वाढ की घट
आज माझा ‘वाढ’दिवस
आहे. अर्थात ही नाण्याची एक बाजू आहे. याच नाण्याची दुसरी बाजू म्हणजे ‘घट’दिवस
देखील आहे. येणाऱ्या प्रत्येक क्षणा सोबत वय वाढत असताना आयुष्यमान घटत आहे. वाढ
होणे हे सकारात्मक असेल तर घट होणे नकारात्मक आहे.
सामान्यतः सकारात्मक
दृष्टीने पहावे असे म्हटले जाते मात्र कोणत्याही ठिकाणी कोणताही विचार करताना निखळ
सकारात्मक किंवा निखळ नकारात्मक पाहणे म्हणजे अर्धवट पाहणे आहे. माणूस जे
प्रत्यक्ष स्वरूप पाहतो त्याला ग्राह्य मानत वाटचाल करतो. अर्थात जे सुलभ आहे तेच
प्रत्यक्ष स्वरूप आहे मात्र अप्रत्यक्ष स्वरूप पाहण्यासाठी मेहनत घ्यावी लागते.
काहींना सकारात्मक सुलभ वाटते तेच काहींना नकारात्मक सुलभ भासते.
काही व्यक्ती वय
वाढणे सकारात्मक मानतात तेच काही व्यक्ती नकारात्मक देखील मानतात तसेच त्या एकच
दृष्टीने-अनुषंगाने विचार करतात. वाढदिवस साजरा करण्यात येतो मात्र घट दिवस साजरा
करण्यात येतो का? जन्म दिवसाला वाढ दिवस साजरा करताना जो घट दिवस आहे त्याचे स्मरण
होते का? माणूस असो की प्राणी, सजीव असो की निर्जीव ज्या क्षणात जन्माला आला त्याच
क्षणापासून आयुष्य घटण्यास प्रारंभ होतो. जन्म म्हणजे मृत्यूचा प्रवास आरंभ क्षण
आहे. जन्म झाला तरच मृत्यू होणार आहे.
काही व्यक्ती जन्म
म्हणजे सकारात्मक मानतात तेच मृत्यू म्हणजे नकारात्मक मानतात यामुळेच वाढदिवस
करताना घट दिवस दुर्लक्षित करण्यात येतो. मानवाने दुर्लक्षित करून घट असो की वाढ
थांबत नाही. लक्ष देणे किंवा दुर्लक्ष करणे याचा त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत तसेच
सामाजिक जीवनाला प्रभावित करते. सामान्यतः माणूस घट दुर्लक्षित करतो तसेच वाढीचा
विचार तसेच विस्तार करतो यासाठी प्रसंगी जीवन दुर्लक्षित करतो. वर्तमान मानवाची
समग्र धावपळ पाहता या संदर्भात प्रत्यय मिळतो.
मानव एकतर सकारात्मक
विचार करतो किंवा नकारात्मक विचार करतो यामुळे त्याच्या विचारात असंतुलन निर्माण
होते. विचारात असंतुलन असणारा मानव आचरण संतुलित करणार आहे का? सध्या मानवा समोर
ज्याकाही समस्या आहेत त्यामागे मानवाचा एकांगी-असंतुलित विचार करण्याच्या स्वभावाची
निर्णायक भूमिका आहे.
थोडा विचार करून पहा
निखळ सकारात्मक काही निष्पत्ती देण्यास समर्थ आहे की वांझोटे आहे? तसेच नकारात्मक
संदर्भात आहे. जोपर्यंत सकारात्मक व नकारात्मक यांचा संयोग होत नाही तो पर्यंत
निर्मिती, निष्पत्ती नाही. कोणत्याही प्रकारचे विद्युत यंत्र असो की सर्किट
त्यामध्ये निखळ धन किंवा ऋण प्रभार असेल तर ते यंत्र काम करते का? किंवा ते सर्किट
कार्यरत होते का? स्त्री व पुरुष हे धन व ऋण प्रभारित मानता जो पर्यंत या दोघांचा
संयोग होत नाही तो पर्यंत निष्पत्ती(अपत्य) नाही. निखळ स्त्री व पुरुष हे भिन्न
राहून जीवन चक्राला गती प्रदान करू शकत नाहीत. दुसऱ्या शब्दात सकारात्मक असो की
नकारात्मक यांना एकमेकाविना ना अस्तित्व ना निष्पत्ती.
जर आपण वाढीचा विचार करतो
त्याच वेळी घट देखील लक्षात घेतली पाहिजे त्याविना संतुलन निर्माण होणार नाही.
मानव वाढवण्यासाठी प्रयन्त करताना घट दुर्लक्षित करतो यामुळेच त्याला घट लक्षत
येते त्यावेळी मनस्ताप सहन करावा लागतो. मानव वयाने वाढो अथवा आर्थिक दृष्टीने वाढो
मानवाचा अहंकार देखील वाढत जातो यामुळे समस्या निर्माण होतात. मात्र वाढताना
निर्माण होणारी घट लक्षात घेतली तर समस्त गोळाबेरीज शून्य असल्याचे जाणवते. जगात
शून्य महत्वाचा आहे. हे जग अध्यात्मिक असो की विज्ञानाचे अथवा अर्थ विश्व असो
शून्य महत्वाचा आहे. तसेच या शून्यात राहणे महत्वाचे आहे. थोडा प्रयन्त तसेच विचार
करून प्रत्यय घेऊन पहा.
Comments
Post a Comment