निघाले पंडित अक्कल सांडीत.
मध्यंतरी मी
अणुउर्जा संदर्भातील चर्चा सत्र ऐकत होते. पर्यावरण तज्ञांनी जलविद्युत तसेच औश्निक
विद्युत निर्मिती साठी लागणारा पाणीपुरवठा व कोळसा यांचा भविष्यात निर्माण होणारा
तुटवडा तसेच होणारी पर्यावरण हानी याचे सहज सुंदर स्पष्टीकरण दिले. कोणत्याही
सामान्य व्यक्तीने ते ऐकताच लक्षात येण्यासारख्या भाषेत मांडले.
अणुउर्जा नाकारणारे
एक महाशय या चर्चासत्रात होते त्यांचा अनुउर्जेला विरोध असण्यामागे आर्थिक कारण
आहे. यासंदर्भात त्यांनी स्पष्टीकरण देताना जलविद्युत तसेच औश्निक विद्युत
निर्मितीसाठी येणारा खर्च अल्प असल्याचे कारण सांगितले. याठिकाणी अर्थकारणाचा
विचार करताना भविष्यातील तुटवडा असो की धरण निर्मिती व पुनर्वसन संदर्भातील काही
विचार होता की नव्हता ते समजले नाही तसेच निर्माण होणाऱ्या पर्यावरण समस्या
संदर्भात काय? याबद्दल चकार शब्दाने बोलले नाहीत.
कोणत्याही वृत्त
वाहिनीवरील कोणत्याही प्रकारचे चर्चासत्र पहा यासारखे चित्र पाहण्यास मिळणार आहे.
समाजातील कोणत्याही ठिकाणी होणारी चर्चा पहा त्याठिकाणी असाच काहीसा प्रकार
पाहण्यास मिळेल. जो तो आपला विचार रेटण्याचा तसेच लादण्याचा प्रयन्त करताना आढळणार.
मात्र आपण आपला विचार सर्वांगीण आहे की नाही याची खातरजमा करतो का? दुर्दैवाने
अनेक व्यक्तींना याचे नकारार्थी उत्तर द्यावे लागणार आहे कारण एकांगीपणा संदर्भात
अज्ञान.
माणूस एकांगी पाहतो
त्यामधून एकांगी समज निर्माण करून घेत आकलन करून घेतो मात्र या एकांगीपणाला समग्र-सर्वांगीण
समजतो यामुळेच माणूस समर्थन तसेच विरोध करतो, स्वतःचा समज हेच सत्य मानतो. मुळात
मानवाला स्वतःचे अज्ञान तसेच मर्यादा यासंदर्भात माहिती नाहीत तर ज्ञान कधी होणार?
जो मानव स्वतःचे अज्ञान जाणतो तो ना समर्थन करतो ना विरोध करतो फक्त स्वतःचे मत
मांडतो तसेच दुसऱ्यांचे मत ऐकतो, समजावून घेण्याचा प्रयन्त करतो. याउलट अज्ञानी
माणूस एकतर समर्थन-विरोध करतो तसेच दुसऱ्यांचे ऐकण्याच्या फंदात न पडता दुसऱ्यांना
सांगण्यास अधीर-उतावळा असतो सोबत समजावून न घेता इतरांना समजावण्यात यांना अधिक
स्वारस्य असते.
थोडक्यात जो माणूस
स्वतःला हुशार-ज्ञानी समजतो तोच इतरांना शिकवण्याचा प्रयन्त करताना इतरांच्या
मताचे खंडन-मुंडण करतो ते देखील स्वतःच्या अर्धवट माहितीच्या आधारे. कोणत्याही
व्यक्तीने स्वतःचे मत जरूर मांडावे पण दुसऱ्यांचे खंडन-मुंडण करताना प्रथम
स्वतःच्या मर्यादा जरूर पाहाव्या अन्यथा पांडित्य दर्शवण्याचा नादात हकनाहक अक्कल
सांडते तसेच ते सगळ्यांना समजते. तसेच कळत नकळत हात दाखवून अवलक्षण करून घेण्याचा
प्रकार घडतो.
थोडा विचार करून पहा
आपण अनेकदा असा प्रकार केलेला आहे कारण अज्ञान. मानव हा उपजत अज्ञानी आहे. जो
पर्यंत मानवाला स्वतःच्या अज्ञानाची जाणीव होत नाही तो पर्यंत मानव ज्ञानाचा
मागोवा घेत नाही. जोपर्यंत ज्ञानाचा मागोवा नाही तोपर्यंत एकांगीपणा राहतो.
एकांगीपणा जोपर्यंत असतो तोपर्यंत ज्ञान मिळत नाही मात्र वर्तमान समाजातील मानव
काही पुस्तके वाचतो, परीक्षा देतो, दूरचित्रवाणी-संगणक-वर्तमानपत्र वाचतो थोडक्यात
मिळेल त्या माध्यमातून माहिती गोळा करतो त्याला ज्ञान समजतो तसेच ही माहिती
समग्र-अंतिम सत्य मानतो यामुळे अक्कल सांडली जाते.
याजागातील कोणतीही
माहिती, कोणतेही पुस्तक, कोणताही व्यक्ती कधीही समग्र सत्य नसतो. मानवाचा प्रत्येक
समज हा निखळ गैरसमज आहे, मानवाचे आकलन अपरीपूर्ण आहे तसेच मानवाची अभिव्यक्ती
देखील एकांगी व अपरीपूर्ण आहे. यासंदर्भात प्रत्यय घ्यायचा असेल तर आपण ज्या मताचे
समर्थन करतो त्याच मताचा विरोध करून पहा. आपण ज्या पद्धतीने विचार करतो त्याच्या
उलट पद्धतीने विचार करून पहा म्हणजे एकांगी व सर्वांगीण यातील तफावत लक्षात येणार
आहे तसेच याची जाणीव होत ज्ञानाच्या दिशेने वाटचाल होणार आहे. यापुढे सगळ्यात
महत्वाचे म्हणजे आपली अक्कल सांडणार नाही तसेच दुसऱ्यांची अक्कल असो की लायकी
तपासली जाणार नाही. प्रयोग करा व प्रत्यय घ्या.
Comments
Post a Comment