जन्म हा भूतकाळ आहे. जन्म हा नेहमी भूतकाळात असतो. वर्तमान क्षणात जन्म नाही कारण काळ अविरत प्रवास करतो. तसेच कोणताही मृत्यू हा भविष्यात असतो. कोणताही मुत्यू वर्तमानाक्षणात नसतो. जन्म हा मागचा क्षण तसेच मृत्यू हा पुढचा क्षण आहे. जीवन फक्त वर्तमान क्षणात आहे. भविष्यात मृत्यू आहे हे माहित नसणारा माणूस दुर्मिळ मात्र भविष्याची चिंता किंवा तरतूद यांचा विचार न करणारा माणूस दुर्मिळ आहे. माणूस भविष्याचा विचार करतो कारण भविष्य हा त्याच्या कल्पनेचा विस्तार आहे. कल्पना मागे आशा आहे. मानवी आशा त्याच्या अहंकाराचे एक स्वरूप आहे. अहंकाराला भविष्याची नितांत गरज आहे किंबहुना भविष्य अहंकाराचा एक विस्तार आहे. मात्र मानव अहंकाराच्या संभ्रमात अडकतो. यामुळे तो भविष्याची तरतूद करण्यासाठी धावपळ करतो.
मानव स्वतःचे तसेच स्वतःच्या अपत्यांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी पाळतो असा समज बाळगतो मात्र सुरक्षा मागे भय आहे व भयामागे अहंकार आहे. अहंकाराचे विवेकात परिवर्तन होताच भूत व भविष्य गळून पडतात व जीवनाच्या वास्तवाचे दर्शन मिळते. जीवन हा मृत्यूचा प्रवास आहे. जन्म म्हणजे वास्तवात मृत्यूचा प्रवास आरंभ बिंदू आहे. घटक निसर्गातील असो की ब्रम्हांडातील असो तो जन्म घेतो त्याचवेळी मृत्यूचा प्रवास सुरु होतो. जन्म व मृत्यू एकाच प्रक्रियेचे दोन बिंदू आहेत मात्र मानव एकांगी दृष्टीने यांना भिन्न समजत वाटचाल करतो.
निसर्ग-सृष्टी यांचा जन्म भूतकाळात झाला असून त्यांचा मृत्यू प्रवास सुरु आहे तसेच याप्रवसाला मानव व्यापक प्रमाणात गती प्रदान करीत आहे. बहुदा मानवाची उत्पत्ती सृष्टीच्या विनाशासाठी झाली असावी. कोणत्याही धर्मग्रंथा मध्ये डोकावता प्रलय, महाविनाश यांचे भविष्य वर्णन केल्याचे आढळते हा योगा योग नसून समग्रता पाहण्याचा प्रयन्त आहे. वर्तमान मानवी जीवन पाहत प्रत्येक क्षेत्रातील अतिरेक पाहत विनाशाचे संकेत मिळतात फक्त पाहणारी दृष्टी व आत्मसात करणारे आकलन यांची गरज आहे. थोडे स्वतःचे परीक्षण करून पहावे म्हणजे स्वतःचा अतिरेक लक्षात येणार आहे. अखेर अती तिथे माती.
Comments
Post a Comment