कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे?


परवा भारतीय रेल्वेचा अर्थ संकल्प संसदेत मांडण्यात आला. यासंदर्भात प्रत्येक वर्तमान पत्रात सविस्तर विश्लेषण करण्यात आले. जवळपास प्रत्येक वर्तमान पत्राने या शहराला वाटण्याच्या अक्षता, निराशा, .....घाटाचा रस्ता या शब्दात वर्णन करीत नकारात्मक दृष्टीकोन अनुसार विश्लेषण केले.
भारतात शहरे अनेक आहेत तसेच शहरांची लोकसंख्या देखील अधिक आहे त्याच प्रमाणे शहर तसेच नागरीक परत्वे अपेक्षा देखील अनेक आहेत. या जगात असा कोणता तज्ञ किंवा माईचा लाल आहे की तो या समस्त अपेक्षा पूर्ण करणारा आहे? असा कोणता पत्रकार आहे की जो या सगळ्यांचे समाधान करू शकेल असा अर्थ संकल्पीय आराखडा निर्माण करू शकेल?
आपल्या देशात जो तो स्वतःच्या सोयीचा आराखडा तसेच व्यवस्था अपेक्षित करणार असेल तर काय होणार? कालच्या वर्तमान पत्रावर नजर फिरवा म्हणजे प्रत्यय मिळेल. कालच्या समस्त प्रतिक्रिया म्हणजे अपरिपक्वतेचे लक्षण आहे. स्वतःच्या संकुचित अपेक्षांना प्राधन्य देणाऱ्या मंडळी म्हणजे बौद्धिक दिवाळखोर आहेत असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.
रेल्वेचा अर्थसंकल्प जाहीर करताना एक गाव-शहर-राज्य इतक्या पुरता मर्यादित विचार असतो की समग्र देशाचा विचार करावा लागतो? जो संकुचित विचार करतो तो फक्त स्वतःचे गाव-शहर-राज्य इतक्या पुरताच मर्यादित विचार करू शकतो कारण सरड्याची धाव कुंपणा पर्यंत किंवा कुपमंडूक प्रवृत्ती. डबक्यातील बेडकाला स्वतःचे डबके हेच विश्व भासते त्याप्रमाणे त्याचे आचरण. माणूस जर स्वतःच्या गाव-शहर-राज्य इतक्यात पातळीला विचार करणार असेल तर त्याने देश पातळीच्या संदर्भात विचार करताना दक्षता घेणे क्रमप्राप्त आहे मात्र समस्त टीकाकारांना याचे विस्मरण होते.
कोणत्याही क्षेत्रात काम करणारा माणूस हा परिपूर्ण नाही तसेच त्याची कृती परिपूर्ण नाही. प्रत्येक माणसाला मर्यादा आहेत तसेच त्याच्या कृती मध्ये त्रूटी आहेत. आपण आपल्या मर्यादा किंवा त्रूटी पाहतो का? आपण आपल्या त्रूटी दूर करण्याचा प्रयन्त करतो का? मुळात आम्ही स्वतःच्या मर्यादा असोत की त्रूटी ना पाहतो ना मान्य करतो याउलट दुसऱ्यांच्या त्रूटी तसेच मर्यादा शोधण्याचा ते लादण्याचा प्रयत्न करतो.
आज जे कोणी अपेक्षाभंग झाल्याचे सांगतात किंवा वाटण्याच्या अक्षता, नैराश्य जनक, घाटाचा रस्ता या प्रकारे वर्णन करतात ते स्वतः किती व्यक्तींच्या अपेक्षा पाहतात किंवा परिपूर्ण करतात? यांना धड स्वतःच्या अपेक्षा मागे असणारा स्वार्थ तसेच अहंकार व अज्ञान यांची जाणीव अथवा भान नाही मात्र स्वतःच्या अपेक्षांचे ओझे दुसऱ्यांच्या खांद्यावर लादण्याचा प्रयन्त करीत आहेत. मला काही अपेक्षा असतील तर त्या मी पूर्ण कराव्यात की इतरांनी पूर्ण कराव्यात यासाठी अट्टाहास करावा?
ज्या व्यक्ती स्वतःच्या अपेक्षा पाहतात किंवा जाणतात त्या स्वतः परिपूर्ण करण्याचा प्रयन्त करतात मात्र ज्यांना अपेक्षा समजत-उमजत नाही ते मात्र स्वतःच्या अपेक्षांचे ओझे दुसऱ्यांच्या खांद्यावर लादण्याचा प्रयन्त करतात. क्षणभर विचार करून पहा की देश पातळीला किती गाव-शहर-राज्य आहेत तसेच त्याठिकाणच्या नागरिकांच्या अपेक्षा किती आहेत? त्या सगळ्या परिपूर्ण होणार का?
मानवाने चांगल्यात वाईट पहावे की वाईट मध्ये चांगले पहावे? अर्थात हा ज्या त्या व्यक्तीचा प्रश्न आहे मात्र आपण जे पाहतो, जे समजतो ते आपल्या दृष्टीचे द्योतक की सृष्टीचे? आपण आपली दृष्टी बदलताच सृष्टी बदलते. आपण आपल्या दृष्टीवरील अपेक्षेचा चष्मा न पाहता अपेक्षेचे ओझे दुसऱ्यांच्या खांद्यावर लादतो पण यासंदर्भात जाणतो का? थोडा विचार करून प्रत्यय घ्या म्हणजे कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे याचा प्रयत्य मिळणार आहे. 

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते