परिपक्वतेचा अभाव


टीम अण्णा व आंदोलन भरकटत असल्याचे काही पत्रकारांच्या निदर्शनास येत आहे किंवा याप्रकारचा मीडियाचा सूर आहे. मीडियाचा सूर कोणत्याही क्षणी पालटतो हे आम्हाला नवीन नाही. ज्या मिडीयाने या आंदोलनाला तसेच आंदोलकांना डोक्यावर घेत नायक केले तीच मिडिया आता पायउतार ते पाणउतार करण्यास कचरत नाही. टीम अण्णा यांच्या आंदोलनाची दिशा मी मुळात भरकटलेली होती फक्त ती त्याकाळात मिडीयाला दिसत-जाणवत नव्हती.
मिडिया असो की टीम अण्णा असो यांच्यातील परिपक्वतेचा अभाव दर्शवणारे हे आंदोलन भरकटणार ही काळ्या दगडावरील रेघ होती तसेच आहे. श्री.अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचार विरोधी असणारे कोणतेही आंदोलन पहा ते वास्तवात भ्रष्टाचार विरोधी नसून शासकीय भ्रष्टाचार विरोधी आहे. यामागील नेमके कारण काय? हे फक्त अण्णा हजारे सांगू शकतात. यासंदर्भात ज्या काही शक्यता आहेत त्यापैकी एक शक्यता म्हणजे प्रसिद्धीचा हव्यास, दुसरी शक्यता म्हणजे अज्ञान. जर एका वाक्यात समस्त शक्यता सांगायचे म्हटले तर परिपक्वतेचा अभाव.
श्री.अण्णा हजारे यांना स्वतःच्या कर्तुत्वाचा दंभ किती आहे हे मी सांगण्याची गरज नाही. श्री.अण्णा हजारे यांचा अहंकार सर्वश्रुत आहे. यामुळे श्री.अण्णा हजारे यांच्या सोबत काम करणारे दरवेळेस नवीन असतात तसेच जुने सहकारी दुरावलेले असतात. दंभ त्याठिकाणी दांभिकता येणार यात शंका नाही. त्याचा प्रमाणे ही दांभिकता जगासमोर उघडी पडणार यामध्ये देखील शंका नाही. श्री.अण्णा हजारे यांची अपरिपक्वता असो की अज्ञान जगजाहीर होण्यास सुरुवात झाली. अर्थात याला ते स्वतः जबाबदार आहेत.
श्री.अण्णा हजारे भ्रष्टाचार विरोधात लढताना स्वतःचा भ्रष्टाचार( आचरणातील भ्रष्टता) दुर्लक्षित करतात कारण आत्मपरीक्षणाचा अभाव. दंभ असणाऱ्या व्यक्ती आत्मपरीक्षण करू शकत नाहीत. एकीकडे स्वतःला गांधीवादी म्हणवतात मात्र गांधीवादाची पहिली पायरी चढत नाहीत. उपोषण करून, मौन व्रत धारण करून गांधी टोपी घालून कोणीही गांधीवादी होत नाही. गांधीवादाची पहिली पायरी आत्मपरीक्षण आहे. प्रथम स्वतःच्या चुकांचा मागोवा घेतला जातो तसेच त्यामध्ये सुधारणा करण्यात येतात मात्र अण्णा ना चुका शोधतात ना त्या मान्य करतात.
ज्या प्रकारे अण्णा दुसऱ्यांचे चरित्र हनन करतात, दुसऱ्यांची लायकी ठरवतात, स्वतःचा पुर्वानुग्रह इतरांवर लादतात, दुसऱ्यांचे समजावून घेण्यापेक्षा समजावण्याचा ते देखील जबरदस्तीने प्रयन्त करतात त्यावरून त्यांचा दंभ असो की अज्ञान उघडे पडते. मी संविधानाने दिलेला विधायक मार्गावरून वाटचाल करणार नाही मात्र जे या मार्गावरून वाटचाल करतात त्यांनी मी सांगणार तीच पूर्व दिशा मानत गपगुमान वाटचाल करावी अन्यथा ते भ्रष्ट, नालायक. थोडक्यात लोकशाहीत अभिनव हुकुमशाही निर्माण करणे हे कशाचे लक्षण आहे? यामुळेच लोकपाला सारखा हुकुमशाह निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
लोकपाल असो की कोणताही कायदा असो त्याने नियंत्रण अथवा निर्मुलन होते का? निखळ भारतीय नव्हे तर जागतिक इतिहास चाळून पहा कायद्याने नियंत्रण अथवा निर्मुलन होत नाही तर काही प्रमाणात प्रतिबंध होते. दुर्दैवाने भारतात प्रतिबंध होण्याचे प्रमाण नगण्य आहे कारण प्रत्येक जण म्हणतो हम करे सो कायदा. यामुळे लोकपाल सारखा कायदा करून किती प्रतिबंध होणार हा संशोधनाचा विषय आहे. नियंत्रण किंवा निर्मूलनाच्या वल्गना करणे किंवा दिवास्वप्न पाहणे तसेच दाखवणे सोपे आहे मात्र वास्तव पाहणे किंवा स्वीकारणे याला आकलनाची परिपक्वता लागते. ही परिपक्वता अण्णा किंवा टीम अण्णा यांच्या जवळ नाही यामुळे कायद्याचा अट्टाहास करण्यात येताना वास्तवात प्रबोधन दुर्लक्षित करण्यात येत आहे. यापूर्वी आग रामेश्वरी व बंब सोमेश्वरी असा ब्लॉग मी लिहिला आहे.
आंदोलनासाठी गर्दी गोळा करताना वादग्रस्त विधान करण्याचा सपाटा लावण्यात येतो. यावरून वक्तव्य करणाऱ्याचा बौध्यांक तसेच बौद्धिक कुपोषण समजते यामुळे जर उद्या टीम अन्नाच्या सदस्यांनी एखादे आयटम डान्स केला किंवा आयोजन केले तरी मला नवल वाटणार नाही कारण सदस्यांची अपरिपक्वता. अपरिपक्व माणूस दुसऱ्यांचे परीक्षण करतो, लायकी ठरवतो. स्वतः शासकीय कर न भरणारे, विमान तिकिटात गोंधळ करणारे स्वतःच्या चुका न शोधता दुसऱ्यांना चोर म्हणतात आणि यांचे पितळ उघडे पडते तेव्हा यांचे सरदार सोयीस्कररीत्या मौन व्रत धारण करतात यावरून परिपक्वता असो की बौद्धिक कुपोषण यांची जाणीव होते.
एकंदरीत अपरिपक्व व्यक्तींच्या आंदोलनाचा सामाजिक दुष्परिणाम पहिला आहे का? दिवसोंदिवस आम्ही अराजकता व हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. संसद तसेच संसदीय प्रणाली व संविधान यांचा अनादर करणे तसेच त्यांना नाकारण्याची प्रवृत्ती बळावत-बोकाळत आहे. भावी पिढीवर याच प्रकारचा संस्कार होत असून फेसबुक असो की सोशल नेटवर्किंग याठिकाणी प्रतिक्रिया पहा ज्याला धड स्वतःची..... धुण्याची अक्कल नाही तो संसद-सरकार यांनी काय करावे हे ठरण्याचा प्रयन्त करतो. घरा-घरात पहा पोरगे बापाची अक्कल काढत फिरतो.
टीम अण्णा असो की भ्रष्ट नेता असो जोतो ज्याच्या त्याचा संस्कार व संस्कृती यांचे प्रतिनिधित्व करतो. भारतीय संस्कृती ही परिपक्व ते अपरिपक्वता असा निसर्ग नियम विरुद्ध प्रवास करीत आहे कारण स्वतःला समाजाचे मक्तेदार, ठेकेदार म्हणवणारे स्वतः अपरिपक्व आहेत. परिपक्वतेचा अभाव अनागोंदी, अराजकता निर्माण करणार हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही.
आपण आपल्या अंतरंगात उतरून पहा आम्ही स्वतः काय करतो. एकांगी पाहतो-समजतो त्याला सत्य मानतो का? दुसऱ्यांचे परीक्षण करीत लायकी ठरवत तो नालायक व मी साजूक असा प्रकार करतो का? दुसऱ्यांच्या डोळ्यातील कुसळ पाहताना स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दुर्लक्षित करतो का? यांची उत्तरे होकारार्थी असतील तर आपण अपरिपक्व आहोत. थोडक्यात आपण आत्मपरीक्षण करतो की परपरीक्षण करतो याच अभ्यास करून पाहावा. परपरीक्षण असेल तर अपरिपक्वता निश्चित आहे. हिचा अपरिपक्वता सामजिक समस्यांच्या मुळाशी आहे.

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते