तुलना

 तुलना करणे मानवी स्वभावाचा एक अविभाज्य घटक आहे. तुलना करण्याविना मानवी आकलन तसेच अभिव्यक्ती सुलभ होत नाही. तुलना न करता मानवास आकलन करणे किंवा आत्मसात करणे कठीण जाते किंबहुना आकलन किंवा आत्मसात होत नाही असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
तुलना करण्यासाठी दोन घटकांची गरज भासते. निखळ एका घटकाचा तुलनात्मक अभ्यास करता येत नाही. वास्तवात प्रत्येक घटकाला स्वतंत्र अस्तित्व आहे. प्रत्येक घटक अद्वितीय आहे मात्र मानव स्वतःच्या सुलभतानुसार दोन घटकात तुलना करतो. सोने असो की लोखंड अथवा पोलाद यासगळ्या धातुंना स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व आहे मात्र मानव यासगळ्यात तुलना करून अभ्यासण्याचा प्रयन्त करतो.
थोडक्यात निसर्गातील प्रत्येक घटकाला स्वतःचे गुणधर्म-स्वभाव आहेत. मानव या गुणधर्मांचा अभ्यास करताना स्वतःच्या सोयीने वर्गीकरण करून अभ्यासण्याचा प्रयन्त करतो. सोन्यामध्ये जे काही गुणधर्म आहेत त्यापारत्वे लोखंडाच्या गुणधर्माचा अभ्यास करण्यात येतो किंवा लोखंडाच्या गुणधर्माच्या परत्वे सोन्याचा अभ्यास करण्यात येतो. वास्तवात सोने हे सोने आहे तसेच लोखंड हे लोखंड असून सोन्याचे गुणधर्म सोन्यातच मिळणार तसेच लोखंडाचे गुणधर्म लोखंडातच मिळणार आहेत. सोने लोखंडाचे काम करणार नाही तसेच लोखंड सोन्याचे काम करणार नाही.
सोने असो की लोखंड त्यावरती ज्याप्रकारच संस्कार करण्यात येणार त्यापरत्वे त्याच्या गुणधर्मात-स्वभावात बदल घडणार आहे. सोन्या-सोन्यात ही संस्कार परत्वे गुणधर्म-स्वभाव यामध्ये बदल घडतो. संस्कार व स्वभाव परिवर्तन तसेच भिन्नता हा निसर्ग नियम प्रत्येक घटकाला लागू पडतो. मानव स्वतः या नियमाला अपवाद नाही.
प्रत्येक मानव हा भिन्न स्वभावाचा धनी आहे तसेच त्याच्या स्वभावावर ज्या प्रकारचे संस्कार घडतात त्याप्रमाणे त्याचे गुणधर्म बदलतात. मानव प्रत्येक ठिकाणी तुलना करण्याचा प्रयत्न करतो याला मानव देखील अपवाद नाही. मानव दोन मानवात तुलना करतो पण तुलना करण्याच्या कसोटी संदर्भात कधी विचार करतो का?
दोन धातू असो की वस्तू यामध्ये तुलना करण्याचे जे काही निकष-कसोट्या आहेत त्यामध्ये एक प्रकारची निश्चितता आहे. मात्र दोन व्यक्ती मध्ये तुलनात्मक अभ्यास करण्याचे निकष-कसोट्या व्यक्ती परत्वे बदलतात. एखादा व्यक्ती चांगला की वाईट हे ठरवताना प्रथम प्रत्येकाचा चांगला तसेच वाईट या संकल्पनाची परिभाषा मुळात भिन्न आहेत. एखादा व्यक्ती चांगला किंवा वाईट ठरवण्यासाठी त्याची कृती महत्वाची की कृती पाहणारी दृष्टी महत्वाची? त्याच्या कृती मागील उद्देश महत्वाचा की निष्पत्ती महत्वाची? तसेच उद्देश पाहणारी दृष्टी असो की निष्पत्ती पाहणारे-ठरवणारे आकलन महत्वाचे?
गंमत म्हणजे एखादा व्यक्ती चांगला अथवा वाईट नसतो तर तो आपल्या-पाहणाऱ्या दृष्टी-आकलन परत्वे जो काही तुलनात्मक अभ्यास करण्यात येतो त्याचा एक निष्कर्ष असतो. पाहणाऱ्याच्या आकलन परत्वे जे काही चांगले त्यानुसार समोरच्या व्यक्तीचा तुलनात्मक अभ्यास करून घेण्यात आलेला एक निष्कर्ष असतो. कोणत्याही व्यक्तीचा कोणताही निष्कर्ष असो की तुलनात्मक अभ्यास असो तो कधीही परिपूर्ण किंवा समग्र नसतो तसेच तुलनात्मक अभ्यास करणाऱ्या व्यक्तीच्या संस्कार तसेच आकलनाचे द्योतक असतो.
सध्या समाजात तुलनात्मक अभ्यास करण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढत आहे तसेच स्वतःचा निकष असो की निष्कर्ष अथवा तुलनात्मक अभ्यासा अंती निर्माण होणारे मत असो त्याला अंतीम सत्य समजण्यात येते तसेच ते दुसऱ्यांच्या गळी उतरवण्याचा ते माथी मारण्याचा प्रकार सरार्स घडतो. मात्र आपण जी काही तुलना अथवा परपरीक्षण करतो त्यामागे आपले अर्धवट दृष्टीकोन ते आकलन आहेत याबद्दल भान राखतो का?
निसर्गातील प्रत्येक घटकाला स्वतंत्र अस्तित्व असून प्रत्येक घटक अद्वितीय आहे यामध्ये जी काही तुलना करण्यात येते त्यामागे स्वभाव सापेक्षता आहे. प्रत्येक स्वभावाला मर्यादा आहेत. दुसऱ्यांचा स्वभाव कसा आहे किंवा नाही याचा मागोवा घेण्यापेक्षा स्वतःच्या स्वभावाचा मागोवा घेतला तर आपले जीवन सुलभ तसेच सुखकर होणार आहे. अर्थात त्यासाठी सुलभता असो की सुख यांचा तुलनात्मक अभ्यास करताना सावधानता असावी. प्रयोग करून पहा म्हणजे प्रयत्य मिळणार आहे.

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते