धमक असेल तो धमकावणार काय?
सध्या समाजात
एकमेकांना धमकावण्याचा प्रकार लक्षणीयरीत्या वाढत आहे. अगदी किरकोळ कारणावरून
कलह-विवाद झाला तरी सरळ धमकी देण्याचा प्रकार सहजगत्या घडतो. समाजात जवळपास
प्रत्येक व्यक्ती व्यक्तिगत पद्धतीने स्वतःची दहशत-जरब निर्माण करणारी कृती
कळत-नकळत ते प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष स्वरुपात करतो कारण स्वतः भयग्रस्त असतो.
जो व्यक्ती स्वतः
दहशतग्रस्त-भयग्रस्त असतो तोच व्यक्ती शूर-वीर असल्याचा आभास निर्माण करतो कारण जो
स्वतः निर्भय असतो त्याला आभास निर्माण करण्याची गरज नसते तर तो सरळ-सरळ कृती करून
मोकळा होते. थोडक्यात जो करणारा असतो तो वल्गना करण्याच्या फंदात पडत नाही किंवा
मुहूर्ताची वाट बघत नाही.
धमकावणे-दहशत
निर्माण करणे ही एक प्रतिक्रिया आहे. भयग्रस्त माणूस धमकी देत स्वतःचे रक्षण
करण्याचा प्रयन्त करतो. धमकी देणारा माणूस उठसुठ कोणालाही धमकी देत नाही तर
ज्याठिकाणी प्रतिकार होणार नाही याबद्दल खात्री असते त्याच ठिकाणी धमकावणे-दांडगाई
करणे यासारखा प्रकार करण्यात येतो. जेणे करून एकतर प्रतिकार व आक्रमण होणार नाही
यासाठी धमकावण्याच्या मार्गाचा अवलंब करण्यात येतो. मात्र ज्याठिकाणी प्रतिकार
होते त्याठिकाणी मग मुग गिळून गप्प बसणे किंवा गल्लीतील चतुष्पाद प्राण्या प्रमाणे
पळवाट शोधण्याचा प्रकार घडतो.
आपल्या देशातील एका
राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे प्रसिद्ध आक्रमक व्यक्ती या वर्गात मोडते या नेत्याला
अत्यंत आक्रमक व जहाल भाषेत भाषण करण्याची सवय जगप्रसिद्ध आहे. या नेत्याचा याच
नेत्यासारख्या पत्रकार महाशयाने चालत्या हेलिकॉप्टर मध्ये मुलाखत घेतली त्यावेळी
मात्र नेत्याची आक्रमकता गायब झाली. हिंदी मध्ये म्हणतात त्याप्रमाणे गधे के सर से
सिंग गायब याप्रमाणे आक्रमकता-आवेश-जोश यांच्या जागी घश्याला कोरड पडणे ते हाताला
कंप सुटणे असा प्रकार सुरु झाला. पत्रकाराने फक्त काही प्रश्नांची विचारणा केली
होती. पत्रकाराजवळ बंदूक नव्हती परंतु प्रश्नांची सरबत्ती होती.
मुख्यमंत्री
महोदयांनी मुलाखत अर्ध्यावर संपवली तसेच पत्रकारला सांगितले की ही तुझी शेवटची
मुलाखत आहे. जर मुख्यमंत्री महोदय वास्तवात शूरवीर असते तर सरळ प्रश्नांना सामोरे
जाण्याचे धाडस दाखवले असते मात्र पत्रकाराने अश्या प्रश्नांची विचारणा केली की
धरले तर चावणार आणि सोडले तर पाळणार. मुखमंत्री महोदयांनी ज्या काही चुका केल्या
त्या उघडकीला येण्याची शक्यता दिसताच भयाने ग्रासले. याठिकाणी प्रतिकार होणार ही
शक्यता उघड होती किंबहुना पत्रकार आक्रमक होता त्यामुळे पितळ उघडे पडले.
सामान्यतः
धमकावणारा-दहशत निर्माण करणारा म्हणजे शूर-आक्रमक समजण्यात येतो वास्तवात तो स्वतः
भयग्रस्त असतो यामुळेच याव करीन, त्याव करीन असा आभास निर्माण करतो. याठिकाणी एकतर
अप्रासंगिक आक्रमकता असते किंवा मला ओळखत नाहीस मी अमुक- तमुकाचा जवळचा आहे, थांब
जरा फोन करतो म्हणजे कळेल अश्या पोकळ डिंग मारतो त्याच्या सारखा भयग्रस्त कोणीही
नाही. यांच्या नजरेला नजर भिडवा लगेच वास्तवाचा प्रत्यय मिळणार आहे. थोडा अनुभव
घ्या म्हणजे प्रत्यय मिळणार आहे.
Comments
Post a Comment