घातक दैवीकरण
वर्तमान समाजातील
महापुरुषांची आधुनिक बंदिस्तता यासंदर्भात मी एक ब्लॉग लिहिला होता तो वास्तवात एक
पूर्वार्ध होता असे म्हटले तर वावगे होणार नाही तसेच त्याचा हा एक उत्तरार्ध आहे.
वर्तमान समाजात फक्त ज्या त्या जाती-धर्मातील महापुरुषांची ज्या प्रकारची पूजा
करण्यात येते ते पाहता त्यांना भविष्यात देवत्व बहाल करण्यात येणार आहे किंबहुना
देवत्व बहाल करण्यात आलेले आहे.
अर्थात कोणताही
महापुरुष हा वंदनीय आहे यामध्ये तिळमात्र शंका नाही परंतु फक्त माझ्या जातीधर्माचा
महापुरुषच वंदनीय आहे असा समज बाळगणे किंवा याविचाराला साजेशी कृती करणे हे
श्रद्धा-अंधश्रद्धा यांचे प्रतिक आहे तसेच अज्ञानाचे द्योतक आहे. वर्तमान समाजात
स्वतःचे कर्तुत्व करण्यापेक्षा दुसऱ्यांच्या कर्तुत्वाचा सोयीस्कर वापर करून
स्वतःच्या मिश्या पिळण्याची प्रवृत्ती बोकाळत आहे. तसेच यासाठीच महापुरुषांना
देवांच्या पंक्तीमध्ये बसवण्यात येते. अर्थात यामागे असणारा आदर पेक्षा अंधश्रद्धा
तसेच अहंकार समाजाला घातक आहे.
आपण वंदनीय व्यक्ती
पासून प्रेरणा घेणे-आदर्श घेणे ते त्यांचे अनुकरण करणे असे प्रकार सहजतेने करू
शकतो. तेच पूजनीय असणाऱ्या व्यक्ती किंवा देवांचे जे काही आचरण अथवा कर्तुत्व आहे
त्यापासून प्रेरणा घेणे-आदर्श घेणे ते त्यांचे अनुकरण करणे या सारखा प्रकार करता
येतो का? इथे खरी मेख आहे. देवता असो की पूजनीय व्यक्ती असोत त्यांना कर्तुत्व
जमले कारण ते देव आहेत मात्र मी माणूस असून मला जमणार नाही असा विचार केला जातो.
थोडक्यात माणूस
माणसाचे अनुकरण करू शकतो मात्र देवांचे अनुकरण करीत नाही. थोडे स्वतःच्या आचरणाचा
विचार करून पहा त्यावर देवता, पूजनीय व्यक्तींचा कितपत प्रभाव आहे तसेच वंदनीय
व्यक्तींचा प्रभाव कितपत आहे. आपले आदर्श देव आहेत की माणसे? अनेक देवतांनी मानवी
जन्म घेत कर्तुत्व केले ते का? राम असो की कृष्ण हे देवांचे मानवी अवतार का? महावीर
असोत की गौतम बुद्ध अथवा येशू- महंमद पैगंबर या सगळ्यांनी माणूस काय करू शकतो हे
करून दाखवले ते मानव जन्म घेऊन परंतु आम्ही त्यांना देवत्व देताना त्यांच्यातील
माणूस दुर्लक्षित केला त्यामुळे आज त्याचा आदर्श असो की त्यांच्या पासून प्रेरणा
घेणे आम्हाला जमत नाही.
सध्या छत्रपती असोत
की डॉ.आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अहिल्याबाई होळकर, उमाजी नाईक यासारख्या
महान व्यक्तींना देवत्व प्रदान करण्यात येत आहे. या समस्त व्यक्ती जन्माने सामान्य
मात्र कर्तुत्वाने असामान्य आहेत. या समस्त व्यक्तींनी फक्त देवाची पूजा केली नाही
तर यांनी सामान्य माणसातील देव पहिला तसेच संघर्ष करून वाटचाल केली, स्वतः
कर्तुत्व केले. या सामान्य व्यक्तींचा जो कर्तुत्वाचा प्रवास आहे तो त्यांना
असामान्य करतो. आम्ही त्यांच्या कर्तुत्वाची पूजा करतो पण तेच कर्तुत्व आम्ही
सुद्धा करू शकतो याला सहज दुर्लक्षित करतो याउलट त्यांच्या कर्तुत्वाची सरकारने
भरपाई करण्यासाठी आम्हाला आरक्षण द्यावे, स्मारक बांधावे असा अट्टाहास करतो.
अर्थात कोणत्या
व्यक्तीने कोणत्या प्रकारची कृती करावी हे त्याने स्वतः ठरवावे मात्र आपल्या कृतीचा
होणारा सामाजिक परिणाम तसेच संस्कार दुर्लक्षित करता कामा नये. आम्ही एका पिढीकडून
काही घेतले तसेच पुढील पिढीला काही देणार आहेत ते नेमके काय? यासंदर्भात कधी विचार
केला का?
कोणत्याही माणसाचा
देव झाला की तो माणसा पासून दुरावतो कारण जोगवा मागणारे पुजारी. कोणत्याही देवाचा
पुजारी घ्या तो सामान्य व्यक्तीच्या अज्ञानाचा तसेच भावनांचा फायदा-गैरफायदा घेतो
यामुळे सामान्य माणूस भरकटतो. एक सामान्य माणूस मर्यादा पुरुषोत्तमाच्या
मंदिरासाठी एक मस्जिद पडताना समस्त मर्यादा उल्लंघन करतो तर दुसरा सामान्य माणूस
जिहादच्या नावाखाली इस्लामची(शांतता) पायमल्ली करीत जगात अशांतता निर्माण करणारा
काफिर होते पण स्वतःला कट्टर इस्लामिक मानतो.
डॉ.आंबेडकर असोत की
महात्मा फुले यांनी जातीयवाद मोडण्याचा प्रयन्त केला पण त्यांच्या जाती-धर्मांचे
भक्त काय करतात? असे सगळे प्रकार घडतात कारण देवत्व प्रदान करीत निर्माण होणार
दुरावा. तेच यांना सामान्य परंतु आदर्श व्यक्ती, वंदनीय व्यक्ती मानत वाटचाल करता
यांच्या सारखे अनेक निर्माण होतील तसेच वर्तमान समाजाला वास्तवात सुधारक
व्यक्तींची गरज आहे. अर्थात सुधारक होण्यासाठी भक्ती पेक्षा त्यांच्या मार्गावरून
वाटचाल करणाऱ्यांची गरज आहे. बघा थोडे स्वतःचे परीक्षण करून पहा म्हणजे प्रत्यय
मिळणार आहे.
छान लिहिले आहे
ReplyDelete