प्रगती ते अधोगती
मी नुकताच बिहार व झारखंड राज्यांचा तीर्थाटन
निमित्ताने प्रवास केला. या दोन्ही राज्यातील सामाजिक, आर्थिक परिस्थिती जवळून
पाहण्याची संधी मिळाली. भगवान महावीर व भगवान गौतम बुद्ध यांची जन्म व कर्म भूमी
हीच का? असा एक प्रश्न मनात निर्माण झाला. कारण वैभवाचा इतिहास ते दारिद्रतेचा
वर्तमान असा प्रवास. कधी काळी ज्ञान संपन्न असणारा प्रदेश ज्या मध्ये कधी काळी
नालंदा सारखे विश्व विद्यापीठ होते त्या बिहार मध्ये आज मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी
इतर राज्यात जावे लागते.
बिहार राज्याचा गौरवशाली इतिहास तसेच विदारक
वर्तमान यामध्ये फार अंतर नाही. महावीर व गौतम बुद्ध यांचा इतिहास फक्त २५०० ते
२६०० वर्षा पूर्वीचा आहे. महावीर व बुद्ध यांच्या काळात या प्रकारच्या वर्तमान
संदर्भात कोणी भाकीत केले असते तर त्याला तत्कालीन समजणे मुर्खात काढले असते. कारण
तत्कालीन वर्तमान हा समृद्ध व संपन्न असा होता.
एकंदरीत प्रगतीचा भूतकाळ असणारा प्रदेश
वर्तमानात अधोगती दर्शवतो यामागे निसर्ग नियम आहे. परिवर्तन हा निसर्गाचा मुलभूत
स्वभाव आहे यामागे परिवलन आहे. निसर्गातील प्रत्येक घटक प्रत्येक क्षणात अस्थिर
आहे. प्रत्येक घटक प्रवास करतो अर्थात हा प्रवास दोन ध्रुवा दरम्यान आहे. प्रगती व
अधोगती हे देखील प्रवासाचे दोन ध्रुव आहेत.
प्रगती व अधोगती या
परस्पर विरोधी संकल्पना आहेत तसेच परस्पर सापेक्ष संकल्पना आहेत. प्रगती विना
अधोगती नाही तसेच अधोगती विना प्रगती नाही. मात्र मानव सामान्यतः या दोघांना भिन्न
समजतो परंतु भिन्नता मागील एकता, सापेक्षता, परस्परपुरकता यांना दुर्लक्षित करतो
कारण दृष्टीकोन व आकलन मर्यादा तसेच अज्ञान.
मानव एकांगी पाहतो
तसेच एकांगी आकलन करतो मात्र या एकांगी पणास समग्र, संपूर्ण समजतो तसेच समज मधील
गैरसमज दुर्लक्षित करतो यामुळे गल्लत घडते. प्रगती त्याच ठिकाणी अधोगती आहे मात्र
ती अप्रत्यक्ष स्वरुपात आहे. तसेच अधोगती त्याठिकाणी प्रगती आहे मात्र अप्रत्यक्ष
स्वरुपात आहे. प्रगती विना अधोगती नाही तसेच अधोगती विना प्रगती नाही. जो मानव,
समाज प्रगतीचा प्रवास करतो त्याची अधोगती ही ग्राह्य तसेच अप्रत्यक्ष स्वरुपात
आहे. किंवा प्रगती मागे अधोगतीचा इतिहास आहे तसेच अधोगतीचे भविष्य देखील आहे. या
उलट अधोगती मागे प्रगतीचा इतिहास तसेच प्रगतीचे भविष्य आहे.
आज जो मानव प्रगतीचा
प्रवास करतो त्यामागे अधोगतीचा इतिहास आहे. तसेच भविष्यात अधोगती होणार आहे कारण
प्रत्यक्षात प्रगतीचा प्रवास हा अप्रत्यक्षात अधोगतीचा प्रवास आहे. ज्या प्रमाणे
सूर्योदय हा सूर्यास्ताचा प्रवास प्रारंभ त्याच प्रमाणे प्रगतीचा प्रवास हा
अधोगतीचा प्रवास आहे. प्रत्येक सुर्योदायामागे एक काळरात्र आहे तसेच सूर्योदयानंतर
देखील एक काळरात्र आहे फक्त याचे आकलन होण्यासाठी काळ जावा लागतो.
वर्तमान मानवाला
स्वतःच्या प्रगतीचा अभिमान व गर्व आहे मात्र तो अप्रत्यक्षात येणाऱ्या अधोगतीला
दुर्लक्षित करीत आहे. वर्तमान मानवी आचरण पाहता येणाऱ्या अधोगतीची चाहूल मिळते.
वर्तमान मानव एकीकडे अण्वस्त्र संशोधन ते निर्मिती यावर आरबो रुपयांचा खर्च करतो
कारण सुरक्षा. मात्र आक्रमण ही संभाव्य शक्यता असून प्रत्येक देशात कुपोषण, भूकबळी
ते मुलभूत गरजा पूर्तता करणे कठीण असण्या सारखे वास्तव दुर्लक्षित करण्यात येते.
संभाव्य शक्यता साठी अरबो मात्र वास्तवासाठी किती? याला प्रगती म्हणावे की अधोगती?
एकीकडे मानव ग्लोबल
होण्याच्या गप्पा मारतो फेसबुक, ब्लॉग, ट्विटर सारख्या सामाजिक सांकेतिक स्थळांना
देण्यासाठी वेळ आहे सोबत जगाच्या कानाकोपऱ्यात संवाद आहे मात्र कौटुंबिक घटका सोबत
संवाद कमी विवाद अधिक आहे याला प्रगती म्हणावे की अधोगती?
काळाच्या ओघात
साक्षरता व्यापक प्रमाणात वाढत असताना देखील हिंसाचार, माझे-तुझे, असुरक्षितता,
बलात्कार, थोडक्यात गुन्हेगारी वाढत आहे याला प्रगती की अधोगती समजता? विश्व
ज्ञानात गगन भरारी घेणाऱ्या मानवाला धड स्वतःचा स्वभाव ते ‘स्व’भाव संदर्भात
माहिती नाही याला प्रगती म्हणावे की अधोगती?
अर्थात सूर्योदय व
सूर्यास्त म्हणजे वास्तवात एक आभास, एक संभ्रम असून वास्तवात या संकल्पना आहेत.
मानवाने आकलन व अभिव्यक्ती सुलभ करण्यासाठी निर्माण केलेल्या संकल्पना आहेत.
प्रगती व अधोगती देखील याला अपवाद नाही.
माझ्या प्रकाशित होणाऱ्या
‘स्व’भाव सापेक्षता या पुस्तकात प्रगती-अधोगती वर एक सविस्तर प्रकरण आहे.
Comments
Post a Comment