शास्त्रांची शात्रोक्तता


सध्या ज्योतिषशास्त्र हे शास्त्र आहे का? किंवा याला काही वैज्ञानिक आधार आहे का? यासारखे प्रश्न विचारण्यात येतात तसेच होमियोपँथिक औषध प्रणाली मध्ये शास्त्रोक्तता आहे का? यासारखे प्रश्न निर्माण करणे ते विचारण्यात येतात. थोडक्यात प्रत्येक घटकातील वैज्ञानिक तत्व व तथ्य आहे किंवा नाही याची विचारणा करण्यात येते. गंमत म्हणजे ज्या मानवाच्या मनात वैज्ञानिक तथ्य संदर्भात शंका असते तो स्वतः या प्रश्नाचे उत्तर शोधत नाही तर इतरांना विचारत फिरतो.
ज्योतिष असो की होमियोपँथी यामध्ये शास्त्र आहे की नाही यासारखे प्रश्न निर्माण करणारे व्यक्तिमत्व हे तथाकथित विज्ञानवादी वर्गात मोडणारे आहे. तथाकथित कारण एकतर हे ज्या शास्त्राच्या वैज्ञानिक तथ्य संदर्भात प्रश्न निर्माण करतात त्या शास्त्राचा कवडी इतका अभ्यास करीत नाहीत मात्र व्यक्तिगत आकलन क्षमतेने इतरांच्या आकलन संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण करणारे तर्क करतात. तर्क करण्याचे एक शास्त्र आहे पण तर्काने समस्त शास्त्रांचा अभ्यास करता येणार का?
प्रत्येक शास्त्राला स्वतःची दृष्टी तसेच संकल्पना आहेत यामुळे कोणत्याही शास्त्राचा अभ्यास करताना त्याच दृष्टीने करवा लागतो. जर भौतिकशास्त्राला जीवशास्त्राच्या कसोटी-निकषावर तपासण्याचा प्रयन्त केला किंवा रासायानाशास्त्राला भौतिकशास्त्राच्या कसोटी-निकषावर तपासले तर काय होणार? थोडक्यात एक शास्त्र सापेक्ष दुसऱ्या शास्त्राचे परीक्षण करता गल्लत तसेच अर्धवट पणा होणार आहे कारण एका सापेक्ष दुसरा त्याच प्रमाणे दुसरा सापेक्ष पहिला असा अभ्यास करता काही प्रमाणात सर्वांगीण ते परिपूर्ण अभ्यास करण्याचा एक प्रयन्त करता येणार आहे.
शास्त्र कोणतेही असो ते निर्माण करण्यामागे मानवी प्रज्ञा आहे. मानव ज्या दृष्टीने पाहतो त्यापरत्वे आकलन करतो तसेच ज्ञान प्राप्त करतो. प्रत्येक शास्त्राला दृष्टी-आकलन-ज्ञान आहे तसेच मुळात मानवी दृष्टी-आकलन-ज्ञान यांना मर्यादा असल्याने प्रत्येक शास्त्राला मर्यादा आहेत. प्रत्येक शास्त्रात काही समज-गैरसमज आहेत तसेच काही प्रमाणात त्रूटी आहेत.
ज्योतिषशास्त्र असो की होमियोपँथी असो यांना स्वतःचा मुलभूत दृष्टीकोन, मान्यता,संकल्पना आहेत. तसेच यामध्ये उर्जा व तीचे चलन-वलन व प्रभाव यांना अनन्य साधारण महत्व आहे. ज्या विज्ञानवादींना वैज्ञानिक तथ्य संदर्भात शंका आहे ते यावस्तावला दुर्लक्षित करतात. मानव उर्जा संदर्भात जे काही जाणतो किंवा जे काही ज्ञान बाळगतो ते परिपूर्ण आहे का? यासंदर्भात विचार न करता निखळ तर्काने शंका-कुशंका निर्माण करण्यात येतात.
ज्योतिष शास्त्रात गणित व भाष्य असे दोन प्रमुख प्रकार आहेत. भाष्य हे अंदाज आधारित असते यामुळे काही प्रमाणात अंदाज चुकण्याची शक्यता असते. गंमत म्हणजे याच धरतीवर आधारित असणारे हवामान शास्त्र समजले जाते पण ज्योतिष शास्त्र नाकारण्यात येते.
कोणत्याही शास्त्रातील शास्त्रोक्तता आहे किंवा नाही यापेक्षा महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्याही शास्त्रातील शास्त्रोक्तता, वैज्ञानिकता आपल्या दृष्टी-आकलन कक्षेत येण्या इतकी आपली दृष्टी-आकलना कक्षा व्यापक आहे का? प्रथम दृष्टी व आकलन कक्षा व्यापक करून विचार करून पहा नंतर कोणत्याही शास्त्राची तपासणी करण्याच्या फंदात पडावे. थोडक्यात सृष्टी तपासण्यापेक्षा प्रथम दृष्टी तपासून पहावे म्हणजे दृष्टीच्या मर्यादा लक्षात येणार आहेत. जोपर्यंत दृष्टीच्या मर्यादा संदर्भात ज्ञान होणार नाही तो पर्यंत कोणत्याही ज्ञान मिळणार नाही. प्रयन्त करून पहा जमते-झेपते का? नंतर कोणत्याही व्यक्तीच्या प्रज्ञा संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण करा.    

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते