आधुनिक गुलामगिरी
कधी काळी मानवी समाजात मानवीय गुलामगिरीची पद्धत अस्तित्वा मध्ये होती. काळाच्या ओघात ती नष्ट झाली असे समजण्यात येते मात्र निसर्गात नष्ट होण्यापेक्षा स्वरूप परिवर्तन घडते मात्र मानव भिन्न स्वरूपांना भिन्न अस्तित्व मानतो. वर्तमान समाजात गुलामगिरी अस्तीत्वा मध्ये आहे फक्त तिच्या स्वरुपात तसेच त्याच्याकडे पाहणाऱ्या दृष्टीकोनात बदल झाला आहे यामुळे त्याला गुलामगिरी समजण्यात येत नाही.
वर्तमान समाजात भौतिक घटकांची मालकी समजण्यात येते, ती वास्तवात एक प्रकारची गुलामगिरी आहे. प्राचीन काळात गुलाम विकत घेण्यात येत मात्र वर्तमान काळात पैसा मोजून गुलामगिरी स्वीकारली जात आहे. पूर्वी गुलाम मालकाचे रक्षण करीत मात्र वर्तमानात मालक(गुलाम) भौतिक घटकांचे रक्षण करतात.
सामान्यतः मालकी व गुलामी यांना भिन्न व विरुद्ध समजण्यात येते मात्र या भिन्नता मागे एकता आहे तसेच विरुद्धता मागे परस्पर पूरकता व सापेक्षता आहे. वास्तवात मालकी व गुलामी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कोणत्याही व्यक्तीला एका वेळेस एका नाण्याची एकच बाजू पाहता येते तसेच दुसरी बाजू पाहण्यासाठी नाणे उलटे करून पहावे लागते. आपण नाण्याची जी बाजू पाहतो ते नाण्याचे प्रत्यक्ष स्वरूप असताना दुसरी बाजू अप्रत्यक्ष स्वरुपात असते. आपण ज्या वेळी नाण्याचे अप्रत्यक्ष स्वरूप(दुसरी बाजू) पाहण्याचा प्रयन्त करतो त्यावेळी प्रत्यक्ष हे अप्रत्यक्ष होते तसेच अप्रत्यक्ष हे प्रत्यक्ष होते. याठिकाणी काही व्यक्ती या दोन्ही स्वरूपांना भिन्न मानू शकतात मात्र एकता दुर्लक्षित करता कामा नये.
कोणत्याही नाण्याला एकच बाजू असेल तर त्याची व्यावहारिक किंमत-मूल्य काय? जो पर्यंत नाण्याला दोन बाजू नाहीत तो पर्यंत त्याला मूल्य नाही. मालक होण्यासाठी गुलामी तसेच गुलामी विना मालकी होत नाही. वर्तमान समाजात जे स्वतःला भौतिक घटकांचे मालक समजतात ते अप्रत्याक्षात गुलाम आहेत मात्र त्या संदर्भात माहिती अथवा जाणीव नाही.
एखाद्या भौतिक घटकाचा मालक असणाऱ्या व्यक्तीच्या भौतिक घटकाचे काही नुकसान झाले, चोरी झाली तर त्या भौतिक घटकाला काही फरक पडतो किंवा नाही हा भाग वेगळा आहे पण मालकाची अवस्था काय होते? मालकाची होणारी अवस्था ही त्याच्या गुलामीची द्योतक आहे. आज दुचाकी-चार चाकी अनेकांन जवळ आहे. जवळपास एखाद्या दुचाकी-चार चाकीची चोरी- नुकसान झाले तर अनेक मालकांची झोप उडते. मालक असून तो गाडीची काळजी घेतो-राखण करतो? वाह रे मालकी!
मालकी मधील गुलामी प्रत्येकाला समजते, जाणवते असा नियम नाही. काही व्यक्ती या गुलामीला मालकाचे कर्तव्य समजतात. अर्थात ज्याचा त्याचा दृष्टीकोन तसे आकलन आहे. अखेर दृष्टी तशी सृष्टी भासते मात्र दृष्टी तीच सृष्टी नाही. दृष्टीला मर्यादा आहेत पण सृष्टीला मर्यादा नाहीत. थोडे विचार करून पहा आपण नुसतेच मालक आहोत की गुलाम देखील आहोत. विशेष म्हणजे ही गुलामी कोणीही कोणावर लादत नसून माणूस स्वतःहून स्वीकारत आहे. कारण नाण्याची एकच बाजू पाहून त्याला समग्र समजतो मात्र कालांतराने त्याला गुलामगिरीची जाणीव होते कारण परिवलन हा निसर्ग नियम आहे. काळाच्या ओघात प्रत्यक्ष हे अप्रत्यक्ष होते व अप्रत्यक्ष हे प्रत्यक्ष होते.
Comments
Post a Comment