उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग


     कोणत्याही भाषेतील वृत्त वाहिनी पाहता उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग या म्हणीचा प्रत्यय मिळतो. कोणत्याही प्रकारची घटना घडताच करंट इश्यूच्या नावाखाली काथ्याकुट सुरु करतात मात्र आपण समाजाला जो संदेश वा शिकवण देतो त्याचा ना विचार केला जातो ना त्यासंदर्भात भान राखले जाते. वृत्त वाहिनी मधील होणारी चर्चा ही समाजाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरुपात शिकवण व संस्कार प्रदान करते मात्र याची जाणीव अथवा भान वृत्त वाहिनी मध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना नसावी किंवा वेड पांघरून पेडगावला जाण्याचा प्रकार तरी असावा.
     घटना घडल्या नंतर तत्परतेने विश्लेषण करीत आम्ही पहिले साठी घाई गडबड करण्यात येते मात्र आपण जे विश्लेषण करतो ते व्यापक दृष्टीने की संकुचित दृष्टीने याची खातरजमा केली जाते का? आपण जे विश्लेषण करतो ते एकांगी की सर्वांगीण समीप याचा कधी विचार केला का? या प्रश्नां संदर्भात विचार करणे दूर याउलट मी सत्य व सर्वांगीण परिपूर्ण या थाटात विश्लेषण करण्यात येते. वृत्त वाहिनीच्या पत्रकारांना आपण परिपूर्ण आहोत हा एक भ्रम असावा किंवा स्वतःच्या अपरिपूर्णत्वाची जाणीव वा भान नसावे. यामुळे माध्यम या स्वरुपात काम करताना निरीक्षण करावे याचे भान राहत नाही. परिणाम स्वरूप पत्रकार असो की निवेदक तोच वादी व प्रतीवादी वकील तसेच न्यायाधीश या समस्त भूमिका एकटाच पार पडतो.
     कोणत्याही न्यायालयात वादी व प्रतीवादी वकील असो की पक्षकार यांना भूमिका मांडण्याची मुभा असते तसेच दोन्ही पक्षाचे युक्तिवाद संपल्यानंतर न्यायाधीश संतुलानात्मक विचार करून निर्णय घेतात नंतर निवडा होतो मात्र पत्रकार एका झटक्यात निवडा करून मोकळे होतात. अती घाई संकटात जाई याचे पत्रकारांना भान आहे का? असा प्रश्न उद्भवतो.
     आरुषी-हेमराज हत्याकांड ज्या वेळी झाले त्यावेळी एका अती उत्साही वृत्त वाहिनीने हे हत्याकांड कसे झाले याचे अँनिमेशन करून दाखवले. जे कोडे आज पर्यंत सी.बी.आय. सारख्या संस्थेला उलगडले नाही ते त्यांना त्यावेळी उलगडले होते? श्री.कपिल सिब्बल यांनी इंटरनेट च्या माध्यमातून चालेला स्वैराचार रोखण्याचा विषय घेतला त्यावेळी राजकीय रंग देत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा आलाप घेताना सामाजिक स्वैराचार दुर्लक्षित केला कारण स्वतः अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार करीत आहेत. मुळात ज्यांना स्वातंत्र्य व स्वैराचार यातील भेद कळत नाही त्यांना स्वैराचार समजणार का?
     श्री.कपिल सिब्बल यांच्या कृती नंतर स्वातंत्र्याची गळचेपी असा सूर अनेकांनी लावला याला पत्रकार असो की सामान्य माणूस यांचा अपवाद नाही परंतु यापैकी किती व्यक्तींनी सामाजिक सांकेतिक स्थळावरील स्वैराचार पहिला आहे? सांकेतिक स्थळावर भेट द्या व बघा उठ सुठ कोणीही कोणाचीही लायकी ठरवतो तीदेखील स्वतःच्या अपूर्ण दृष्टी व अपूर्ण अक्कल यांच्या आधारे? स्वतःचे घर नीट सांभाळता येत नाही तो देश सांभाळण्या संदर्भात मार्गदर्शन करतो. स्वतःचा भ्रष्टाचार न पाहता इतरांकडे बोट दाखवतो. स्वतःची कर्तव्य नीट पाळत नाही मात्र इतरांनी कर्तव्य पाळावीत ही अपेक्षा बाळगतो प्रसंगी अट्टहास करतो.
     समाजात प्रतिक्रिया देण्याची तत्परता वाढत आहे पण प्रतिक्रिया देण्यापूर्वी क्रिया समजावून घेतली का? याबद्दल विचार केला जात नाही कारण स्वतःला परिपूर्ण समजण्यात येते मात्र समजणे व असणे यामध्ये अंतर आहे याची जाणीव आहे का? दुर्दैवाने या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे कारण तत्परता. कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही ठिकाणी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देताना व्यक्तिगत दृष्टी व आकलन मर्यादा यांचे भान राखणे गरजेचे आहे. आपण जे पाहतो, समजतो त्यानुसार आकलन करतो मात्र पाहणारा दृष्टीकोन बदलता सगळे बदलते. आपण आपल्या मताचे समर्थन करतो तसेच त्याच मताचा विरोध करून पहा म्हणजे प्रत्यय मिळेल अन्यथा वृत्त वाहिनी प्रमाणे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते