सापडला तो चोर बाकी साव?
श्री.कृपाशंकर यांची
बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देताच राजकीय जीवनात आरोप-प्रत्यारोप यांना
उधान आले तसेच सामाजिक जीवनात राजकारण व भ्रष्टाचार, अमाप संपत्ती यांच्या
संदर्भात चर्चा सुरु झाल्या आहेत. राजकीय-वैचारीक विरोधाचा आभास निर्माण करणारे
प्रतिस्पर्धी पक्षांना याठिकाणी आयती संधी मिळाली तसेच संधीसाधू या सुवर्ण संधीचे
सोने करणार नाही तर नवलच होणार.
वर्तमान राजकारणात
बेहिशोबी व अमाप संपत्ती असणारे व्यक्ती एकाच पक्षात आहेत असा नियम अथवा कायदा
नाही. निवडणूक आयोगाने संपत्तीचा तपशील जाहीर करणे बंधनकारक केल्यापासून अनेक
नेत्यांची रीतसर असणारी संपत्ती जगाला समजण्यास प्रारंभ झाला आहे. नेत्यांची समस्त
संपत्ती ही वैध मार्गानेच येते असा नियम नाही तसेच अवैध मार्गानेच येते असा नियम
नाही.
एखाद्या नेत्याचा
भ्रष्टाचार उघडकीला आला की मात्र विरोधक त्यावर तुटून पडण्याचा प्रयन्त करतात. जणू
काही त्यांच्या पक्षातील समस्त नेते हे धुतल्या तांदळा सारखे स्वच्छ आहेत. सध्या
प्रत्येक पक्षात भ्रष्ट नेत्यांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढत आहे हे एक उघड
गुपित समस्त जगाला माहित असून यासंदर्भात ज्या त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांना
कल्पना-माहिती नसते यावर शेंबडे पोर तरी विश्वास ठेवणार का?
सध्या स्वतःच्या
पक्षातील नेत्यांची संपत्ती असो की स्वतःची संपत्ती असो ती वैध तसेच भ्रष्टाचार
मुक्त असल्याचा समज करून घेणे तसेच सांगणे यासाठी दुसऱ्या पक्षातील नेते किती
नालायक, किती भ्रष्ट यावर हल्ला माजवण्याचा प्रकार घडतो. गंमत म्हणजे कोणत्याही
नेत्याचा भ्रष्टाचार दुसरा नेता उघडकीला आणत नाही. पत्रकार, स्वयंसेवक सारख्या
व्यक्ती यासाठी जीवतोड मेहनत करतात पण नेते मात्र आयत्या पिठावर रेघोट्या मारतात.
वर या भ्रष्ट नेत्याला त्यांच्या पक्ष प्रमुख नेत्याने संरक्षण दिले, मदत केली,
वाचवण्याचा प्रयन्त करण्यात येतो यासारखे आरोप करण्यात येतात.
वास्तवात वर्तमान
राजकारणात-समाजकारणात सापडला तो चोर बाकी सगळे साव आहेत का? मी करतो त्यावेळी
व्यवसाय, समंधाचा फायदा यासारखी गोंडस नावे असतात तेच दुसरा करतो त्यावेळी पदाचा
दुरुपयोग-गैरफायदा-भ्रष्टचार असतो. आज प्रत्येक पक्षात तिकीट वाटप करताना कोणत्या
गोष्टीला किती प्राधान्य मिळते तसेच किती प्रमाणात पक्ष निधी गोळा केला जातो हे
सगळ्यांना माहित असणारे गुपित आहे. आज प्रत्येक राजकीय पक्षाची अधिकृत संपत्ती
पाहत खूप काही कळते.
जो स्वतः काचेच्या
घरात राहतो त्याने दुसऱ्यांच्या घरावर दगड फेक करावी का? आज वास्तवात गरज आहे ती
प्रत्येक पक्षाने तसेच व्यक्तीने स्वतःचे आत्मपरीक्षण करून स्वतःच्या अंतरंगातील
चोर-भ्रष्टता पाहण्याची. स्वतःला निर्दोष व निष्पाप मानत दुसऱ्यांच्या चोऱ्या
शोधण्या पेक्षा स्वतःच्या चोऱ्या शोधण्याची गरज आहे. उगाच सापडलाच तोच चोर असा
कांगावा करण्यापेक्षा प्रथम स्वतःच्या अंतरंगातील चोर व भ्रष्टता पाहण्याची गरज
आहे कारण याच समाजात जन्माला येत संस्कार घेणार एक व्यक्ती नेता होते दुसरा
पत्रकार, व्यापारी, सामान्य माणूस होते. आज समाजात जेकाही घडते त्यामागे
संस्कारांना निर्णायक भूमिका आहे.
थोडे स्वतःच्या
अंतरंगात डोकावून पहा म्हणजे स्वतः केलेल्या चोऱ्या-भ्रष्टचार यांचा प्रत्यय येणार
आहे.आज एक सापडला तसेच उद्या अनेक सापडणार आहेत त्यामध्ये आपला नंबर देखील असेल
का? याबद्दल विचार करून पाहावा म्हणजे वास्तवाचा प्रत्यय मिळेल. अर्थात काही
व्यक्ती मांजरासारखे डोळे झाकून दुध पिताना मला जग पाहत नाही असा संभ्रम बाळगणार यात
शंका नाही पण जेव्हा पेकाटात लाथ बसेल त्यावेळी.....
Comments
Post a Comment