जर राजे पन्हा अवतरले तर...


जर राजे पुन्हा महाराष्ट्रात अवतरले तर काय होणार? अर्थात ते पुन्हा अवतार घेणार नाहीत आणि समजा जन्म घेतला तर सर्वात प्रथम त्यांना स्वतः राजे असल्याचा पुरावा द्यावा लागेल. अर्थात तो सगळ्यांना मान्य होणार असाच पुरावा असावा विशेषतः ‘मी’ ‘मला’ ‘माझ्या’ यांना पटणारा पुरावा असावा. तरच ते राजे, छत्रपती अन्यथा भामटा.
सर्व पुरावे मान्य झाले तर राजे नंतर राज्यपद. ते देताना माझ्या गटाला-ताटाला प्राधान्य असेल तर अन्यथा विरोध. थोडक्यात त्यांच्या मंत्रिमंडळात मला स्थान पाहिजे. तसेच आरक्षण सुद्धा पाहिजे नाहीतर उग्र व हिंसक आंदोलन. यानंतर छत्रपतींनी स्व जातीला प्राधान्य देत इतर जाती-धर्माचा द्वेष करीत इतरांना शिक्षा करावी ही आग्रहाची मागणी( धमकी). यानंतर राजेंच्या स्मारकाचा प्रमुख मुद्दा मार्गी लावणे. स्मारका साठी अवाढव्य खर्च झाला पाहिजे तसेच त्यामधील ठेके प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरुपात मलाच पाहिजेत. अर्थात ही एक प्रकारची कल्पना-शक्यता आहे. दुसरी शक्यता देखील आहे.
छत्रपतींची आदर्श राजेशाही प्रस्थापित होण्याची देखील एक शक्यता आहे. समजा ती प्रस्थापित झाली तर राजांच्या नावाखाली जोगवा मागणारे, जातीयवाद-धर्मवाद यांची निर्मिती करून खतपाणी घालणारे असोत की दहशत निर्माण करणारे असोत त्याचा कडेलोट केला जाणार, हात-जीभ कलम करण्यात येणार तर किती जनता शिल्लक राहणार? अर्थात न्याय निवडा करताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही, किंवा माझा तो बाब्या आणि दुसऱ्यांचे ते कार्टे असा निवडा होणार नाही.
नवीन स्मारक निर्मिती करण्यापेक्षा जे काही किल्ले भग्नावस्थेत आहेत त्यांची डागडुजी करण्यास प्राधान्य मिळेल प्रसंगी जी जनता उपाशी राहते-कुपोषित आहे, ज्यांना अन्न-वस्त्र-निवारा या सारख्या मुलभूत गरजा भागवता येत नाहीत त्यासाठी पैशाचा विनियोग करण्यास प्राधान्य दिला जाण्याची शक्यता अधिक आहे कारण राजांनी कधी इतिहास कुरवाळला नाही किंवा वर्तमानकाळापेक्षा भूतकाळाला अधिक प्राधान्य दिले नाही. जनता उपाशी आणि राजांनी स्मारक बांधले असे घडल्याचे ऐकण्यात किंवा वाचनात नाही. याउलट स्वतः उपाशी राहून जनतेचे रक्षण असो की सुव्यवस्था यांना प्राधान्य दिले.
वर्तमान राजे समर्थक वर्तमान काळात काय करतात? राजांना धर्मवादी ठरवतात, राजांच्या नावाचा जयघोष करतात पण राजांचा आदर्श घेत नाहीत किंवा साजेशी कृती करीत नाही. राजांनी गनिमी कावा वापरला तो पारतंत्राचा काळ होता तसेच स्वराज्य निर्मिती व संरक्षण यासाठी ती एक रणनीती होती. सध्या समर्थक स्वतंत्र देशात स्वकीय विरोधात समूहाचा गनिमी कावा करतात कारण स्वार्थ व अहंकार.
जर छत्रपती अवतरले तर स्वार्थी समर्थकांना पुरस्कार देतील तो कोणता? शाल-श्रीफळ देणारा की कडेलोट वा कलम करणारा असेल? नुसता जयघोष करून किंवा स्मारक बांधून काय होणार? निखळ वल्गना तसेच बंदिस्तता.
महाराष्ट्राचा तीन शतकांचा इतिहास चाळून पुन्हा किती छत्रपती घडले-झाले याचा कधी विचार केला का? कमीत कमी आम्हाला प्रेरणा घेण्यासाठी छत्रपती आहेत तसेच मार्गदर्शन करण्यासाठी खरा-खोटा तसेच शक्यता आधारित इतिहास तरी आहे पण छत्रपती समोर कोणाचा आदर्श तसेच कोणता इतिहास होता? रामायण-महाभारत तर आम्हाला देखील माहित आहे तसेच छत्रपतींचा आदर्श व इतिहास देखील आम्हाला माहित आहे पण त्यांचा आदर्श घेत कृती करणे आम्हाला जमते का?
आम्हाला फक्त इतिहासाचे तुणतुणे वाजवता येते पण वास्तविक अर्थबोध घेता येतो का? कमीत कमी तो अर्थबोध देण्यासाठी का होईना राजे तुम्ही पन्हा यावे. आणि आला तर .......   

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते