मुखपृष्ठ वर्णन आणि पुस्तक प्रत्यय.
काही दिवसापूर्वी मी
माझ्या स्वभाव सापेक्षता या पुस्तकामागील कथा, त्याचे मुखपृष्ठ संदर्भात फेसबुक
तसेच ब्लॉग वर लिहिले. काही मित्रांना या संदर्भात काही शंका होत्या त्यापैकी काही
जणांनी फोनवर विचारणा केली मात्र प्रत्येक जवळ फोन नंबर नाही. तसेच ज्यांनी मुख
पृष्ठ संदर्भात विचार केला किंवा समज निर्माण करून घेतला त्यांना समज मधील गैरसमज
तसेच पुस्तकातील साहित्याचा प्रत्यय द्यावा या दुहेरी उद्देशाने ब्लॉग प्रपंच.
समस्त मुखपृष्ठ हे
ब्रम्हांड वर आहे. मुखपृष्ठाची पार्श्वभूमी ही ब्रम्हांड आहे. ब्रम्हांडा मधील एक
आकाशगंगा, एक सौर मालिका, एक माणूस तसेच त्याचे सापेक्ष विश्व आहे. सामान्यतः
आम्ही स्वतःच्या सापेक्ष इतरांचा विचार करतो. थोडे ब्रम्हांड सापेक्ष विचार करून
पाहावा. ब्रम्हांडातील आकाश गंगा म्हणजे एक मोठा ठिपका आहे. तेच सौर मलिक एक लहान
ठिपका तर पृथ्वी त्यामधील एक लहान ठिपका आहे. तेच पृथ्वीवरील माणूस म्हणजे काय? तर
सूक्ष्म जंतू-अणु-रेणू. समस्त ब्रम्हांडात मानवाचे अस्तित्व किड्या मुंगी पेक्षा
लहान आहे.
आकाशगंगेत ग्रह-तारे
अस्थिर व भ्रमण अवस्थेत असतात. सौर मालिकेतील ग्रह सूर्याभोवती फिरतात. सूर्य
देखील महासुर्या भोवती फिरतो यासंदर्भात संशोधन सुरु आहे. आता मानवी स्वभाव पहा तो
स्वतःच्या अनुसार-स्वतःला केंद्र मानत इतरांचे परीक्षण-समीक्षण करतो. मानवाचा
स्वभाव स्थिर आहे का? साधे सोपे उदाहरण पाहू. एखादा माणूस चांगला की वाईट याचे आपण
स्वतःच्या चांगल्यावरून परीक्षण करतो पण आपला चांगला तरी स्थिर आहे का?
मानवाच्या आचरणात
असो की आकलनात दृष्टीची भूमिका निर्णायक आहे. दृष्टी बदलताच आचरण व आकलन बदलते.
त्यामधून प्रतिमा-संकल्पना बदलतात. थोडक्यात मानवाचे समस्त विश्व बदलते. अर्थात हे
विश्व त्याचा दृष्टी मागे आहे. निसर्गात जे काही घडते त्यामागे प्रक्रिया असते
त्याचा मागोवा घेण्याचा मी माझ्या दृष्टीने एक अल्प प्रयन्त केला आहे.
मुखपृष्ठ वरील
शीर्षक मधील ‘स्व’भाव संपूर्णतः लाल आहे कारण धोका. कोणत्याही मानवाला खरा धोका हा
स्व तसेच स्व प्रती असणारा भाव यापासून आहे. स्व हा स्वार्थ तसेच संकुचितपणा यांचे
द्योतक आहे. याच शीर्षकातील सापेक्षता ही बाहेरून लाल तसेच अंतरंगातून पांढरी आहे.
सापेक्षता हा विज्ञानाचा शब्द आहे. विज्ञान मधील वी हा विश्व द्योतक आहे म्हणजे
इतर-दुसरा परपरीक्षण द्योतक आहे तेच ज्ञान हे विवेक-भान-जाण द्योतक आहेत. ज्ञानी
मर्यादेत राहतो तेच विज्ञानाचा माहितगार मर्यादा उल्लंघन करतो. विश्व हा किनारा
आहे तेच ज्ञान केंद्र आहे. यामुळे सापेक्षता केंद्रावर सफेद आहे.
अध्यामातील समस्त
ज्ञानी म्हणा अथवा आत्मज्ञानी म्हणा किंवा ज्यांना स्वतः संदर्भात मर्यादांचे भान
आहे त्यांनी मर्यादेत राहता शांती मिळते असा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरुपात
सांगितले. पांढरा रंग शांती तसेच धर्म द्योतक आहे. जैन धर्मात पांढऱ्या रंगला
महत्व आहे, धर्म प्रतिक आहे. वास्तवात शांती असो की धर्म तो स्वतःच्या अंतरंगात
आहे. मात्र त्यासाठी स्वतःच्या स्वभावात प्रवेश करावा लागतो.
दृष्टी मागील सृष्टी
हे निळ्या रंगात आहे. निळारंग बौद्ध धर्म प्रतिक आहे. जैन व बौद्ध धर्म प्रत्यक्ष
शब्दात अहिंसा सांगतात तसेच दोन्ही धर्म श्रमण परंपरेतील आहेत. इथे माणूस स्वतःचा
कर्ता-करीवता आहे. मानवाच्या जीवनात जे काही घडते त्याला तो स्वतः जबाबदार आहे.
यादोन्ही धर्मात भक्ती नाही तर शक्तीचा कस लागतो, धैर्य असल्याविना या धर्मात
प्रवेश नाही.
या पुस्तकाचे वाचन
करताना देखील धैर्य तसेच धीर धरण्याच्या कसोटीला उतरावे लागते. प्रत्येक ओळ
आत्मसात केल्याविना आकलन करता येणार नाही. या पुस्तकाचे वाचन करतना स्वतःमधील
विद्यार्थी जागरूक ठेवणे गरजेचे आहे तसेच स्वतःचे परीक्षण करताच प्रत्यय देखील
मिळणार आहे. जो विद्यार्थी हे साहित्य आत्मसात करणार त्याच्या व्यक्तिमत्वा मध्ये
अमुलाग्र ते क्रांतिकारक परिवर्तन घडणार आहे.
आपण जे मुखपृष्ठ
पहिले त्यावर जर विचार केला असेल तर तो विचार ते माझी भूमिका यांचा अभ्यास करून
पहा म्हणजे स्वभाव सापेक्षतेचा प्रत्यय मिळणार आहे.
सदर पुस्तक ईबुक स्वरुपात
www.bookganga.com वर दी.५/४/२०१२
रोजी संध्याकाळी ४.०० वाजता प्रकाशन नंतर उपलब्ध होणार आहे. सदर प्रकाशन कार्यक्रम
निरा ता.पुरंधर जी.पुणे येथे आयोजित करण्यात आलेले आहे. निरा ग्राम सचिवालयात सदर
कार्यक्रम होणार असून आपणा सर्वांना विनंती पूर्वक आमंत्रित करीत आहे.
Comments
Post a Comment