हिंसाचाराने प्रश्न सुटतात-मिटतात का?
दहशतवाद असो की नक्षलवाद, दोन व्यक्ती मधील कलह असो की दोन
जाती मधील, दोन प्रांत मधील तणाव असो की दोन देशा मधील तणाव असो या सगळ्या मधून मुक्त
होण्यासाठी हिंसाचाराचा मार्ग अवलंबणे कितपत योग्य आहे? तसेच या मार्गाचा अवलंब करून
प्रश्न सुटतात-मिटतात का?
कोणत्याही व्यक्तीचा दृष्टीकोन, आकलन, स्वभाव इथे निर्णायक
उत्तर देणार आहे. थोडक्यात हिंसा समर्थक होकारार्थी उत्तर देणार आहे तसेच विवेकी
माणूस नकारार्थी उत्तर देणार आहे. अर्थात दोन्ही व्यक्ती व्यक्तिगत दृष्टीने योग्य
आहेत मात्र एकमेका सापेक्ष पाहता अयोग्य आहे. हिंसावादी व्यक्ती स्वतःची अयोग्यता
ना पाहतो ना मान्य करतो तेच विवेकी व्यक्ती स्वतःची अयोग्यता पाहतो तसेच मान्य
करतो.
हिंसावादी व्यक्ती स्वतःची अयोग्यता पाहण्यास सक्षम नाही
कारण अज्ञान. हिंसावादी व्यक्ती स्वाभाविक पातळीला अज्ञानी असतो यामुळे त्याला ना
अहंकार समजतो ना अहंकाराचा संभ्रम समजतो. अहंकार संदर्भात अज्ञानी असणार माणूस
अतिरेक ते अट्टाहास करतो तसेच संकल्पनांना सत्य मानतो यामुळे गल्लत करतो तसेच आवेश
ग्रस्त आचरण करतो. अहंकारी माणूस- हिंसावादी माणूस स्वतःच्या मर्यादा न पाहता न
तपासता इतरांच्या मर्यादा तपासतो तसेच ठरवण्याचा प्रयन्त करतो यामुळे कोणत्याही
संवादाचा विवाद होतो.
जगातील कोणत्याही विवाद मागे संवादाची पार्श्वभूमी आहे.
संवाद विना विवाद होत नाही. कोणत्याही संवादाचा विवाद होण्यासाठी संवादातील दोन्ही
पक्ष समान जबाबदार आहेत. काही पक्ष स्वतःला निष्पाप व निरागस मानतात कारण अज्ञान.
संवादाचा विवाद होण्यामागे द्विपक्षीय अट्टाहास-अहंकार-अज्ञान आहे. थोडक्यात एका
हाताने टाळी वाजत नाही पण अहंकारी-हिंसावादी एका हाताने टाळी वाजल्याचे समजतात.
अहंकाराचे अज्ञान त्याठिकाणी स्वतःच्या संकल्पना म्हणजे
सत्य तसेच अहंकार ज्या संकल्पने सोबत जोडला त्या संकल्पनेचे अस्तित्व म्हणजे माझे
अस्तित्व. या संकल्पना म्हणजे मत, योग्यता, जात-पात, प्रांत, धर्म, देश,
स्वाभिमान, रक्षण, संस्कृती, भाषा.......... सारख्या अनंत संकल्पना आहेत.
कोणत्याही संकल्पना सोबत अहंकार जोडला जातो त्याठिकाणी माणूस आवेशग्रस्त होत
आक्रमक होतो कारण आभास. अहंकार आभासाला सत्य ठरवतो कारण स्वतःचे अस्तित्व राखता
यावे.
अहंकारी माणूस स्वमत म्हणजे सत्य मानतो तसेच ते इतरांच्या
गळी उतरवण्याचा प्रयन्त करतो मात्र असाच एखादा अहंकारी भेटतो त्यावेळी संघर्ष घडतो
तसेच हाणामारी ते कलह, विवाद, तणाव निर्माण होतात. दुसऱ्या शब्दात प्रत्यक्ष व
अप्रत्यक्ष स्वरुपात एखाद्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयन्त
होतो त्याठिकाणी संघर्ष घडतो.
काही व्यक्ती आक्रमण करतात तर काही प्रतिसादात्मक हिंसाचार
करतात मात्र हिंसाचार करून समस्या अथवा विवाद- कलह मिटतो का? नाही कारण आभास.
हिंसा करून जिंकल्याचा-पराभवाचा आभास निर्माण होतो कारण विजय-पराजय याच मुळात
संकल्पना आहेत हा एक भाग आहे. तसेच हिंसाचाराची वर्तमानातील पेरणी भविष्यातील
हिंसाचाराला जन्म देते.
आज जो कमकुवत आहे तो भविष्यात प्रबळ होणार आहे तसेच अहंकार
असल्याने पराभवाचे उट्टे किंवा सूड उगवण्याचा प्रयन्त करणार आहे. एक वेळ माणूस
स्वतःचा झालेला मान-सन्मान विसरतो मात्र अपमान कधीच विसरला जात नाही. मुळात आपण
एखाद्याचे मुल्यांकन करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही कारण अपूर्णत्व. मात्र
अहंकार मुल्यांकन करण्यास भाग पडतो तसेच हिंसाचार करण्यास प्रेरित, उद्युक्त करतो
तसेच त्यासाठी लागणारा आवेग-आवेश देखील प्रदान करतो यामुळे वास्तव न पाहता, न
समजावून घेता सरळ आक्रमण करण्यात येते.
एक हिंसाचार पुढील अनेक हिंसाचारांना जन्म देतो. एका
हाणामारीतून पुढील अनेक हानामारींचा जन्म होतो. एका युद्धातून अनेक युद्धांचा जन्म
होतो. जर खातरजमा करून घ्यायची असेल तर जागतिक इतिहास चाळून पाहावा. भारत-पाक
प्रश्न पहा तरीही खात्री होणार आहे फक्त एकांगी न पाहता समग्र पाहण्याचा प्रयन्त
करून पाहावा. कधी काळी जीवाभावाने एकत्र नांदणारे मित्र आजचे कट्टर वैरी आहेत.
अर्थात दोघे एकमेकांना जबाबदार ठरवतात पण दोघे स्वतःची चूक तसेच त्रूटी पाहण्यास
तयार नाहीत याउलट एका हाताने टाळी वाजवण्याचा प्रयत्न करीत असून स्वतःच्या समज
मधील गैरसमज पाहण्यास दोघे तयार नाहीत. अर्थात यामध्ये काही भारतीय नेते विवेकानी
हाताळणी करण्याच प्रयत्न करतात त्याला जनता तसेच लष्कर साथ देते मात्र पाकिस्तान
मध्ये जनता व सरकार लष्करापुढे हतबल आहे.
थोडे आत्मपरीक्षण करून स्वतःच्या मर्यादांचा विचार करीत
वाटचाल करता विवेक सक्रीय होतो तसेच अहंकार हतबल होतो. जर कोणताही प्रश्न वा
समस्या सोडवण्याची इच्छा असेल तर प्रथम विवेक सक्रीय करावा म्हणजे समस्या मधील
समाधान तसेच प्रश्नातील उत्तर निदर्शनास येणार आहे. त्याविना मानवी जीवन सुरक्षित
तसेच समस्या मुक्त होणार नाही.
Comments
Post a Comment