किंमत
वर्तमान मानवाच्या
जीवनाचा त्याने स्वतःचा बाजार मांडला आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीची किंमत करणे
हा त्याचा स्वभाव-धर्म झाला आहे. माणूस कोणत्या गोष्टीची-घटकाची कधी-कोणती व कशी
किंमत करणार याच काही नियम अथवा भरवसा नाही. मात्र गरज व उपलब्धता यांचा कोणत्याही
किमतीवर व्यापक प्रभाव आहे.
माणसाला जे सहज
उपलब्ध होते त्याची किंमत कमी किंवा किंमत केली जात नाही मात्र जे मिळण्यास
कठीण-दुर्मिळ अथवा जे मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो त्याची किंमत अधिक करण्यात
येते. यातील गंमत म्हणजे जो घटक मिळण्यास कठीण तो घटक मिळे पर्यंत त्याची किंमत
मात्र ज्याक्षणी मिळतो त्याक्षणी अवमूल्यन सुरु होते.
ज्या मानवाला
आई-वडील, बहिण-भाऊ, पती-पत्नी, मुलगा-मुलगी, मित्र-मैत्रीण, प्रियकर-प्रेयसी,
नातेवाईक ते गणगोत असतात. मानव स्वभावानुसार या सगळ्यांची किंमत करतो. तसेच गरज व
उपलब्धता यानुसार यांना प्राधान्य देणे, किंमत करणे असा प्रकार सर्रास करतो.
अर्थात मानव असा प्रकार करताना जी योग्य किंमत वाटते तीच किंमत करतो यामध्ये शंका
नाही पण योग्य वाटणे ते असणे यामध्ये जमीन-अस्मान इतके अंतर आहे.
दिसणे-समजणे-भासणे
ते वास्तवात असणे यामध्ये खूप अंतर आहे. दिसणे-समजणे-भासणे यामध्ये आपली
स्वाभाविकता म्हणजे दृष्टीकोन, आकलन, संकल्पना ते प्रतिमा सोबत
मुल्यांकन-भाव-किंमत यांचा व्यापक प्रभाव आहे तसेच या सगळ्यांना मर्यादा आहेत
मात्र कोणत्याही घटकाच्या असण्याला त्याचा स्वतःचा स्वभाव-अस्तित्व आहे. असण्याची
व्यापकता पाहणारी दुष्टी व आत्मसात करणारे आकलन (स्वभाव) परत्वे बदलते.
थोडक्यात मानवाला
प्रत्येक घटकाची किंमत कळते पण वास्तविक किंमत असतेच असे नाही. मानवाला कोणत्याही
घटकाची वास्तविक किंमत कधी कळते? ज्या घटकाची गरज असते पण उपलब्धता नसते त्यावेळी
खरी किंमत कळते-जाणवते. मानव प्रसंगी स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा स्व अर्थासाठी
या घटकांना दूर करतो कारण या घटकांची किंमत एक प्रकारची अडचण-अडथळा-निरुपयोगी-गरज
नाही या प्रकारात मोडणारी असते. माणूस हा संकुचित दृष्टीचा धनी असल्याने कायम
संकुचित विचार करून कृती करताना फक्त परिणाम ते फायदा यांचा विचार करतो मात्र
त्याक्षणी दुष्परिणाम ते तोटा यांना दुर्लक्षित करतो तिथे दुरगामी परिणाम ते
दूरदृष्टीचा विचार करणार कधी?
वास्तवात जगातील
कोणत्याही घटकाची किंमत ही त्याच्या कडे पाहणाऱ्या दृष्टीत असते. जेव्हा आपण
एखाद्या गोष्टीची किंमत करतो त्यावरून आपले व्यक्तिमत्व व संस्कार तसेच संस्कृती
यांचे प्रतिबिंब पाहण्यास मिळते. थोडी दृष्टी बदल करून पहावे म्हणजे जगातील
प्रत्येक गोष्ट मूल्यहीन ते अमुल्य भासणार आहे. मुळात जगातील कोणत्याही गोष्ठीची
किंमत करण्याची पात्रता मानवा मध्ये आहे का?
वास्तवात जगातील
प्रत्येक गोष्ट ही अमुल्य आहे म्हणजे ज्याची किंमत करता येणार नाही. मात्र मानव
अर्धवट पाहतो तसेच अर्धवट समजतो याच समज गैरसमजचा एक भाग म्हणजे किंमत करणे. माणूस
स्वतःची किंमत करतो यामुळे जगाची किंमत करतो मात्र इथे देखील भेदभाव करताना मी असो
की माझे अथवा आपले तेच अमुल्य-अनमोल मात्र दुसऱ्याचे ते कवडीमोल, मूल्यहीन, तुच्छ.
यालाच आध्यामिक शब्दात अहंकार असे संबोधन आहे. अहंकाराचे अज्ञान असेल तोच व्यक्ती
दुसऱ्यांची किंमत करणार तसेच वेळ प्रसंगी पश्चाताप देखील करणार. आपण काय करतो?
याचा विचार करून खात्री करावी हे उत्तम त्याविना वास्तवाचा प्रत्यय मिळणार नाही.
Comments
Post a Comment