संस्कृती रक्षक की भक्षक?


परवा मला एक तथाकथित रक्षक सेनेचा एक सेनापती भेटला. त्याची सेना संस्कृती रक्षणाची मक्तेदार आहे असा त्याचा दावा होता. सुमारे तासभर त्याने मला व्याख्यान दिले. त्याचे व्याख्यान संपल्यानंतर त्या सेनापतीला मी एक साधा सरळ प्रश्न केला. बाबा रे संस्कृती म्हणजे नेमके काय? त्याने मला अमके- तमके म्हणजे संस्कृती हे सांगण्यास प्रारंभ केला. मी त्याला सरळ शब्दात संस्कृतीची व्याख्या विचारली. त्याचा आवेग तसेच आवेश ओसरला. त्याने सरळ माघार घेतली.
तथाकथित रक्षक सेनेच्या शेलेदारांची अशी अवस्था होते मग तो शिलेदार संस्कृतीचा, भाषेचा असो की धर्माचा. कोणत्याही रक्षकाला व्याख्या विचारता त्रेधातिरपीट उडते. या सगळ्यांना संस्कृती, भाषा, धर्म समजतात याबद्दल दुमत नाही मात्र यांना यासंदर्भातील ज्ञानाचा व्यापक प्रमाणातील अभाव असतो हे एक वास्तव आहे. यांच्या अज्ञानाची लक्षणे म्हणजे आवेश, आवेग, आक्रमकता, द्वेष, घृणा, तिरस्कार, रक्षणाच्या नावाखाली हिंसाचार.
संस्कृती म्हणजे संस्काराची कृती. संस्कार बदलतात त्याप्रमाणे संस्कृती बदलते. संस्कार हा व्यक्ती तसेच काळ परत्वे बदलतो कारण परिवर्तन हा निसर्ग नियम आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतःला योग्य वाटतात तसेच अनुकरण करण्यास सुलभ असतात त्याच संस्कारांना ग्रहण करतात. संस्कार करणाऱ्या पेक्षा तो ग्रहण करणारा व्यक्ती निर्णायक आहे. तसेच मानव व्यक्तिगत आकलन क्षमता नुसार या संस्कारांत बदल करतो. थोडक्यात व्यक्तिगत पातळीला ज्याला आचरण समजले जाते तेच सामाजिक आचरण म्हणजे संस्कृती आहे. आचरण व्यक्तिगत असो की सामाजिक त्यामध्ये परिवर्तन घडते कारण दृष्टीकोन बदलतो तसे आकलन व आचरण बदलते. समस्त ब्रम्हांड अस्थिर आहे. मानवी जीवन याला अपवाद नाही.
समाज हे व्यापक स्वरूप आहे यामधील कोणाचे तसेच कोणत्या कालखंडातील कोणते आचरण म्हणजे नेमेके संस्कृती ठरवता. एका आचरणाला निश्चित केल्याविना तपासणी करणार कशाच्या आधारे? इथे आचरण निश्चीत करण्याचे निकष काय तसेच कोण ठरवणार? तर अज्ञानी शिलेदार. हा सगळा प्रकार करण्यास या अज्ञानी शिलेदारांचे अपूर्ण आकलन आधारभूत आहे.
रक्षक शिलेदार स्वतः संस्कृतीचे निकष ठरवतात तसेच त्यानुसार इतरांचे परीक्षण करतात मात्र हा प्रकार करण्यासाठी स्वतःला पात्र तसेच लायक मानतात. थोडक्यात यांची ग्राह्यता समस्त समाजाने मानावी पण का? असा प्रश्न विचारण्याची सोय नाही कारण हिंसाचार.
सगळ्यात मोठी गंमत म्हणजे दुसरी संस्कृती, भाषा, धर्म हे आक्रमण करतात असा समज. सोबत संस्कृती, भाषा, धर्म बुडतात किंवा संकटात आहेत ही कल्पना. संस्कृती, भाषा, धर्म यांना भौतिक अस्तित्व नाही तर या समस्त संस्कारांच्या निष्पत्ती आहेत. प्रथम संस्कार संदर्भात ज्ञान प्राप्त करण्याची गरज आहे हे या शिलेदारांच्या ध्यानी-मनी नाही.
संस्कृती, भाषा, धर्म यामध्ये जे ज्ञान आहे तसेच जे महत्व आहे याचा अभ्यास करून त्याचे महत्व समाजाला विषद करून द्यावे ते देखील सध्या-सोप्या व सरळ भाषेत असावे. याठिकाणी स्वतःची सोय न पाहता इतरांची सोय पहावी. मात्र शिलेदार या फंदात पडत नाहीत कारण वास्तवात यांना संस्कृती, भाषा, धर्म यांच्याशी काही देणे- घेणे नाही. या शिलेदारांचा अहंकार या समस्त घटकांसोबत जोडला जातो यामुळे रक्षणाच्या नावाखाली भक्षण करण्यात येते.
महाराष्ट्रातील संस्कृतीचा मागोवा घ्यावा म्हणजे प्रत्यय मिळणार आहे. भावना भडकल्या, संस्कृती भ्रष्ट झाली, धर्मावर संकट यावरून सामाजिक दंगल, हिंसाचार घडत होते का? मात्र वर्तमान काळात या प्रकारची संस्कृती उदयाला आली आहे. याला संस्कृती रक्षण म्हणता की भक्षण.

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते