उंटावरून शेळ्या हाकणे


उंटावरून शेळ्या हाकणे हा एक वाकप्रचार आहे. थोडक्यात कोणत्याही कामात सक्रीय सहभाग नघेता दूर अंतरावरून इतरांना मार्गदर्शन करण्याचा प्रयन्त-प्रकार करणे. सध्या समाजात याप्रकारच्या प्रवृत्तीचा सुळसुळाट झाला आहे. स्वतःला या कामाचा किती अनुभव आहे की नाही याचा अभ्यास करायचा नाही तसेच स्वतः पुढाकार घेत काम करायचे नाही मात्र जे काम करतात त्यांना कुजाकामी, नालायक, मुर्ख, बावळट ठरवत न मागता सरळ मार्गदर्शन करण्याचा प्रयन्त करायचा वर मी तज्ञ अशी स्वतः स्वतःची पाठ थोपटून घ्यायची असा प्रकार राजरोस पणाने सुरु आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा सामना सुरु असताना त्याचे प्रक्षेपण पाहणारे अनेक व्यक्ती घरात बसून फलंदाजाने, गोलंदाजाने कसे खेळावे किंवा खेळले पाहिजे याचे मार्गदर्शन करीत असतात. गंमत म्हणजे यांनी कधी व किती गोलंदाजी केली हाच मुळात संशोधनाचा एक विषय असतो मात्र हे आंतरराष्ट्रीय खेळाडूंना मार्गदर्शन करण्यास कचरत नाहीत. बाकी खोल तपशीलात जाण्याची गरज नाही.
उंटावरून शेळ्या हाकणारे प्रत्येक क्षेत्रात आहेत. मिडिया मध्ये यांची संख्या लक्षणीय प्रमाणात अधिक आहे. कोणत्याही क्षेत्रातील घटना घडताच यांच्यातील तज्ञ जागा होतो. मिडीयावाल्यांची तज्ञाता मधील त तर्काचा की तत्वाचा हाच मुळात संशोधनाचा विषय आहे मात्र समस्त घटना मध्ये कोणी काय करावे यावर प्रवचन देताना स्वतःला सोयीस्कररीत्या अपवाद मानत वगळण्याचे काम करीत सगळा दोष सरकार तसेच राजकारण यांच्या माथी मारून मोकळे. सरकारने काय करावे किंवा करू नये यासंदर्भात मार्गदर्शन करणारे ना स्वतः निवडणूक लढवतात ना सरकारी कामात सहभागी होतात मात्र मार्गदर्शन जरूर करतात.
सगळ्या मीडियाकडे राजकीय विश्लेषक, तज्ञ आहेत पण या तज्ञ व्यक्तींनी किती निवडणुका लढवल्या याचे संशोधन करावे लागेल हा भाग वेगळा मात्र सरकार तसेच समस्त रजकीय पक्षांनी काय करावे किंवा काय तसेच कोणत्या उद्देशाने करतात याबद्दल छातीठोक सांगतात. टीम अन्नाचे आंदोलन देखील याच वर्गवारीतील आहे. स्वतः राजकारणात प्रत्यक्ष सहभागी होण्याचे सोयीस्कररीत्या टाळायचे वर राजकारण म्हणजे दलदल आहे. राजकारण रूपी दलदल साफ झाली पाहिजे पण माझे हात, कपडे खराब होता कामा नये. तसेच दलदल साफ करणाऱ्यांनी माझ्या सांगण्यानुसारच काम केले पाहिजे तर लायक अन्यथा नालायक.
आपल्या देशात जो स्वतःचे घर नीट चालवत नाही तो सरकारने कसा देश चालवावा हे सांगण्याचा प्रयन्त करतो फक्त पारावरील गप्पा पहा किंवा सामाजिक सांकेतिक स्थळांना भेट द्या म्हणजे वास्तवाचा प्रत्यय मिळणार आहे. जो तो इतरांच्यात सुधारणा करण्याची अपेक्षा बाळगतो तसेच साजेसी कृती करतो. कोणी कायद्यातील सुधारणा संदर्भात बोलते तर कोणी निवडणुका सुधारणा संदर्भात बोलते. काही शिक्षण क्षेत्रातील सुधारणा संदर्भात बोलते तर कोणी शैक्षणिक धोरण संदर्भात बोलते. कोणी लष्कर संदर्भात बोलते तर कोणी लष्कर अद्यावत करण्या संदर्भात बोलते मात्र या समस्त चर्चात्मक वल्गना करताना स्वतःची पात्रत, मर्यादा पाहण्याचे कष्ट घेतले जात नाहीत यामुळेच समाजात समस्या आहेत.
थोडक्यात स्वतः मधील त्रूटी नपाहता इतरांच्या त्रूटी पाहण्याचा तसेच त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयन्त करण्यात येतो. पण कधी जावे त्यांच्या जन्मा तव कळे यातना किती कठीण याचा प्रत्यय घेतला आहे का? स्वतः वर सक्रियतेने काम करण्याची वेळ येते तेव्हा गल्लीतील चतुष्पाद प्रमाणे नसलेले शेपूट गुंडाळून पलायनाचा मार्ग स्वीकारण्यात येतो तो का? प्रथम स्वतः करावे नंतर जग अनुकरण करणार आहे. अर्थात स्वतः केले म्हणजे इतरांवर लादण्यास मोकळे असा अन्वयार्थ घेऊ नये. स्वतःला शक्य आहे तितके करावे तसेच इतरांना प्रेरित करावे मात्र अट्टहास करता कामा नये.
आपण आत्मपरीक्षण करून खातरजमा करावी की आपण उंटावरून शेळ्या हाकत नाही ना? प्रामाणिक पणाने तपासणी केली तर वास्तवाचा प्रत्यय मिळणार आहे. अर्थात मी असा प्रत्यय घेतला आहे तसेच कधी काळी उंटावरून शेळ्या हाकल्या आहेत मात्र अनुभवातून जे काही शिकलो त्याचा लाभ इतरांना मिळावा यासाठी ब्लॉग प्रपंच.   

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते