संस्कार प्रदर्शन
कोणत्याही सामाजिक
सांकेतिक स्थळाला भेट द्या म्हणजे मानवाच्या संस्कारांचे प्रदर्शन पाहण्यास मिळणार
आहे. कोणत्याही मानवाची कोणतीही कृती असो की प्रतिक्रिया यामध्ये संस्कारांना
केंद्रीय भूमिका आहे. कृती असो की प्रतिक्रिया यामागे जे काही घडते ते मानवाच्या
स्वभावात घडते तसेच त्याचे प्रतिबिंब कृती तसेच प्रतिक्रिया मध्ये पाहण्यास मिळते.
कोणत्याही व्यक्तीची कृती असो की प्रतिक्रिया यामध्ये त्याचे आकलन व दृष्टीकोन
यांना निर्णायक भूमिका आहे.
मानवाचे आकलन असो की
दृष्टीकोन यांची जडण-घडण होण्यात संस्कारांना अनन्य साधारण महत्व आहे. किंबहुना
संस्कार म्हणजे पाया आहे. कोणत्याही इमारतीचा पाया दिसत नाही पण तो त्या इमारतीचे
भवितव्य ठरवतो. कोणत्याही भौतिक इमारतीचा पाया एकदाच भरला जातो मात्र संस्कार ही
सातत्याने घडणारी क्रिया असून त्यानुसार मानवाचे दृष्टीकोन, आकलन ते आचरण यामध्ये
परिवर्तन घडते. मानवाचा दृष्टीकोन असो की आकलन यामध्ये सातत्याने परिवर्तन घडते.
त्यामुळे मानवाचे आचरण देखील बदलत असते मात्र हा बदल मानवाला सहजगत्या दिसत-जाणवत
नाही कारण अज्ञान.
मानव अज्ञानी आहे यामुळेच
आचरण करताना दक्षता बाळगत नाही परिणाम स्वरूप स्वतःचे संस्कार तसेच संस्कृती यांचे
कळत-नकळत प्रदर्शन मांडतो पण त्याला स्वतःला समजत नाही. सध्या समाजात दुसऱ्यांना
आदर देणारा संस्कार कालबाह्य होताना दिसतो-जाणवतो. कोणीही-कोणाचाही अपमान करतो,
लायकी काढतो, आरोप-प्रत्यारोप करतो असे प्रकार सरार्स घडतात कारण संस्कार. आपण
आपल्या घरात डोकावण्याचा प्रयन्त करून पहा. आपल्या घरात कोण-कोणाचा किती आदर करतो
याचा प्रत्यय घ्या. मुले फक्त घरातील जेष्ठ व्यक्तींचे अनुकरण करतात. घरातील जेष्ठ
ज्या प्रकारचे आचरण करतात त्याचा प्रभाव मुलांच्या स्वभावावर होणे स्वाभाविक आहे.
समाजात जे काही घडते
ते वास्तवात प्रथम घरात घडते नंतर समाजात घडते. मानवाची खरी जडण-घडण त्याच्या घरात
घडते. थोडक्यात मानवाच्या व्यक्तीमत्वाचा पाया त्याच्या घरात भरला जातो नंतर
सामाजिक जीवनात इमारत उभी राहते. मानवाच्या दृष्टीकोनाची मुलभूत जडण-घडण त्याच्या
घरात घडते नंतर सामाजिक जीवनात वावरताना त्यामध्ये काही प्रमाणात परिवर्तन घडते
मात्र या परिवर्तनाची दिशा मुलभूत जडण-घडण अनुसार-सापेक्ष-परत्वे असते.
कोणत्याही सामाजिक
सांकेतिक स्थळाला भेट द्या किंवा सामाजिक जीवनात वावरताना पहा काही व्यक्ती
दुसऱ्या व्यक्तींना नालायक ठरवतात, दुसऱ्यांनी काय करावे हे ठरवण्याचा प्रयन्त
करताना त्यांना स्वतःला आपण काय करतो हे समजत नाही, दुसऱ्यांचे मुल्यांकन ते
वर्गवारी करणे, स्वतःला सत्य समजणे, स्वतः ज्यांचा आदर करतो फक्त त्याच व्यक्ती या
जगात आदरास पात्र असल्याचा समज बाळगणे. थोडक्यात स्वतःची संकुचित दृष्टी व आकलन
तसेच यांच्या मर्यादा न पाहता आचरण करण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढत आहे कारण
परपरीक्षण करण्याचा संस्कार घडला तसेच घडत आहे.
कोणताही माणूस जी
काही कृती करतो त्यामागे त्याचा संस्कार आहे मात्र यासंदर्भात अनेकांना जाण व भान
असल्याचे आढळत नाही कारण आचरण करताना दक्षतेचा अभाव असल्याचे प्रकर्षाने जाणवते. सामाजिक
सांकेतिक स्थळ असो की सामाजिक जीवन यामध्ये दुसऱ्यांच्या नावाने शिमगा करण्याचे
प्रमाण वाढत आहे हे दक्षतेच्या अभावाचे लक्षण आहे तसेच संस्काराचे जाहीर व जागतिक
प्रदर्शन मांडणे आहे.
सामाजिक सांकेतिक
स्थळा वर आपण जे काही मत मांडतो किंवा प्रतिक्रिया नोंदवतो अथवा ज्या काही पोष्ट
शेअर करतो त्या आपल्या व्यक्तिमत्वाला तसेच संस्कारांना दर्शवतात यामुळे आपण दक्षता
घ्यावी हे क्रमप्राप्त आहे. मात्र काही व्यक्तींना स्वाभाविक अज्ञान असल्याने ते
दक्षता टाळतात वर स्वतःच्या कृतीला पुरुषार्थ समजतो. गंमत म्हणजे या वर्गवारीत
मोडणारा ना पुरुष ना त्याचा कृती मध्ये अर्थ फक्त संस्कार व संस्कृती यांचे
प्रदर्शन पाहण्यास मिळते.
थोडा विचार करून
आपल्या कृतीचा-प्रतिक्रियांचा अभ्यास करून पाहावा नंतर निर्णय घ्यावा.
Comments
Post a Comment