आगीत तेल ओतणार की पाणी?


आगीत तेल ओतणार की पाणी? या प्रश्नाचे उत्तर कोणतेही शेंबडे पोर देऊ शकते हे मला माहित असताना हा प्रश्न पडतो कारण स्वतःला सुशिक्षित, सभ्य, समंजस, नैतिक समजणाऱ्या व्यक्तींचे सामजिक आचरण. वर्तमान समाजातील व्यक्तींचे आचरण पहा विशेषतः सामाजिक समस्या वर ज्याठिकाणी चर्चा घडते त्याठिकाणी माणूस सूड, द्वेष, बदला, जश्याला तसे असे म्हणत जे काही बोलतो-करतो ते आगीत पाणी ओतणारे की तेल ओतणारे?
भाषावाद असो की प्रांत वाद अथवा दोन व्यक्तींच्या दरम्यान असणारा परस्परातील वाद-कलह-तंटा असो याठिकाणी माणूस कोणत्या प्रकारची भूमिका मांडतो किंवा कृती करतो, ती आगीत पाणी ओतणारी असते की तेल ओतणारी असते? जो माणूस स्वतःचा समज हेच अंतिम सत्य मानतो तो पाणी ओतणार की तेल ओतणार? ज्या माणसाला स्वतःच्या समज मधील गैरसमज समजत नाही तो काय करणार?
भारत-पाक या दोन देशातील संमंध कोणत्या प्रकारचे आहेत हे मी सांगण्याची गरज नाही तसेच यासंदर्भात किती व्यक्ती कोणत्या प्रकारची मुक्ताफळे उधळतात हे देखील सांगण्याची गरज नाही. यासंदर्भात किती व्यक्ती पाणी ओतण्याचा प्रयन्त करतात तसेच तेल ओतण्याचे प्रयन्त करतात? दुर्दैवाने तेल ओतणाऱ्या व्यक्तींची संख्या लक्षणीय प्रमाणात आहे.
दहशतवाद ही जगाला भेडसावणारी समस्या आहे. जगभरात ही समस्या सोडवण्याचा प्रयन्त सुरु आहे तो देखील दहशतीच्या मार्गानेच व शास्त्र-अस्त्र यांचा वापर करून. गंमत म्हणजे दहशतवादी असो की विरोधक दोघांची कृती तसेच प्रवृत्ती एकच आहे, फक्त भिन्न-भिन्न नावाचा मुखवटा धारण करण्यात येतो. दोघे संरक्षण करण्याचा दावा करतात तसेच मी साजूक व तो नालायक असा तर्क-युक्तिवाद करण्यात येतो.
दहशतवाद संदर्भात मी एक दहशतवादी (मुखवट्यामागील चेहरा) या लवकरच प्रकाशित होणाऱ्या ईबुक मध्ये सविस्तर मांडले आहे. थोडक्यात दहशत वादाचा जो वणवा भडकला त्यामध्ये वर्तमान मानव पाणी टाकणारी कृती करतो की तेल ओतणारी कृती करतो?
थोडक्यात माणूस आरे ला कारे करतो, शिविला शिवीने उत्तर देतो, अपमान केला त्याचा अपमान करण्याचा प्रयन्त करतो तसेच याला जशाला तसे किंवा क्रियेला प्रतिक्रिया हा निसर्ग नियम असल्याचा दाखला देण्यात येतो. वास्तवात इथे आगीत तेल ओतण्याचा प्रकार करण्यात येतो यामुळे समस्या सुटत नाही तर गहन-गंभीर-उग्र स्वरूप धारण करते. आगीत तेल ओतले तर ती विझणार की भडकणार? हे शेंबड्या पोराला कळते पण वय व अनुभवाने मोठे असणाऱ्यांना समजत नाही का?  
काही राजकीय व्यक्ती समाजात तेढ निर्माण करण्यासाठी भाषावाद, प्रांतवाद, जातीयवाद सारखे वणवे पेटवतात व स्वतःची पोळी भाजून घेतात याबद्दल माणसाला समजत नाही का? वास्तवात समजते-कळते सगळ्यांना पण वळत नाही कारण अज्ञान-अहंकार. अज्ञानी व अहंकारी माणूस आवेश व आवेग याने झिंगून जातो. झिंगलेल्या माणसाला स्वतःच्या कृतीचे भान राहत नाही यामुळे वर्तमान मानव इतिहासाचे तुणतुणे वाजवत कधी काळी गाडलेले अथवा काल्पनिकरित्या गाडलेले मुडदे व मुद्दे यांना प्राधान्य देताना वर्तमान तसेच वास्तव यांना दुर्लक्षित करतो.
मानवाचा अहंकार त्याला वास्तव तसेच भान व जाण यापासून वंचित ठेवतो. अहंकारी माणूस प्रत्येक ठिकाणी अहंकार जोडत अस्तित्वाचा प्रश्न समजतो ते निर्माण करतो यामुळे सरळ भक्षण करतो. अहंकारी माणूस वास्तव पाहण्याच्या फंदात पडत नाही यामुळे अहंकाराच्या कृतीला अहंकाराने उत्त्तर देण्याचा प्रयन्त करतो प्रसंगी विवेकी कृतीला देखील अहंकाराची कृती मानतो यातून वणवा पेटवणे ते भाकावणारे तेल ओतणे असा प्रकार सरार्स करण्यात येतो.
अहंकार व विवेक परस्पर भिन्न दिशेने प्रवास करतात. अहंकार आग असेल तर विवेक पाणी आहे. अहंकार पेटवतो तेच विवेक विझवतो. अहंकार परपरीक्षण करतो तेच विवेक आत्मपरीक्षण करतो. अहंकार दुसऱ्यांच्या कृतीला प्राधान्य देतो त्यावेळी कृती पाहणारी स्वतःची दृष्टी तसेच अन्वयार्थ घेणारे स्वतःचे आकलन यांना दुर्लक्षित करीत दुष्टी हीच सृष्टी मानत वाटचाल करतो, तेच विवेकी माणूस दुसऱ्यांच्या कृती पेक्षा त्याला पाहणाऱ्या दृष्टी व अन्वयार्थ घेणाऱ्या स्वतःच्या आकलनाला पाहण्याचा प्रयन्त करताना स्वतःच्या दृष्टी व आकलन मर्यादा तसेच त्रूटी यांचा मागोवा घेण्याचा प्रयन्त करतो.
विवेक असणारा मानव नेहमी वणव्यात पाणी ओतण्याचे काम करतात तेच अहंकारी तेल ओतण्याचे काम करतात. जग काय करते यापेक्षा आपण स्वतः काय करतो याबद्दल विचार करून पहा तसेच परीक्षण करून खातरजमा करून घ्यावी ही विनंती.  

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते