अर्थाचा अनर्थ
अर्थाचा
अनर्थ होणे अशी एक म्हण आहे. अर्थाचा अनर्थ कसा होतो हे अनेकांना माहित किंवा
ज्ञात नाही. सामान्यतः कोणत्याही शब्दाचा अर्थ हा शब्दात असल्याचे समजले जाते
मात्र प्रत्येक शब्द म्हणजे अभिव्यक्ती करण्याचे एक ढोबळ तसेच संक्षिप्त माध्यम
आहे. अर्थात प्रत्येक शब्दाला अर्थ आहे पण तो शब्दार्थ, भावार्थ, मतितार्थ या
स्वरुपात आहे. ज्याप्रमाणे शब्दात अर्थ त्याच प्रमाणे प्रत्येक माणसाच्या आकलनात
त्याची एक परिभाषा( व्याख्या) असते. शब्दामागे भावना असते.
योग्य
हा एक शब्द त्याला पुस्तकी-व्याकारानात्मक एक अर्थ आहे तसेच प्रत्येक व्यक्तीनुसार
योग्य या शब्दाची परिभाषा आहे. कोणत्याही व्यक्तीला योग्य म्हणजे काय प्रश्न करून
पाहावा म्हणजे त्या व्यक्तीची योग्य या शब्दाची व्याख्या समजण्यास मदत मिळते.
व्यक्तीनुसार या परिभाषेत बदल घडतो कारण प्रत्येकाची दृष्टी भिन्न यामुळे आकलन
भिन्न. हिंसा योग्य की अयोग्य? याला काही व्यक्ती योग्य तर काही अयोग्य असे उत्तर
देतील कारण दृष्टीकोन, आकलन, जडण-घडण, संस्कार.
हिंसा
म्हणजे काय? असा प्रश्न करता दुसऱ्यांना त्रास देणे असे समजण्यात येते.
ज्याव्यक्तीची जडण-घडण हिंसक वातावरणात होते तो हिंसा योग्य समजतो तेच वैचारीक
प्रगल्भता व परिपक्वता असणारा व्यक्ती हिंसा अयोग्य मानतो. तेच व्यक्ती
अध्यात्माचा जाणकार असेल तर अहिंसा सांगतो. अहिंसा म्हणजे हिंसेच्या विरुद्ध नसून
हिंसेचा अभाव आहे. हिंसेच्या भावनेचा अभाव म्हणजे अहिंसा आहे. अध्यात्म म्हणजे एका
शब्दात सार. अध्यात्मिक हिंसा म्हणजे एखाद्याला हीन समजणे. हीन समजणे म्हणजे एकतर
इतरांचे मुल्यांकन करणे, परपरीक्षण करणे तसेच स्वतःला उच्च समजणे म्हणजे अहंकार
आहे. अध्यात्मात अहंकारला फार महत्व आहे. अहंकाराचे अज्ञान हिंसा घडवते तसेच समस्त
पाप घडवते.
मानव
कोणत्याही शब्दाला व्यक्तिगत सुलभता व आकलन यानुसार अर्थ प्रदान करतो. इथे समस्त
गल्लत घडते. शब्द देणारा व्यक्ती शब्दशः अर्थाने देतो की व्यक्तिगत आकलन परिभाषा
नुसार(मतितार्थ) प्रदान करतो की भावार्थाने(भावनाप्रधान) शब्दाचे प्रयोजन करतो
यानुसार त्याचा अन्वयार्थ आहे तसेच या शब्दाला स्वीकारणारे व्यक्तिमत्व कोणत्या
अर्थाने घेते यानुसार अर्थ बदलतो. शब्द देणाऱ्या पेक्षा घेणारा व्यक्ती महत्वाचा
आहे कारण तो अर्थाचा अनर्थ करतो तसेच परिवर्तन घडवतो.
परिवर्तन
हा निसर्ग नियम आहे याला शब्द व त्याचा अर्थ अपवाद नाही मात्र मानव या वास्तवाला
दुर्लक्षित करतो तसेच मी घेतलेला अर्थ सत्य असा अट्टाहास करतो. वास्तवात शब्दाचे
प्रयोजन होते त्याक्षणा पासून त्याचा अनर्थ सुरु होतो. अर्थ व अनर्थ एकाच
नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक स्वरूप प्रत्यक्ष असताना दुसरे स्वरूप अप्रत्याक्षात
असते. कालांतराने अप्रत्यक्ष हे प्रत्यक्ष स्वरूप धारण करते व प्रत्यक्ष हे
अप्रत्यक्ष स्वरूप धारण करते कारण परिवलन. सृस्ष्टीतील परिवर्तन मागे परिवलन आहे.
जगातील
समस्त धार्मिक ज्ञान-तत्वज्ञान यामधील अर्थाचा अनर्थ झाल्याचा प्रत्यय मिळतो.
इस्लाम म्हणजे शांती जो शांतीला मानतो तो इस्लामिक. मात्र वर्तमान समाजात जो नमाज
पडतो, मूर्ती पूजा करीत नाही, दाढी वाढवतो, कुरान वाचतो, मस्जिद मध्ये जातो, ज्याने
इस्लाम स्वीकारला किंवा ज्याचे आई वडील इस्लामिक आहेत तोच मुसलमान व बाकी इतर
काफिर. काफिरांचा खातमा करण्यासाठी वर्तमान जगात अशांतता निर्माण करण्यात येत आहे
ती देखील स्वतःला इस्लामिक समजतात त्यांच्या द्वारे हा समस्त प्रकार म्हणजे
अर्थाचा अनर्थ आहे.
जैन
धर्मात अहिंसा, अपरिग्रह यांना असाधारण महत्व आहे. जैन स्वतःला उच्च समजतात हीच
हिंसा आहे तसेच अपरिग्रह म्हणजे विनाकारण संग्रह किंवा गरजेपेक्षा जास्त सांभाळणे.
आज भारतातील श्रीमंत वर्गात जैन धर्मियांची संख्या लक्षणीय आहे. जैन व्यक्तींनी
गरजा वाढण्यास प्रारंभ केला. मर्यादा पुरुषोत्तम राम यांच्या जन्म भूमीच्या वादात
समस्त मर्यादा उल्लंघन करण्यात आले त्यावेळी भावना व आस्था या गोंडस नावाचा आधार
घेण्यात आला मात्र भगवान राम यांनी विवेक व सयंम यांची शिकवण दिल्याचे दुर्लक्षित
झाले थोडक्यात मानव सोयीने अर्थाचा अनर्थ करतो पण तो अनर्थ हा अर्थ स्वरुपात असतो.
वरील लिखाण निष्कर्षात्मक आहे मात्र त्यामागील निकष व
विश्लेषण यावर ‘स्व’भाव सापेक्षता( दृष्टी मागील सृष्टी) या लवकरच प्रकाशित
होणाऱ्या पुस्तकात सविस्तर मांडले आहे.
Comments
Post a Comment